सुजय विखे राष्ट्रवादीचा पाठिंबा नाकारणार, नगर महापालिकेत शिवसेनेलाही सत्तेत घेणार

| Updated on: Jun 14, 2019 | 8:27 PM

भाजप आता राष्ट्रवादीचा पाठिंबा नाकारुन शिवसेनेसोबत सत्ता स्थापन करण्याची चिन्हं दिसत आहेत. नगरचे खासदार डॉ. सुजय विखे यांनी याबाबत संकेत दिले आहेत.

सुजय विखे राष्ट्रवादीचा पाठिंबा नाकारणार, नगर महापालिकेत शिवसेनेलाही सत्तेत घेणार
Follow us on

अहमदनगर : लोकसभा निवडणुकीनंतर आता स्थानिक समीकरणंही बदलत आहेत. भाजपने अहमदनगर महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्याने सत्ता स्थापन केली होती. त्यामुळे सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या शिवसेनेलाही सत्तेपासून दूर रहावं लागलं. पण भाजप आता राष्ट्रवादीचा पाठिंबा नाकारुन शिवसेनेसोबत सत्ता स्थापन करण्याची चिन्हं दिसत आहेत. नगरचे खासदार डॉ. सुजय विखे यांनी याबाबत संकेत दिले आहेत.

निवडणुकीनंतर महापालिकेत त्रिशंकू स्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे शिवसेनेला सत्तेपासून रोखण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपला पाठिंबा दिला. पण, लोकसभा निवडणुकीत डॉ. सुजय विखे-पाटील यांच्याविरोधात राष्ट्रवादीने ताकद लावली. लोकसभा निवडणुकीत माझ्या पराभवासाठी राष्ट्रवादीने जोरदार प्रयत्न केले होते, असं खासदार विखे-पाटील यांचं म्हणणं आहे. त्यामुळे आता महापालिकेतील भाजप-राष्ट्रवादी ही आघाडी आता संपुष्टात येणार असल्याचं स्पष्ट झालंय.

महापालिका निवडणुकीत शिवसेनेला सर्वाधिक 24 जागा मिळाल्या होत्या. राष्ट्रवादी दुसऱ्या क्रमांकावर तर, भाजप 14 जागांसह तिसऱ्या क्रमांकावर राहिला होता. पण, भाजपने 18 जागा असणाऱ्या राष्ट्रवादीच्या जोरावर सत्ता स्थापन केली. नगरमधील राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्यातील संघर्षाचा फायदा भाजपला झाला होता.

अहमदनगर महापालिकेची स्थापना 2003 मध्ये झाली त्यावेळी शिवसेना भाजप युतीलाच सर्वाधिक जागा मिळाल्या होत्या. पण, युतीमधील अंतर्दत कलहाचा फायदा घेत काँग्रेसने महापालिकेवर सत्ता मिळवली. त्यानंतर थेट 2018 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यावर भाजपला महापालिकेत महापौरपद मिळालं. 2018 च्या निवडणुकीत सर्वाधिक जागा शिवसेनेला मिळाल्याने महापौरपद शिवसेनेला मिळू नये यासाठी भाजपने राष्ट्रवादीचा पाठिंबा घेतला होता.

भाजपला पाठिंबा दिल्याने राष्ट्रवादीवर मोठ्या प्रमाणात टीका झाली होती. विशेष म्हणजे यानंतर राष्ट्रवादीच्या 18 नगरसेवकांचं निलंबनही करण्यात आलं. पण लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर हे निलंबन पक्षाने रद्द केलं. लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या संग्राम जगताप यांच्या विरोधात सुजय विखे जवळपास तीन लाख मतांनी विजय झाले. सुजय विखेंनी सध्या जिल्ह्यातील शिवसेना – भाजपमधील अंतर्गत कलह मिटवण्याचा विडा उचललाय. महापालिका हे त्यातील पहिलं पाऊल असल्याचं मानलं जातंय.