पृथ्वीराज चव्हाणांचा कारभार वांझोटा ; तर फडणवीसांचा खोटारडा : राज ठाकरे

| Updated on: Oct 15, 2019 | 11:03 PM

"मुख्यमंत्री हा चांगला सुशिक्षित माणूस पण ते खोटं का बोलतात" असा प्रश्न त्यांनी मुख्यमंत्र्यांना (Raj Thackeray Dombivli) विचारला. तर "पृथ्वीराज चव्हाण यांचा कारभार वांझोटा" असल्याचेही राज ठाकरे म्हणाले. 

पृथ्वीराज चव्हाणांचा कारभार वांझोटा ; तर फडणवीसांचा खोटारडा : राज ठाकरे
Follow us on

डोंबिवली : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या प्रचाराची तोफ डोंबिवलीत कडाडली. यावेळी राज ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांवर निशाणा साधला. “मुख्यमंत्री हा चांगला सुशिक्षित माणूस पण ते खोटं का बोलतात” असा प्रश्न त्यांनी मुख्यमंत्र्यांना (Raj Thackeray Dombivli) विचारला. तर “पृथ्वीराज चव्हाण यांचा कारभार वांझोटा” असल्याचेही राज ठाकरे म्हणाले.

“काँग्रेसचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी जेवढा वेळ कारभार केला तेवढा सगळा वांझोटा कारभार. त्याचा महाराष्ट्राला किंवा त्यांच्या पक्षाला काहीही उपयोग झाला नाही.  पृथ्वीराज चव्हाण हे 70 च्या दशकातील विलनसारखे दिसतात. त्यांचा महाराष्ट्राला काहीही उपयोग नाही,” असे राज ठाकरे म्हणाले.

“त्यानंतर भाजपच सरकार आलं. देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा सुशिक्षित मुख्यमंत्री झाला.  मुख्यमंत्री चांगला माणूस आहे. पण खोटं बोलायची त्यांना गरज आहे का? महाराष्ट्राने तुम्हाला बहुमत दिलं आहे ना, मग खोटं का बोलता?” असा प्रश्नही राज ठाकरेंनी विचारला.

मुख्यमंत्री सांगतात “पहिल्या दीड वर्षात आम्ही सव्वा लाख विहिरी बांधल्या. पण बहुधा त्यांनी महाराष्ट्रातील खड्डे मोजले असणार आणि सांगितलं सव्वा लाख विहिरी बांधल्या.” अशी टीकाही राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांवर केली.

डोबिंवलीतील भाषणादरम्यान राज ठाकरेंनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींचे कौतुक केले. “मी एकदा पश्चिम बंगालच्या मंत्रालयात गेलो होतो. तेव्हा लिफ्टमधून वरच्या मजल्यावर जात असताना त्यात किशोर कुमार यांची बंगाली भाषेतील गाणी लावली होती. मला खरचं त्यांच कौतुक वाटलं,” असेही राज ठाकरे म्हणाले. अशी आपल्या मंत्रालयात कधी लता मंगेशकर, आशाताईंची गाणी लागतील का असेही ते यावेळी (Raj Thackeray Dombivli) म्हणाले.

“सर्वाधिक शेतकरी आत्महत्या केलेला जिल्हा यवतमाळ. एखाद्या जिल्ह्याची अशी कशी ओळख असू शकते असा प्रश्नही राज ठाकरेंनी उपस्थित केला. न्यूयॉर्कमधील सर्वात उंच इमारत ही केवळ 16 महिन्यात उभारली जाते. मात्र आपल्याकडे वांद्रे वरळी सी-लिंक उभारायला 14 वर्ष लागतात. जग विकासाच्या दिशेने चाललं आहे आणि आपणा मात्र रस्त्यांच्या समस्यांवर अडलोय”, असेही राज ठाकरे म्हणाले.

“अमोल यादव नावाच्या एका तरुणाने विमान बनवलं. नंतर त्याने ते मुख्यमंत्र्यांना दाखवलं. त्याला आश्वासन दिलं गेलं ‘ठाण्यात जमीन उपलब्ध करून देतो.’ वास्तवात जमीन दिली नाही. अखेर तो मुलगा सरकारी दिरंगाईला कंटाळून अमेरिकेत गेला. हेच तुमचं ‘मेक इन महाराष्ट्र’?” अशी टीकाही त्यांनी केंद्र सरकारवर केली.

सध्या “डोंबिवलीची ओळख सुशिक्षित लोकांचे बकाल शहर म्हणून झाली आहे. पालिका प्रशासन मुलभूत सुविधा पुरवण्यास अपयशी ठरली आहे. मुख्यमंत्र्यांनी केलेल्या आश्वासनांचा त्यांना विसर पडला आहे. पाच वर्षात तुम्हाला खड्डेमुक्त महाराष्ट्र करता येत नाही”, असा प्रश्नही त्यांनी पालिका प्रशासनाला विचारला.