ठाकरे- मोदी वैयक्तिक भेटीवर 5 तासांनी अशोक चव्हाण बोलले, म्हणाले…

| Updated on: Jun 08, 2021 | 6:51 PM

पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री ठाकरे यांच्यातील भेट राजकीय नव्हती. मुख्यमंत्र्यांनी स्वत: त्याबाबत स्पष्टीकरण दिल्याचं अशोक चव्हाण म्हणाले.

ठाकरे- मोदी वैयक्तिक भेटीवर 5 तासांनी अशोक चव्हाण बोलले, म्हणाले...
अशोक चव्हाण, सार्वजनिक बांधकाम मंत्री
Follow us on

मुंबई : मराठा आरक्षणासह अन्य महत्वाच्या मुद्द्यांबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची राजधानी दिल्लीत भेट घेतली. त्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मराठा आरक्षण विषयक उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाणही उपस्थित होते. पंतप्रधान आणि महाराष्ट्रातील 3 बड्या नेत्यांमध्ये जवळपास तासभर चर्चा झाली. त्यानंतर पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांमध्ये एकांतात अर्धा तास चर्चा झाली. त्याबाबत राज्यात विविध राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. त्यावर बोलताना पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री ठाकरे यांच्यातील भेट राजकीय नव्हती. मुख्यमंत्र्यांनी स्वत: त्याबाबत स्पष्टीकरण दिल्याचं चव्हाण म्हणाले. (Ashok Chavan’s reaction on meeting Between CM Thackeray and PM Modi)

कोणत्याही आरक्षणाला ५० टक्के मर्यादा घालून देण्यात आली आहे. याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विनंती केली की आपण आवश्यक घटनादुरुस्ती करुन सकारात्मक पावलं उचला. विहित कायदेशीर मार्गाने केंद्र सरकारने हा विषय हाताळावा अशी विनंती आम्ही केल्याचं चव्हाण म्हणाले. फक्त मराठा आरक्षणच नाही तर ओबीसींच्या राजकीय आरक्षणाबाबतही केंद्राने प्रयत्न करावा अशी मागणी करण्यात आल्याचं चव्हाण यांनी सांगितलं. त्याचबरोबर मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्य सरकार पुनर्विचार याचिका दाखल करणार असल्याचंही चव्हाण यांनी सांगितलं आहे.

‘फडणवीसांना प्रत्येक गोष्टीत पिवळं दिसतं’

पंतप्रधान मोदींसोबत आज झालेल्या भेटीबाबत ज्या संघटना विरोधी वक्तव्य करत आहेत, त्या भाजपप्रणित आहेत. विरोधकांनीही आपलं शिष्टमंडळ घेऊन पंतप्रधानांकडे जावं आणि बाजू मांडावी, असं आव्हान चव्हाण यांनी भाजपला आणि काही संघटनांना दिलं आहे. त्याचबरोबर पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यातील भेट राजकीय नव्हती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वत: त्याबाबत स्पष्टीकरण दिल्याचं चव्हाण म्हणाले. तसंच ही भेट राजकीय तडजोडीसाठी नव्हती. देवेंद्र फडणवीस यांना प्रत्येक गोष्टीत पिवळं दिसतं. त्यांना उलट आनंद वाटला पाहिजे, असा टोलाही चव्हाण यांनी लगावलाय.

संजय राऊतांचाही भाजप नेत्यांना टोला

मोदी आणि ठाकरे यांच्यात अर्धा तास झालेल्या वैयक्तिक भेटीबाबत बोलताना खासदार संजय राऊत यांनीही भाजप नेत्यांना टोला हाणलाय. मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांमध्येही एकांतात झालेल्या चर्चेनंतर राज्यात राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. अशावेळी चर्चा तर होणारच, अशा शब्दात राऊतांनी विरोधकांना टोला लगावलाय. त्याचबरोबर पंतप्रधान मोदी यांनी कुणाच्याही मध्यस्तीशिवाय महाराष्ट्राच्या प्रश्नात लक्ष घातलं हे महत्वाचं असल्याचंही संजय राऊत म्हणाले.

मुख्यमंत्र्यांनी मांडलेल्या विषयांबाबत पंतप्रधान मोदींचा दृष्टीकोन सकारात्मक असल्याचं सांगितलं जात आहे. ज्यांना या भेटीचे राजकीय संदर्भ काढायचे असतील त्यांनी काढावेत. केंद्र आणि राज्यात संघर्ष नसावा, राज्यांच्या संकटकाळात केंद्राने, पंतप्रधानांनी मदत करावी. राज्यात आणि केंद्रात सुसंवाद असावा ही राज्याची भूमिका आहे. दरम्यान आत पंतप्रधान मोदींनी 1 तास महाराष्ट्राचे प्रश्न ऐकून घेतले तर संघर्षाची भाषा कशाला, असंही राऊत म्हणाले. आता महाराष्ट्राचे अनेक प्रश्न मार्गी लागतील, अशी आशाही संजय राऊत यांनी मोदी-ठाकरेंच्या भेटीनंतर व्यक्त केलीय.

संबंधित बातम्या :

मोदी-ठाकरेंची व्यक्तिगत भेट झाली असेल तर स्वागतच, या भेटीचा राज्याला फायदाच होईल: फडणवीस

‘उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान मोदींची घेतलेली भेट राजकीय तडजोडीसाठी’, खासदार उदयनराजेंचा आरोप

Ashok Chavan’s reaction on meeting Between CM Thackeray and PM Modi