‘साहेबांचा आदेश पाळू, पण…’, राज ठाकरेंची भूमिका मनसेच्या मोठ्या नेत्याला पटली नाही का?

| Updated on: Apr 17, 2024 | 1:50 PM

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढी पाडावा मेळाव्याला अखेर आपली भूमिका जाहीर केली. या भूमिकेबद्दल मनसैनिकांचा सूर कसा आहे? ते आता हळूहळू समोर येऊ लागलं आहे. राज ठाकरे यांची भूमिका सगळेच पदाधिकारी, कार्यकर्ते यांना पटलेली नाही. त्यामुळे राज ठाकरे यांच्या आदेशाच पालन कसं होईल? या विषयी थोडी साशंकता आहे.

साहेबांचा आदेश पाळू, पण..., राज ठाकरेंची भूमिका मनसेच्या मोठ्या नेत्याला पटली नाही का?
raj thackeray
Follow us on

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढी पाडावा मेळाव्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना साथ देण्याचा निर्णय घेतला. भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी महायुतीला त्यांनी बिनशर्त पाठिंबा जाहीर केला. राज ठाकरे यांच्या या भूमिकेवर मनसेमधून आता वेगवेगळे सूर समोर येऊ लागले आहेत. मनसे हा असा पक्ष आहे, ज्यात पक्षाध्यक्षांनी भूमिका जाहीर केली, की त्याची फक्त अमलबजावणी होते. पण कोकणात असं होताना दिसत नाहीय. कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील मनसेच्या एका मोठ्या नेत्याने मनातील खदखद, भावना बोलून दाखवली आहे. नुकतीच मनसेच्या उत्तर रत्नागिरी जिल्ह्याची बैठक पार पडली. सर्व मनसेचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. या बैठकीनंतर मनसे नेते वैभव खेडेकर यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांनी कार्यकर्त्यांच्या भावना बोलून दाखवल्या. रत्नागिरीतील पदाधिकाऱ्यांना राज ठाकरे यांची भूमिका पटल्याच दिसत नाहीय.

“या कोकणात 20 वर्ष मनसेची वाटचाल संघर्षमय राहिली आहे. या संघर्षात अनेकांनी पक्ष संपवण्यासाठी प्रयत्न केले. या लोकांनी आमच्या कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल केले. त्यांना जेलमध्ये टाकलं. पक्ष, नगसेवक फोडले या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंनी दिलेल्या आदेशाची अमलबजावणी कशी करायची? या संदर्भात बैठक झाली. कार्यकर्त्यांनी संमिश्र भावना व्यक्त केल्या. काही कार्यकर्त्यांच्या भावना खूप तीव्र होत्या. ही तीव्रता कमी व्हायला थोडा वेळ लागेल” असं वैभव खेडेकर म्हणाले.

‘त्यांच्यासोबत कसं काम करायचं?’

“आम्हाला या आमच्या सगळ्या भावना राज ठाकरेंपर्यंत पोहोचवायच्या आहेत. त्यांच्यासमोर आम्ही हे सर्व मांडणार आहोत. आम्ही राज ठाकरे यांचा आदेश मानणारे लोक आहोत. राज ठाकरे जसं मार्गदर्शन करतील, तशी आम्ही वाटचाल करु” असं वैभव खेडेकर म्हणाले. “मागच्या 20 वर्षात आमच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले. त्यांना जेलमध्ये डांबलं. ज्यांनी नगरसेवक ग्रामपंचायत फोडली, त्यांच्यासोबत कसं काम करायचं? आजची बैठक आक्रमक झाली. साहेबांचा आदेश पाळला जाईल” असं वैभव खेडेकर म्हणाले. मागच्या पाच वर्षात खासदार सुनील तटकरे यांनी कुठलीही विकासकाम केली नाहीत, असा आरोप खेडेकर यांनी केला.

खोट्या केसेस कशा पद्धतीने मागे घेणार?

“भविष्यात जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुका आहेत. सत्तेतल्या वाट्या संदर्भात आमच्या भूमिका तीव्र आहेत. आमच्या कार्यकर्त्यांच खच्चीकरण केलं. त्यांच्या व्यवसायात अडथळे आणले. खोट्या केसेस कशा पद्धतीने मागे घेणार? या संदर्भात राज ठाकरेंशी चर्चा करु. सातत्याने झालेला अन्याय, अवहेलना या व्यथा त्यांच्यासोमोर मांडू” असं वैभव खेडेकर म्हणाले.