Raj Thackeray | मनसेचा उद्याचा मेळावा पुढे ढकलला, राज्यातील पूर परिस्थितीमुळे राज ठाकरेंचा निर्णय

| Updated on: Jul 12, 2022 | 10:38 AM

उद्या गुरुपौर्णिमेनिमित्त होणारा मनसेचा मेळावा पुढे ढकलण्यात आला आहे.

Raj Thackeray | मनसेचा उद्याचा मेळावा पुढे ढकलला, राज्यातील पूर परिस्थितीमुळे राज ठाकरेंचा निर्णय
Follow us on

मुंबईः राज्यात उद्भवलेल्या पूर परिस्थितीमुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा (MNS Rally) मेळावा पुढे ढकलण्यात आला आहे. उद्या राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मनसेचा मेळावा उद्या घेण्यात येणार नाही, असं एका पत्राद्वारे कळवलं आहे. बुधवारी गुरुपौर्णिमेनिमित्त (Gurupournima) राज ठाकरे यांनी सकाळी दहा वाजला मनसेच्या कार्यकर्त्यांसाठी संवाद कार्यक्रम आयोजित केला होता. या मेळाव्यात मुंबईतील सर्व मनसे नेते, सरचिटणीस, उपाध्यक्ष, विभाग अध्यक्ष ते उपशाखाअध्यक्ष तसेच अंगीकृत संघटनांचे पदाधिकारी यांना आमंत्रित करण्यात आलं होतं. मात्र मागील तीन दिवसांपासून मुंबई आणि परिसरात पावसाची झड लागली आहे. काही भागात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. या पार्श्वभूमीवर मनसेतर्फे आयोजित मेळावा पुढे ढकलण्यात आला आहे, असं राज ठाकरे यांनी एका पत्रकाद्वारे कळवलं आहे.

राज ठाकरे यांनी लिहिलेले पत्र असे…

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्व पदाधिकारी

सस्नेह जय महाराष्ट्र!

तुम्हाला जरा थोड्या तातडीनं कळवतो आहे.

आपण वास्तविक उद्या एक मेळावा आयोजित केला होता. ज्यात मला तुमच्याशी बोलायचं होतं आणि कामासंबंधी काही सूचना करायच्या होत्या. परंतु कालपासून महाराष्ट्रात विविध ठिकाणी पावसानं थैमान घातलेलं दिसत आहे. जनजीवन तर विस्कळीत आहेच, परंतु अशा परिस्थितीत मी उद्या जो कार्यक्रम तुम्हा सर्वांना सांगणार होतो तो सांगितला तरी तो प्रत्यक्षात आणता येणं फार अवघड आहे.

अशा परिस्थितीत आपण उद्याचा मेळावा पुढे ढकलत आहोत. पुढची तारीख आणि वेळ लवकरच, थोडा पावसाचा अंदाज घेऊन, तुम्हा सर्वांना कळवली जाईलच.

दरम्यान, तुम्ही स्वतःची तर काळजी घ्याच परंतु अतिवृष्टीमुळे जिथे लोकांना त्रास होतो आहे तिथेही तुम्ही लोकांसाठी जे करता येईल ते करण्याचा प्रयत्न करा. मुख्यतः नदीकाठाला जिथे लोक रहात आहेत तिथल्या घरांमध्ये पाणी घुसण्याची शक्यता आहे. सांगली कोल्हापूरकडचा आत्ता-आत्ताचा पूर तुम्हाला आठवतोय ना? काही लोकांना तात्पुरत्या निवासात हलवायला लागू शकतं. तिथे अन्नधान्य, पिण्याचं शुध्द पाणी, अंथरूण-पांघरूण (सर्वत्र ओल असते) पुरवावं लागेल. मुख्यतः वृध्द, गरोदर महिला, अपंग आणि लहान मुलं ह्यांच्याकडे विशेष लक्ष द्यावं लागेल. झाडं उन्मळून पडतात, ती नंतर पुन्हा लावावी लागतील. अशा खूप गोष्टी आहेत.

एक लक्षात घ्या की अशा परिस्थितीत सरकारी यंत्रणा प्रचंड कामात असतात. त्यामुळे त्यांच्यावर विनाकारण ताण येईल असं काहीही करू नका.

अर्थात, असं काही होऊ नये, कुठलंही नैसर्गिक संकट येऊ नये, हीच आपली इच्छा आहे, फक्त सतर्कतेसाठी सांगितलं.

लवकरच भेटू,

आपला नम्र

राज ठाकरे