मतदार म्हणून आम्हाला काही किंमत आहे का?, नानांच्या थेट प्रश्नांनी शिंदे-फडणवीसांना घाम फोडला…

| Updated on: Oct 12, 2022 | 10:53 AM

नाना पाटेकरांनी फडणवीस-शिंदेंची खास मुलाखत घेतली. पाहा...

मतदार म्हणून आम्हाला काही किंमत आहे का?, नानांच्या थेट प्रश्नांनी शिंदे-फडणवीसांना घाम फोडला...
Follow us on

मुंबई : नाना पाटेकर (Nana Patekar) बिंधास आणि परखड बोलण्यासाठी प्रसिद्ध आहेत. अनेक सामाजिक प्रश्नांवर ते ठामपणे बोलताना दिसतात. नाना पाटेकर यांनी याच आपल्या परखड शैलीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची मुलाखत घेतली. यावेळी त्यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीच्या अनुषंगाने सर्वसामान्यांच्या मनातील प्रश्न शिंदे-फडणवीसांना विचारले. लोकमत वृत्तपत्र आयोजित ‘लोकमत महाराष्ट्रीय ऑफ द इयर पुरस्कार सोहळ्यात’ ही मुलाखत पार पडली.

नानांनी या मुलाखतीच्या सुरुवातीलाच एक प्रश्न विचारला. त्यामुळे शिंदे आणि फडणवीस दोघेही बुचकळ्यात पडले. मतदार म्हणून आमच्या मताला काही किंमत आहे का?, असा प्रश्न नाना पाटेकरांनी विचारला. त्यानंतर शिंदे-फडणवीस दोघेही हसले. फडणवीसांनी जरा सावरत आपलं उत्तर दिलं. आमची किंमत तुमच्या भरोश्यावर ठरते. त्यामुळे तुमची किंमत कमी झाली तर आमची किंमत कशी राहील?, असं फडणवीस म्हणाले.

एकदा मतदान केल्यानंतर पुढची पाच वर्षे आम्ही गणतीत नसतो. आम्ही सर्वासामान्य लोक मतदान करतो. कुणा पक्षाला बहुमत देतो. काही कामं होण्याची अपेक्षा असते. ते काम तुम्ही केलं नाही. तर आम्ही काय करायचं? पाच वर्षानंतर जो काही निर्णय घ्यायचा तो घेऊच पण त्या आधी आम्ही काय करायचं?, असा प्रश्न नानांनी विचारला.

नाना पाटेकरांच्या या प्रश्नाला मुख्यमंत्री शिंदेंनी उत्तर दिलं. 2019 ला जनतेच्या मताला डावललं गेलं. तीच चूक सुधारण्यासाठी तीन महिन्यापूर्वी हे बदल झाले.

लगोलग नानांनी पुढचा प्रश्न केला. या सगळ्या बदलाला अडीच वर्षे का लागली? या प्रश्नावर शिंदे म्हणाले, कोणतीही गोष्ट घडायला काळ-वेळ पाहिजे ना… मध्यंतरी कोरोना होता त्यामुळे आम्ही तो निर्णय घेतला नाही. शिंदेंच्या या उत्तराला जोडूनच फडणवीस म्हणाले, फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून सरकार चालत नाही. त्यामुळे कोरोना संपताच आम्ही प्रत्यक्ष भेटून हा निर्णय घेतला. एकत्रित आलो. फिजिकल सरकार स्थापन केलं.

नाना पाटकरेंनी या मुलाखती दरम्यान अनेक असे प्रश्न विचारले ज्याने फडणवीस आणि शिंदे यांनाही उत्तरं देताना दोनदा विचार करावा लागला.