अंबानींच्या घराखाली बॉम्बची गाडी ठेवली कुणी हे महत्त्वाचं, विषयाला फाटा नको : राज ठाकरे

| Updated on: Apr 06, 2021 | 12:24 PM

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (MNS chief Raj Thackeray) यांनी आज पत्रकार परिषद घेत विविध विषयावर भाष्य केलं. त्यापैकीच एक म्हणजे महाराष्ट्रासह संपूर्ण देशात गाजणारा राजकीय मुद्दा म्हणजेच माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा.

अंबानींच्या घराखाली बॉम्बची गाडी ठेवली कुणी हे महत्त्वाचं, विषयाला फाटा नको : राज ठाकरे
Raj Thackeray
Follow us on

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (MNS chief Raj Thackeray) यांनी आज पत्रकार परिषद घेत विविध विषयावर भाष्य केलं. त्यापैकीच एक म्हणजे महाराष्ट्रासह संपूर्ण देशात गाजणारा राजकीय मुद्दा म्हणजेच माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा. यावर राज ठाकरे काय बोलणार याकडे खरंतर संपूर्ण राज्याचं लक्ष लागून होतं. पण, राज ठाकरे म्हणाले की, माझ्यासाठी अनिल देशमुख हा महत्त्वाचा विषय नाही, ती बॉम्बची गाडी ठेवली कुणी हा खरा महत्त्वाचा विषय आहे (MNS Chief Raj Thackeray Said The Important Issue Is Who Place The Vehicle With Explosives Near Mukesh Ambanis resident).

गेल्या 21 मार्चलाही राज ठाकरेंनी या विषयावर पत्रकार परिषद घेतली होती. तेव्ह ते म्हणाले होते की, सचिन वाझेप्रकरण आणि अनिल देशमुख यांनी दिलेलं कथित 100 कोटींचं टार्गेट, या प्रकरणाची चौकशी केंद्राने करावी. तसेच, त्यांनी सचिन वाझेवरुनही सरकार आणि मुख्यमंत्र्यांना घेरलं होतं. .

आजच्या पत्रकार परिषदेत अनिल देशमुख्यांच्या राजीनाम्यावर राज ठाकरे काय म्हणाले?

“माझ्यासाठी अनिल देशमुख हा महत्त्वाचा विषय नव्हता. विषय होता मुकेश अंबानींच्या घराखाली पोलिसांनी बॉम्बची गाडी ठेवली. त्याची चौकशी होणार आहे का? उद्या याने राजीनामा दिला चौकशी सुरु झाली, मग तुम्ही विसरुन गेलात. तुमच्या बातम्या बंद झाल्या, मग सगळेच विसरुन जाणार.”

“विषय हा आहे बॉम्बची गाडी पोलिसांनी ठेवली ती कुणाच्या सांगण्यावरुन ठेवली? पोलीस कुणीतरी सांगितल्याशिवाय असं कृत्य करणार नाहीत. पण चौकशी अनिल देशमुखांची होईलच, पण ही गाडी कुणाच्या सांगण्यावरुन ठेवली याची चौकशी व्हावी.”

विषयाला फाटा नको

“आपण तिसरीकडे जातोय. प्रत्येक वेळी हेच होते. विषयाला फाटा नको. मूळ विषय भरकटत जातो आणि कशापासून सुरु होतो हे आपण पाहातच नाही.”

“सुशांतच्या केसमध्ये आत्महत्या केली सुशांत सिंह राजपूतने आणि जेलमध्ये गेला अर्णब गोस्वामी.. कशाचा कशाशी संबंध?”

परमबीर सिंगांना बदलीनंतर साक्षात्कार

“परमबीर सिंग यांना 100 कोटींचा साक्षात्कार त्यांच्या बदलीनंतर का झाला? बदली झाली नसती तर हा साक्षात्कार झाला नसता का? पण ते बोलले बारमधून पैसे गोळा करा, हे लांच्छनास्पद आहे. बदल्यांचे बाजार होतातच.”

गेल्या पत्रकार परिषदेत राज ठाकरे काय म्हणाले होते?

मुंबईतील पोलीस अधिकाऱ्याला गृहमंत्री अनिल देशमुख यांनी 100 कोटींचं टार्गेट दिलं होतं. राज्यात अनेक शहरं आहेत. त्यात अनेक पोलिस आयुक्त आहेत. त्यांना कितीचं टार्गेट देण्यात आलं? असा सवाल करतानाच या प्रकरणाचा केंद्र सरकारने तपास करावा. केंद्राने याचा तपास केल्यास राज्यात फटाक्याची माळ लागेल, असा दावा मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला होता.

वाझेंना शिवसेनेत कुणी आणलं?

सचिन वाझे हा मुख्यमंत्र्यांचा अत्यंत जवळचा होता. वाझेंना शिवसेनेते प्रवेश करण्यासाठी कोण घेऊन गेलं होतं, हे अजूनही बाहेर आलेलं नाही. वाझेंना पुन्हा पोलीस दलात घेण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना आग्रह धरला होता. फडणवीसांनीच हे सांगितलं आहे. याचा अर्थ एवढाच की वाझे हे उद्धव ठाकरेंच्या जवळचे होते. उद्धव ठाकरे आणि अंबानी यांचे मधूर संबंध आहेत. उद्धव यांच्या शपथविधीला अंबानी कुटुंब सहपरिवार हजर होते. मग वाझे बॉम्बची गाडी कुणी सांगितल्याशिवाय अंबानीच्या घराखाली ठेवेल काय? असा सवाल राज ठाकरे यांनी केला.

त्याशिवाय वाझे बॉम्बची गाडी ठेवेल का?

यापूर्वी अतिरेकी बॉम्ब ठेवतात असं ऐकलं होतं. आता पोलीसच बॉम्ब ठेवत असल्याचं उघड झालं आहे. ही धक्कादायक बाब आहे. कुणाच्या तरी सांगण्यानुसार वाझे हे कृत्य करतील का? पोलिसांना कुणाच्या तरी सूचना असल्याशिवाय पोलीस हे धाडसच करणार नाही, असंही ते म्हणाले होते

तर अनेकजण आत जातील

हे प्रकरण अत्यंत गंभीर आहे. ते केवळ पोलीस दलातील वादाशी संबंधित नाही. तर बॉम्ब ठेवण्यापर्यंतचं हे प्रकरण आहे. त्यामुळे केंद्राने यात हस्तक्षेप करावा. केंद्राने याची चौकशी करावी. महाराष्ट्र सरकार या प्रकरणाची योग्य चौकशी होणार नाही. केंद्राने चौकशी चौकशी केली तर या प्रकरणात फटाक्याची माळ लागेल. अनेक अनाकलनीय चेहरे समोर येतील, असं सांगतानाच या प्रकरणात कोणकोण आत जातील याची कल्पनाही कोणाला करता येणार नाही. केंद्राने जर हस्तक्षेप केला नाही तर राज्य अराजकाकडे जाईल, असा इशाराही त्यांनी दिला होता

राज्यात निष्पक्ष तपास होईल याची खात्री नाही

“जगातील सर्वोत्तम पोलीस दल म्हणून मुंबई पोलीस दल ओळखलं जातं, त्या पोलीस दलाला बॉम्बची गाडी एका उद्योगपतीच्या घराबाहेर ठेवायला सांगणं हे भयंकर आहे. ह्याची जबाबदारी गृहमंत्र्यांनी घेऊन राजीनामा द्यायला हवा. आणि त्यांची चौकशी व्हायलाच हवी. माझी माध्यमांना विनंती आहे की त्यांनी हा विषय गंभीर आहे ह्याची जाणीव ठेवून तो विषय भरकटू देऊ नये, आणि हा प्रकार कोणाच्या सांगण्यावरून केला ह्याच्या मागे लागावं,” असा सल्लाही त्यांनी दिला.

MNS Chief Raj Thackeray Said The Important Issue Is Who Place The Vehicle With Explosives Near Mukesh Ambanis resident

संबंधित बातम्या :

राज ठाकरे म्हणाले, ‘आपण भेटूयात’, मुख्यमंत्री म्हणाले, ‘मी क्वारंटाईन आहे!’

‘राज्यात कडकडीत लॉकडाऊन झाला तर…’, राज ठाकरेंच्या पत्रकार परिषदेतील 12 महत्त्वाचे मुद्दे