महाराष्ट्रात काँग्रेसला गतवैभव प्राप्त करुन देऊ, काँग्रेस कार्यकरिणी बैठकीत ठराव मंजूर

| Updated on: Sep 23, 2021 | 8:04 PM

सर्वांनी मिळून एकत्रितपणे जातीय, धर्मांध शक्तींविरोधात पूर्ण ताकतीनिशी लढून महाराष्ट्रात पुन्हा काँग्रेस पक्षाला गतवैभव मिळवून देऊ, असा ठराव काँग्रेस कार्यकारिणीत मंजूर करण्यात आला आहे. तशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे.

महाराष्ट्रात काँग्रेसला गतवैभव प्राप्त करुन देऊ, काँग्रेस कार्यकरिणी बैठकीत ठराव मंजूर
काँग्रेस कार्यकारिणी बैठक
Follow us on

मुंबई : राज्यात काँग्रेस पक्षाला क्रमांक एकचा पक्ष बनविण्याचा ठराव महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या नवनियुक्त कार्यकारिणीत एकमताने मंजूर करण्यात आला. सर्वांनी मिळून एकत्रितपणे जातीय, धर्मांध शक्तींविरोधात पूर्ण ताकतीनिशी लढून महाराष्ट्रात पुन्हा काँग्रेस पक्षाला गतवैभव मिळवून देऊ, असा ठराव काँग्रेस कार्यकारिणीत मंजूर करण्यात आला आहे. तशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे. (Making the Congress number one party in Maharashtra, Congress executive meeting resolutions)

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांची बैठक आज प्रदेश काँग्रेसचे मुख्यालय टिळक भवन येथे आयोजित करण्यात आली. बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना पटोले म्हणाले की, या कार्यकारिणीत केंद्र सरकारच्या अनेक धोरणांच्या निषेधाचे ठराव करण्यात आले. केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने आपल्या उद्योगपती मित्रांच्या फायद्यासाठी आणलेल्या कृषी कायद्यांमुळे देशातील शेतकरी व शेती उद्ध्वस्त होणार आहे. या कायद्यांमुळे शेतकऱ्यांना बड्या उद्योगपतीचे गुलाम बनवण्याचा केंद्रातील मोदी सरकारचा डाव आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी या काळ्या कृषी कायद्यांचा विरोध करत असून हे कायदे रद्द होईपर्यंत संघर्ष करत राहण्याचा ठराव मंजूर करण्यात आला.

महागाई, बेरोजगारीवरुन केंद्रावर निशाणा

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे देशात महागाई प्रचंड प्रमाणात वाढली आहे. इंधनाचे दर 100 रूपये लिटरच्या वर गेले आहेत. खाद्यतेलाचे दर 200 रू. किलो तर स्वयंपाकाचा गॅस 900 रूपयांवर गेला आहे. या प्रचंड दरवाढीमुळे सर्वसामान्यांचे जगणे मुष्कील झाले आहे. त्यासोबतच मोदी सरकारच्या गलथानपणामुळे देशात मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढली आहे. देशातील बेरोजगारी गेल्या 45 वर्षातील उच्चांकी पातळीवर पोहोचली आहे. महागाई व बेरोजगारी वाढवून सर्वसामान्य जणांचे जगणे मुष्कील करणा-या व बेरोजगारी वाढवून तरूणांचे भविष्य उद्धवस्त करणाऱ्या केंद्र सरकारच्या निषेधाचा ठराव मंजूर करण्यात आला. राज्यातील महिलांच्या सुरक्षेसाठी आंध्र प्रदेशातील शक्ती कायद्याच्या धर्तीवर राज्यात कायदा करण्याचा ठरावही कार्यकारिणीत करण्यात आला.

ओबीसी आरक्षणावरुन केंद्र सरकारचा निषेध

केंद्र सरकार ओबीसी व मराठा आरक्षणाचे मारेकरी आहे. ओबीसी जनगणनेचा डेटा केंद्र सरकारने दिला नाही, त्यामुळे ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द झाले. तर आरक्षणाची 50 टक्क्यांची मर्यादा केंद्र सरकारने हटवली नाही. त्यामुळे मराठा समाज आरक्षणापासून वंचित आहे. ओबीसी व मराठा आरक्षणाचे मारेकरी असणाऱ्या केंद्र सरकारचा निषेधाचा आणि कामगार कायद्यांत बदल करून कामगारांना उद्धवस्त करणा-या केंद्र सरकारच्या निषेधाचा ठरावही या बैठकीत करण्यात आला.

पूरग्रस्तांना मदत, प्रभाग रचनेबाबतही ठराव

नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीने मराठवाड्यासह राज्यातील विविध भागात शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या अतिवृष्टी व पूरग्रस्त भागातील शेतकऱ्यांना सरकारने तातडीने मदत द्यावी असा ठरावही करण्यात आला. आगामी महानगरपालिका, नगरपालिका निवडणुकांमध्ये तीन सदस्यीय प्रभाग पद्धतीचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. परंतु काँग्रेसच्या बहुसंख्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा त्याला विरोध आहे. त्यामुळे तीन ऐवजी दोन सदस्यांचा प्रभाग असावा अशी काँग्रेसची भूमिका आहे. यासंबंधीचा ठरावही कार्यकारिणीत एकमुखाने मंजूर केला असून याबाबत मुख्यमंत्र्यांना विनंती केली जाणार असल्याचे नाना पटोले यांनी सांगितले.

प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान, चंद्रकांत हंडोरे, बसवराज पाटील, आ. प्रणिती शिंदे, उपाध्यक्ष हुसेन दलवाई, मोहन जोशी, शिरीष चौधरी, संजय राठोड, रमेश बागवे, डॉ. प्रज्ञा राजीव सातव, आ. अमर राजूरकर, आ.धीरज देशमुख, भाई नगराळे, रामहरी रूपनवर, विशाल पाटील, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव व राज्याचे सहप्रभारी आशिष दुआ, महिला प्रदेशाध्यक्ष संध्याताई सव्वालाखे, एनएसयुआयचे प्रदेशाध्यक्ष अमीर शेख, किसान काँग्रेसचे श्याम पांडे, प्रदेश सरचिटणीस देवानंद पवार यांच्यासह सर्व नवनियुक्त प्रदेश पदाधिकारी उपस्थित होते.

इतर बातम्या :

तुमचं लक्ष कुठे आहे?, महिला अत्याचाराच्या मुद्द्यावरुन अमृता फडणवीसांचा मुख्यमंत्र्यांना सवाल

‘दिल्लीवरुन फोन आल्यानं राज्यपालांनी सही केली असेल’, नाना पटोलेंचा खोचक टोला

Making the Congress number one party in Maharashtra, Congress executive meeting resolutions