राज ठाकरेंच्या सुरक्षेविषयी गृहमंत्र्यांशी बोललो, कोर्टात जाण्याची गरज वाटत नाही : बाळा नांदगावकर

| Updated on: Jan 14, 2021 | 6:57 PM

राज ठाकरे यांना असलेला धोका बघता सरकारने सुरक्षेचा योग्य निर्णय घ्यावा. आम्हाला त्या संदर्भात कोर्टात जाण्याची आवश्यकता वाटत नाही, असं बाळा नांदगावकर म्हणाले.

राज ठाकरेंच्या सुरक्षेविषयी गृहमंत्र्यांशी बोललो, कोर्टात जाण्याची गरज वाटत नाही : बाळा नांदगावकर
Follow us on

नागपूर : ठाकरे सरकारने राजकीय नेत्यांना दिलेल्या सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेत अनेक नेत्यांची सुरक्षा यंत्रणा कमी केलीय. यात मनसे प्रमुख राज ठाकरे यांचाही समावेश आहे. राज ठाकरेंसोबत इतरही नेत्यांची सुरक्षा कमी केली आहे. ज्या दर्जाची सुरक्षा होती ती कमी केल्याने आम्ही गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासोबत बोललो असल्याचं मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी सांगितलं. ते आज नागपूर दौऱ्यावर आहेत. (MNS Bala nandgaonkar On Raj Thackeray Security)

सरकारने राज ठाकरे यांच्या सुरक्षेत आता एक कमांडो वाढविला आहे. मात्र राज ठाकरे यांना असलेला धोका बघता सरकारने सुरक्षेचा योग्य निर्णय घ्यावा. आम्हाला त्या संदर्भात कोर्टात जाण्याची आवश्यकता वाटत नाही, असं सांगताना आम्हीसुद्धा त्यांच्या सुरक्षेसाठी तयारी केली आहे, असं सांगायला नांदगावकर विसरले नाहीत.

नांदगावकरांच्या विदर्भ दौऱ्यात मनसे कार्यकर्ते आणि पदाधिकारी नाराज असल्याची चर्चा होती. यावर बोलताना नांदगावकर म्हणाले, आमच्या पक्षात कोणी नाराज आहे असं मला वाटत नाही. राजू उमरकर हे फक्त आले नाही कारण त्यांची प्रकृती ठीक नाही कोणाची नाराजी आहे असं वाटत नाही आणि अस झालंही असेल तर हे कुटुंब आहे, अशा गोष्टी कुटुंबात होत असतात, असं ते म्हणाले.

धनंजय मुंडे प्रकरणावरुन राज्यात जोरदार घडामोडी घडत आहेत. विविध राजकीय पक्षाचे नेते याप्रकरणी आपली भूमिका मांडत आहेत. याच प्रकरणावर नांदगावकर यांना विचारलं असता, “धनंजय मुंडे यांनी स्वतः सांगितलं आहे की चौकशी करा तर मग चौकशी व्हायला पाहिजे”, असं नांदगावकर म्हणाले.

…पण भविष्यात काय होईल हे सांगता येत नाही!

.आम्ही आता पर्यंत स्वतंत्र लढत आलो मात्र भविष्यात काय होईल हे आज सांगता येणार नाही, असं म्हणत त्यांनी युतीसंदर्भातील सूतोवाच केलं आहे. तसंच जनतेच्या हितासाठी काही पक्ष एकत्रित येतात तर भविष्यात कोणासोबत गेलो तर त्यात काही वाईट आहे असं वाटत नाही मात्र अजून काहीही ठरलं नाही, असं सांगायला देखील बाळा नांदगावकर विसरले नाहीत.

(MNS Bala nandgaonkar On Raj Thackeray Security)

हे ही वाचा

‘ये पब्लिक सब जाणती है’, राज ठाकरेंची सुरक्षा कमी करणं हा सरकारचा खुजेपणा : बाळा नांदगावकर