‘रस्त्याच्या बांधकामात अधिकाऱ्यांचा भ्रष्टाचार, त्यात लोकप्रतिनिधींची मिलीभगत’, राजू पाटलांचा रोख नेमका कुणाकडे?

कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुका कोरोना संकटामुळे पुढे ढकलण्यात आल्या आहेत. मात्र, कल्याण डोंबिवलीत राजकारण काही थांबलेलं नाही (MNS MLA Raju Patil slams officers over Kalyan Shil road)

रस्त्याच्या बांधकामात अधिकाऱ्यांचा भ्रष्टाचार, त्यात लोकप्रतिनिधींची मिलीभगत, राजू पाटलांचा रोख नेमका कुणाकडे?
मनसे आमदार राजू पाटील
Reporter Amjad Khan | Edited By: Chetan Patil | Updated on: Jun 06, 2021 | 8:59 PM

कल्याण (ठाणे) : कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुका कोरोना संकटामुळे पुढे ढकलण्यात आल्या आहेत. मात्र, कल्याण डोंबिवलीत राजकारण काही थांबलेलं नाही. कल्याणमध्ये दररोज नेतेमंडळी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत असतात. कधी मनसे-शिवसेनेत झुंपते तर कधी भाजप-शिवसेनेत झुंपते. आता मनसे आमदार राजू पाटील यांनी कल्याण शीळ रस्त्याच्या बांधकमावरुन अधिकारी आणि लोकप्रतिनिधींवर निशाणा साधला आहे. कल्याण शीळ रस्त्याच्या बांधकामात अधिकाऱ्यांनी भ्रष्टाचार केला तसेच यामध्ये लोकप्रतिनिधींची मिलीभगत असल्याचा आरोप राजू पाटलांनी केलाय. त्यामुळे कल्याणमधील राजकारण पुन्हा तापण्याची शक्यता आहे (MNS MLA Raju Patil slams officers over Kalyan Shil road).

अधिकाऱ्यांना रस्त्यावर उभं करु, राजू पाटलांचा इशारा

“कल्याण शीळ रस्त्याचे काँक्रीटीकरणाचे काम सुरु आहे. तर दुसरीकडे ज्या रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे, त्याची दुरुस्ती सुरु आहे. कामात कुठल्याही प्रकारची गुणवत्ता नाही, कामात भ्रष्टाचार आहे. त्यामुळे आता पुढच्या आठवड्यात अधिकाऱ्यांना रस्त्यावर उभे करु”, असा इशारा मनसेचे आमदार राजू पाटील यांनी प्रशासनाला दिला आहे (MNS MLA Raju Patil slams officers over Kalyan Shil road).

‘तीन वेळा कंत्राटदार बदलला’

“कल्याण शीळ रस्त्याचे सहा पदकरीकरण आणि सिमेंट काँक्रीटीकरणाचे काम सुरु आहे. कल्याण शीळ रस्त्याचे सिमेंट काँक्रीटीकरणाचे काम पत्री पूलापासून सुरु आहे. या कामात तीन वेळा कंत्राटदार बदलण्यात आला आहे. रस्त्यावर डांबराचे पॅच मारले जात आहे. रस्त्याचे एकीकडे काम सुरु असताना त्याच रस्त्याची दुरुरीकडे दुरुस्ती सुरु आहे. रस्ते कामात कुठल्याही प्रकारची गुणवत्ता दिसून येत नाही. अधिकारी वर्गास वारंवार सांगून देखील त्यांच्याकडून दखल घेतली जात नाही”, असा दावा राजू पाटील यांनी केला.

‘बंद टोलनाक्यामुळे वाहतूक कोंडी’

“रस्ते कामात भ्रष्टाचाराचा आरोप केला जात आहे. तो आता खरा असल्याचे दिसून येत आहे. अधिकाऱ्यांकडून सुरु असलेल्या भ्रष्टाचारात लोकप्रतिनिधींची ही मिलीभगत आहे. या रस्त्यावरील टोलनाका बंद करण्यात आला आहे. मात्र तो हटविण्यात आलेला नाही. त्यामुळे त्याठिकाणी वाहतूक कोंडी होत आहे. या वाहतूक कोंडीला जबाबदार कोण?”, असाही सवाल आमदार पाटील यांनी उपस्थित केला आहे.

‘अधिकाऱ्यांना जाब विचारु’

“या रस्त्याच्या कामाची पावसाळ्यापूर्वी पाहणी करण्याची मागणी अधिकारी वर्गाकडे करण्यात आली होती. मात्र त्यांच्याकडून अद्याप पाहणी केली जात नाही. पाहणी दौऱ्यास टाळाटाळ केली जात आहे. अधिकारी वर्गास रस्त्यावर उभे केले तर गुन्हे दाखल केले जातात. मात्र आता गुन्हे दाखल झाले तरी चालेल. अधिकारी वर्गास रस्त्यावर उभे करुन त्यांना जाब विचारला जाईल. पावसाळ्यापूर्वी अधिकाऱ्यांसमवेत रस्ते कामाची पाहणी केली जाईल. त्याचबरोबर या रस्त्याच्या कामाचे स्वखर्चातून थर्ड पार्टी ऑडीट करुन रस्ते कामाची गुणवत्ता तपासण्यात येईल”, असे आमदार पाटील यांनी सांगितले.

हेही वाचा : ‘…तर परिणाम भोगावे लागतील’, मनसे आमदार राजू पाटलांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम

Follow Us