मोदींना ‘मृत्यूचा उत्सव’ साजरा करण्याची हौस; नाना पटोलेंची खोचक टीका

| Updated on: Apr 17, 2021 | 3:09 PM

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर अत्यंत खोचक टीका केली आहे. (nana patole slams narendra modi over corona surges in country)

मोदींना ‘मृत्यूचा उत्सव’ साजरा करण्याची हौस; नाना पटोलेंची खोचक टीका
nana patole-narendra modi
Follow us on

मुंबई: काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर अत्यंत खोचक टीका केली आहे. मोदींना मृत्यूचा उत्सव साजरा करण्याची हौस आहे, अशी टीका करतानाच काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या सूचना ऐकल्या असत्या तर आज लाखो जीव वाचले असते, असं नाना पटोले यांनी म्हटलं आहे. (nana patole slams narendra modi over corona surges in country)

नाना पटोले यांनी एक प्रेस रिलीज काढली आहे. त्यात मोदी सरकारवर सडकून टीका करण्यात आली आहे. कोरोना महामारीच्या संकटाची चाहूल लागताच काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी मोदी सरकारला धोक्याची जाणीव करून दिली होती. महामारीच्या या वर्षभरात सातत्याने कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत सकारात्मक सूचना केल्या. परंतु, सत्तेच्या अहंकाराने आपल्याच मस्तीत दंग असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षाचे नेत्यांनी राहुल गांधी यांना गांभीर्याने घेत नाही असे म्हणत त्यांची खिल्ली उडवण्याचा पोरकटपणा केला. राहुल गांधींनी वेळोवेळी केलेल्या विधायक सूचनांना मोदी सरकारने गांभीर्याने घेतले असते तर आज देशात हजारो चिता जळतानाचे विदारक चित्र पाहण्याची वेळ आपल्यावर आली नसती. आतातरी मोदी सरकारने झोपेतून जागे व्हावे आणि 130 कोटी जनतेच्या जिवीताकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, असे आवाहन पटोले यांनी केलं आहे.

लोक मरताहेत, भाजप निवडणुकीत दंग

देशभरात कोरोना वेगाने वाढत असताना त्यावर ठोस उपाययोजना करण्याऐवजी पंतप्रधान नरेंद्र मोदी. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि अख्खा भारतीय जनता पक्ष फक्त पाच राज्यांच्या निवडणूक प्रचारात दंग आहे. लोक वैद्यकीय उपचाराअभावी प्राण सोडत असताना ‘मृत्यूचा उत्सव’ साजरा करण्याची मोदींची हौस अजून संपलेली दिसत नाही. गरीब, असहाय्य जनतेच्या मृतदेहावर उभे राहून निवडणुकीचा प्रचार करणारा पंतप्रधान म्हणून देशाच्या इतिहासात नरेंद्र मोदींची नोंद होईल, अशी खवचट टीकाही त्यांनी केली.

मोदी, भाजप बेफिकीर

देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. कोरोनाच्या रुग्णसंख्येत दररोज 2 लाखांपेक्षा जास्त रूग्णांची भर पडत आहे, तर हजारो लोक मृत्यूमुखी पडत आहेत. रुग्णालयात बेड्स मिळत नाहीत, रेमडेसिवीर व ऑक्सिजनअभावी रुग्णांचे जीव जात आहेत आणि अंत्यसंस्कारासाठीसुद्धा रांगा लावाव्या लागत आहेत, असे विदारक चित्र देश उघड्या डोळ्यांनी पहात आहे. परंतु केंद्रातील भाजप सरकारला याचे काही सोयरसूतक नाही. देश कोरोनाच्या आगीत होरपळत असताना देशाचे पंतप्रधान आणि भाजप निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त आहे. हा बेफिकीरपणाच आज देशातील जनतेच्या मुळावर उठला आहे, अशी टीका त्यांनी केली आहे.

राहुल गांधींच्या सूचनांकडे दुर्लक्ष

कोरोनाचा प्रार्दुभाव सुरु झाल्यापासून राहुल गांधी सातत्याने केंद्र सरकारला आर्थिक पातळीवर होऊ शकणारे नुकसान तसेच वैद्यकीय क्षेत्रात करावयाच्या उपाययोजनांवर सूचना करत असताना देशाचे पंतप्रधान मात्र जनतेला टाळ्या, थाळ्या वाजवायला आणि दिवे लावायला सांगत होते. 12 फेब्रुवारी 2020 रोजी राहुल गांधी यांनी केंद्र सरकारला गंभीर परिणामाचा इशारा दिला होता. आज एक वर्षानंतरही तीच परिस्थिती कायम आहे. नोटाबंदी, चुकीच्या पद्धतीने केलेली जीएसटीची अंमलबजावणी, कोणतीही पूर्वसूचना न देता व नियोजन न करता अचानक लावलेल्या लॉकडाऊनमुळे अर्थव्यवस्था ऐतिहासिक रसातळाला गेली. लॉकडाऊनमध्ये अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी गरिबांच्या बँक खात्यात रोख रक्कम जमा करण्याची सूचना राहुल गांधी यांनी मोदी सरकारला केली होती पण नेहमीच्या सवयीप्रमाणे त्याकडे दुर्लक्ष केले गेले त्याची फळं देशातील गरीब जनता भोगते आहे, असा हल्लाही त्यांनी चढवला आहे. संकटाच्या काळात सर्वांनी एकत्र येऊन मुकाबला करणे अपेक्षित असताना आपले राजकीय दुकान चालू रहावे यासाठी भाजपची धडपड सुरु असून भाजपाचा विकृत चेहरा आता जनतेसमोर आला आहे, असंही ते म्हणाले. (nana patole slams narendra modi over corona surges in country)

तर परिस्थिती गंभीर होईल

कोरोनाला रोखण्यासाठी सध्यातरी लसीकरणाशिवाय दुसरा पर्याय नाही. त्यामुळे जगभरात उपलब्ध असणाऱ्या लसींना परवानगी देऊन देशातील लसीकरणाचा वेग वाढवावा अशी सूचना राहुल गांधी यांनी केली होती. त्यावेळी राहुल गांधी औषध कंपन्यांसाठी लॉबिंग करत असल्याचा पोरकट आरोप केला आणि नंतर चार दिवसातच केंद्र सरकारने परदेशी लसींना परवानगी दिली. कोरोना लसीकरणासाठी वयाची अट शिथील करून 18 वर्षांवरील सर्व नागरिकांना लस देण्याची मागणी आम्ही केली आहे. सरकारने त्यावर गांभीर्यांने विचार करून तातडीने निर्णय घेतला नाही तर परिस्थिती आणखी गंभीर होईल, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली. (nana patole slams narendra modi over corona surges in country)

 

संबंधित बातम्या:

महाराष्ट्राला रेमडेसिवीर विकू नका, केंद्राची कंपन्यांना धमकी; नवाब मलिक यांचा गंभीर आरोप

Pune Lockdown Update:पुण्यात कडक लॉकडाऊन, अत्यावश्यक सेवेची दुकानंही बंद, संचारबंदी तोडणाऱ्यांवर कारवाईचा पोलिसांचा इशारा

मृत्यूनंतरही भोग सरेना, टेस्ट पॉझिटिव्ह आल्याने सर्व कब्रस्थानचा दफनविधीला नकार

(nana patole slams narendra modi over corona surges in country)