राज्यात ब्रम्हा, विष्णु आणि महेश असं विकासाचं सरकार : नाना पटोले

| Updated on: Jan 12, 2020 | 11:44 PM

राज्यात ब्रम्हा, विष्णु आणि महेश असं विकासाचं सरकार आहे. या सरकारनं प्रथम शेतकर्‍यांची कर्जमाफी करुन एक मोठा ऐतिहासिक निर्णय घेतलाय, असं मत विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केलं (Nana Patole on Maha Vikas Aghadi Government).

राज्यात ब्रम्हा, विष्णु आणि महेश असं विकासाचं सरकार : नाना पटोले
Follow us on

अहमदनगर : राज्यात ब्रम्हा, विष्णु आणि महेश असं विकासाचं सरकार आहे. या सरकारनं प्रथम शेतकर्‍यांची कर्जमाफी करुन एक मोठा ऐतिहासिक निर्णय घेतलाय, असं मत विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केलं (Nana Patole on Maha Vikas Aghadi Government). संगमनेर येथे अमृतवाहिनी शेती आणि शिक्षण विकास संस्थेच्यावतीने सहकार, साहित्य, समाजसेवा, पर्यावरण या क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य असणाऱ्या व्यक्तींना प्रेरणा पुरस्काराने गौरवण्यात आलं. यावेळी नाना पटोले बोलत होते.

नाना पटोले म्हणाले, “राज्यात ब्रम्हा, विष्णु आणि महेश असं विकासाचं सरकार आहे. या सरकारनं प्रथम शेतकर्‍यांची कर्जमाफी करुन एक मोठा ऐतिहासिक निर्णय घेतलाय. मी विधानसभा अध्यक्ष या नात्याने जनतेचा प्रतिनिधी म्हणून काम करेल. जनतेची कामे सरकारकडून करुन घेण्यासाठी मी सरकारलाही धारेवर धरेल.”

मागील 5 वर्षांमध्ये आरक्षणासाठी विविध समाजाच्यावतीने आंदोलनं करण्यात आली होती. त्यामुळे 2021 मध्ये जातीनिहाय जनगणना करण्याचा ऐतिहासिक ठराव विधानसभेनं केलाय. जातनिहाय जनगणनेमुळे जाती-जातीतील भांडणं संपुष्टात येतील, असंही नाना पटोले यांनी नमूद केलं.

“संघाने महाराष्ट्राच्या तुकड्यांच्या प्रस्तावाऐवजी सर्वांगीन विकासाचे प्रस्ताव द्यावेत”

नाना पटोले यांनी महाराष्ट्राच्या विभाजनाच्या मुद्द्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर (RSS) जोरदार टीका केली. ते म्हणाले, “संघाच्या मा. गो वैद्य यांनी महाराष्ट्राचे 4 राज्यांमध्ये विभाजन करण्याचं वक्तव्यं केलं. मात्र, त्यांनी महाराष्ट्राचे तुकडे करण्याचे प्रस्ताव देण्यापेक्षा सर्वांगीन विकासाचे प्रस्ताव द्यायला हवेत. संयुक्त महाराष्ट्र देशात शक्तिशाली बनवण्यासाठी विकासाचे प्रस्ताव द्यावेत.”

महसुलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्यात सर्वांना सोबत घेऊन जाण्याची क्षमता आहे. मधल्या काळात नगर जिल्ह्यातील लोकांनी थोरातांना खुप त्रास दिला. मात्र, ते डगमगले नाहीत, असं सांगत नाना पटोलेंनी विखेंना नाव न घेता टोला लगावला. या कार्यक्रमासाठी राजस्थानचे उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.