मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज राज्यपालांना भेटणार, भेटीचा विषय मात्र अद्याप अस्पष्ट

| Updated on: Oct 29, 2020 | 7:16 AM

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना लिहिलेल्या खरमरित पत्राच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज राज्यपाल महोदयांची भेट घेणार आहे. भेटीचा विषय अद्याप स्पष्ट झाला नसला तरी लोकहिताच्या प्रश्नांसदर्भात ही भेट होणार असल्याची माहिती मिळत आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज राज्यपालांना भेटणार, भेटीचा विषय मात्र अद्याप अस्पष्ट
Follow us on

मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेणार आहेत. या भेटीचं कारण मात्र अद्याप स्पष्ट झालेलं नाही. पण लोकहिताच्या प्रश्नांसंदर्भात राज ठाकरे राज्यपाल कोश्यारी यांची भेट घेणार असल्याचे समजते. मंदिरे सुरु करण्याच्या मुद्द्यावरुन राज्यपाल महोदयांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहिले होते. त्या पत्रातून राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना हिंदुत्वाची आठवण करुन दिली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही राज्यपालांना सडेतोड उत्तर दिलं होतं. तर शरद पवार यांनी राज्यपालांच्या पत्रावर नाराजी व्यक्त करत थेट पंतप्रधान मोदी यांच्याकडे पत्राद्वारे तक्रार केली होती. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे हे राज्यपाल कोश्यारी यांची भेट घेणार असल्याने जोरदार चर्चेला सुरुवात झाली आहे. (MNS chief raj thackeray today meet governor bhagatsingh koshyari)

लॉकडाऊन आणि अनलॉकदरम्यान समाजातील विविध घटक आपले प्रश्न घेऊन राज ठाकरे यांना भेटले आहेत. त्यात कोळी बांधव, डबेवाले, मंदिरे सुरु करण्यासंदर्भात काही शिष्टमंडळे आणि अन्य घटकांनी राज ठाकरे यांची भेट घेत आपल्या समस्या त्यांच्यासमोर मांडल्या आहेत. यातील काही प्रश्न राज ठाकरे यांनी सरकारमधील संबंधित मंत्र्यांशी फोनवरुन चर्चा करुन सोडवले होते. तर काही समस्यांसाठी राज यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी पत्रव्यवहार केला होता. मात्र, आता राज ठाकरे हे राज्यपाल कोश्यारी यांची भेट घेणार असल्याने अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत.

मंदिराच्या मुद्द्यावरुन मुख्यमंत्री, राज्यपाल संघर्ष

राज्यातील मंदिरे सुरु करण्याच्या मागणीसाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहिलं होतं. त्या पत्रावरुन जोरदार राजकारण रंगलेलं संपूर्ण राज्यानं पाहिलं आहे. त्या पत्रात राज्यापालांनी मुख्यमंत्र्यांना हिंदुत्वाची आठवण करुन देण्यासाठी काही प्रश्न विचारे होते. ‘राज्यात बार-रेस्टॉरंट सुरु झाले, मग देव कुलुपबंद का? तुम्हाला हिंदुत्वाचा विसर पडला आहे का?’ अशाप्रकारच्या पश्नांचा त्यात समावेश होता. त्यावरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही राज्यपालांना जोरदार प्रत्युत्तर दिलं होतं. माझ्या हिंदुत्वाला आपल्या प्रमाणपत्राची गरज नाही. तसेच ते कुणाकडून शिकण्याचीही मला गरज नाही, असं मुख्यमंत्र्यांनी आपल्या पत्रात म्हटलं होतं. (MNS chief raj thackeray today meet governor bhagatsingh koshyari)

शरद पवार यांचं खरमरित पत्र

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी बुधवारी राज्यपालांना एक खरमरित पत्र लिहिलं. त्यात राज्यपाल सचिवालयाकडून पवारांना पाठवण्यात आलेल्या ‘जनराज्यपाल- भगतसिंह कोश्यारी’ या पुस्तकावरुन जोरदार टोले लगावले आहेत. “वास्तविक भारतीय संविधानात ‘जनराज्यपाल’ असा उल्लेख आढळत नाही, तरीही राज्य शासनाच्यावतीने सुबक छपाई असलेले आपल्या एक वर्षाच्या मर्यादित कालावधीवर प्रकाश टाकणारे स्व प्रसिद्ध कॉफी टेबल बुक पाठवण्यात आले याबद्दल धन्यवाद”. अशा शब्दात पवार यांनी राज्यपालांच्या पत्राला खोचक उत्तर दिलं आहे.

पवारांची पंतप्रधान मोदींकडे तक्रार

तत्पूर्वी ‘राज्यपाल हे देशातील महत्वाच्या आणि आदरणीय पदांपैकी एक पद आहे. त्या पदाचा आदर जसा राखला जातो, तसाच मुख्यमंत्री या पदाचाही राखला गेला पाहिजे. आता केंद्रीय गृहमंत्र्यांनी कानउघाडणी केल्यानंतर राज्यपालांनी पदावर राहावं नाही हे ठरवावं’, अशा शब्दात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर जोरदार हल्ला चढवला होता. तसंच पवार यांनी राज्यपालांच्या पत्राबाबत नाराजी व्यक्त करताना थेट पंतप्रधान मोदी यांना पत्र लिहून राज्यपालांच्या पत्रातील भाषेवर आक्षेप व्यक्त केला होता.

संबंधित बातम्या:

स्वप्रसिद्ध पुस्तकात मुख्यमंत्र्यांचा सल्ला, गृहमंत्र्यांची दखल कुठे? शरद पवारांचं राज्यपालांना खरमरीत पत्र

“राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांच्या सल्लानुसारच वागायला हवं”, घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांचा सल्ला

स्वाभिमान शिल्लक असेल तर पदावर राहायचं की नाही ठरवायला हवं!, शरद पवार यांचा राज्यपाल कोश्यारींवर हल्लाबोल

MNS chief raj thackeray today meet governor bhagatsingh koshyari