या बातम्या परत कधीच वाचायला लागू देऊ नका; राज ठाकरेंची फेसबुक पोस्ट काय?

| Updated on: Sep 23, 2022 | 10:45 AM

असे प्रकार तुम्हाला कुठेही आढळले तर तुम्ही पोलिसांत तक्रार करा किंवा जवळच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यालयाला किंवा माझ्या कोणत्याही महाराष्ट्र सैनिकाला सूचित करा, ते कायदेशीर मदत घेऊन कारवाई तर करतीलच.

या बातम्या परत कधीच वाचायला लागू देऊ नका; राज ठाकरेंची फेसबुक पोस्ट काय?
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा फाईल फोटो
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई: राज्यात लहान मुलांकडून वेठबिगारी करून घेण्याच्या घटना समोर येत आहेत. या प्रकारावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे (raj thackeray) यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. राज ठाकरे यांनी एक फेसबुक पोस्ट लिहून अशा प्रकारे वेठबिगारी करून घेणाऱ्यांना धडा शिकवण्याचा इशारा दिला आहे. तसेच लहान मुलांकडून वेठबिगारी करून घेतली जात असेल तर पोलिसांत तक्रार करा किंवा मनसेच्या (mns) पदाधिकाऱ्यांच्या कानावर हा प्रकार टाकण्याचे आवाहनही राज ठाकरे यांनी केलं आहे. राज्यात मुलांचं शोषण होऊ नये. लहान मुलांकडून कोणीही वेठबिगारी (bonded labour system) करून घेऊ नये, असंही त्यांनी म्हटलं आहे.

गेल्या काही दिवसांपासून, विविध वर्तमानपत्रांमध्ये लहान मुलांना वेठबिगारी करण्यास भाग पाडलं जातंय, अशा आशयाच्या बातम्या वाचल्या. या बातम्या मन विषण्ण करणाऱ्या आहेत. नाशिक, नगर, ठाणे, पालघर अशा जिल्ह्यांमध्ये वेठबिगारीचे प्रकार समोर येत आहेत. पैशासाठी मुलांवर वेठबिगारीची वेळ यावी, हे भीषण आहे. आज कायद्याने वेठबिगारीचं उच्चाटन झालं असलं तरी ही प्रथा अस्तित्वात आहे, आणि प्रगत म्हणवणाऱ्या महाराष्ट्रात या घटना आढळणं हे राज्याला शोभणारं नाही, असं राज ठाकरे यांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे.

हे सुद्धा वाचा

राज्यसरकारने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना या घटनांचा छडा लावण्याचे निर्देश तात्काळ द्यायला हवेत. वेठबिगारांचा शोध, सुटका आणि पुनर्वसन याकडे संपूर्ण प्रशासनाने कमालीच्या सहानुभूतीने लक्ष द्यायला हवं. पण हे करताना एकूणच जागृत समाजाने पण पुढे यायला हवं. वेठबिगारी ही क्रूर प्रथा आहे, आणि तिच्या निर्मूलनासाठी समाजात सतर्कता हवी, असं त्यांनी म्हटलं आहे.

असे प्रकार तुम्हाला कुठेही आढळले तर तुम्ही पोलिसांत तक्रार करा किंवा जवळच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यालयाला किंवा माझ्या कोणत्याही महाराष्ट्र सैनिकाला सूचित करा, ते कायदेशीर मदत घेऊन कारवाई तर करतीलच. पण गरज पडलीच तर वेठबिगारी करून घेणाऱ्यांना महाराष्ट्र सैनिक आपल्या पद्धतीने धडा पण शिकवतील, असं सांगतानाच या बातम्या परत कधीच वाचायला लागू नयेत हीच इच्छा, असंही राज यांनी म्हटलं आहे.