बारा बलुतेदार समाज घटकाला न्याय मिळवून देणार, नाना पटोलेंची ग्वाही

| Updated on: Sep 08, 2021 | 7:26 PM

जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी आपण नेहमी तत्पर असून बारा बलुतेदारांच्या समस्यांबाबत यापूर्वीही चर्चा झाली आहे. आज अनेक मागण्या करण्यात आल्या आहेत या मागण्यासंदर्भात राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठपुरावा करु आणि या समस्या मार्गी लावू.

बारा बलुतेदार समाज घटकाला न्याय मिळवून देणार, नाना पटोलेंची ग्वाही
बारा बलुतेदार महासंघाचं नाना पटोलेंना निवेदन
Follow us on

मुंबई : राज्यातील बारा बलुतेदार समाज घटकाचे अनेक प्रश्न प्रलंबित असून त्यांच्या मागण्यांचा सरकार दरबारी पाठपुरावा करुन या समाज घटकाला न्याय मिळवून देऊ, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे. गांधी भवन येथे बारा बलुतेदार महासंघाच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी बारा बलुतेदार महासंघाचे प्रदेशाध्यक्ष कल्याण दळे, चंद्रपूरचे खासदार बाळू धानोरकर यांच्यासह राज्यभरातून आलेले पदाधिकारी उपस्थित होते. (Nana Patole promises to bring justice to the Bara Balutedar community)

नाना पटोले पुढे म्हणाले की, जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी आपण नेहमी तत्पर असून बारा बलुतेदारांच्या समस्यांबाबत यापूर्वीही चर्चा झाली आहे. आज अनेक मागण्या करण्यात आल्या आहेत या मागण्यासंदर्भात राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठपुरावा करु आणि या समस्या मार्गी लावू. समाजातील वंचित घटकाला न्याय देण्याचा काँग्रेस पक्षाचा नेहमीच प्रयत्न राहिलेला आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कार्यकारिणीतही ओबीसी तसेच बारा बलुतेदार समाजातील लोकांना प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न केलेला आहे. यापुढेही या समाज घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न राहिल.  विधानसभेचा अध्यक्ष असताना ओबीसी समाजाची जनगणना करण्याचा ठराव करुन देशात आदर्श घालून दिला त्यानंतर इतर राज्यांनीही तशीच मागणी लावून धरली. ओबीसी समाजाची जनगणना केल्यास अनेक समस्यांच्या मुळापर्यंत जाता येईल. निवडणुकीच्या तोंडावर काही राजकीय पक्ष प्रलोभणे दाखवतात त्यांना मात्र बळी पडू नका असे आवाहनही पटोले यांनी केले.

बारा बलुतेदार महासंघाचं पटोलेंना निवेदन

बारा बलुतेदारांचे आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे, बारा बलुतेदार, भटके विमुक्त, एसबीसी व मुस्लीम ओबीसींच्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी 50 टक्के जागा आरक्षित ठेवणे, बारा बलुतेदार कुशल कारागिरांच्या व्यवसायास लघु उद्योगाचा दर्जा देऊन अल्पदराने कर्ज उपलब्ध करुन देणे, ओबीसी समाजाची जातीनिहाय जनगणना करावी तसेच ओबीसींच्या राजकीय आरक्षणाशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेऊ नयेत आदी मागण्यांचे निवेदन बारा बलुतेदार महासंघाने प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे सादर केले.

सरसंघचालक मोहन भागवतांना टोला

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी हिंदू असो वा मुस्लिम सर्वांचा डीएनए एकच असल्याचं विधान केलं आहे. त्यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काल टीका केली. मोहन भागवत कुठले डॉक्टर आहेत हे तपासावे लागेल, असा खोचक टोला नाना पटोले यांनी लगावला आहे. मोहन भागवत कुठले डॅाक्टर आहेत ते तपासावे लागेल, संविधानात समभावाची भावना विशद करण्यात आली आहे. सर्वधर्म समभावाची भावाना काँग्रेसने मांडली आहे. रक्त एक आहे असं म्हणण्यापेक्षा सर्व धर्म समभाव असं मोहन भागवत बोलले असते तर त्याचं स्वागत केलं असतं, असं नाना पटोले म्हणाले होते.

ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका नकोच

दरम्यान, पटोले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या सर्व निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय घेऊ नका, अशी मागणी मुख्यमंत्र्यांना केली. मागासवर्गीय आयोगाने मागितलेले 450 कोटी रुपयांचा निधी राज्य सरकारने द्यावा, अशी मागणीही त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

इतर बातम्या :

राज्य आणि केंद्र सरकारचा एफआरपीचे तुकडे पाडण्याचा घाट, राजू शेट्टींचा गंभीर आरोप

खासदार रामदास तडस यांच्या मुलगा आणि पूजाचा अखेर वैदिक पद्धतीनं विवाह, वादावर पडदा पडणार?

Nana Patole promises to bring justice to the Bara Balutedar community