भान ठेवून बोललं तर असे प्रसंगच येणार नाहीत, राणेंच्या अटकेवर अजित पवारांची प्रतिक्रिया

| Updated on: Aug 28, 2021 | 8:04 AM

नारायण राणे आणि शिवसेना नेत्यांमध्ये आता वैयक्तिक आरोप-प्रत्यारोपांनाही सुरुवात झाल्याचं पाहायला मिळत आहे. अशावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नारायण राणेंना खोचक टोला लगावलाय. तसंच प्रत्येकानं भान ठेवून वक्तव्य केली तर असे प्रसंगच आले नसते, अशी टीकाही अजित पवार यांनी केलीय.

भान ठेवून बोललं तर असे प्रसंगच येणार नाहीत, राणेंच्या अटकेवर अजित पवारांची प्रतिक्रिया
केंद्रीय मंत्री नारायण राणे, उपमुख्यमंत्री अजित पवार
Follow us on

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केलेलं आक्षेपार्ह विधान आणि त्यानंतर राणेंना झालेली अटक व सुटका, यावरुन राज्यातील राजकीय वातावरुन ढवळून निघालं आहे. अशावेळी राज्यात शिवसेना विरुद्ध भाजप असं चित्र पाहायला मिळत आहेत. नारायण राणे आणि शिवसेना नेत्यांमध्ये आता वैयक्तिक आरोप-प्रत्यारोपांनाही सुरुवात झाल्याचं पाहायला मिळत आहे. अशावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नारायण राणेंना खोचक टोला लगावलाय. तसंच प्रत्येकानं भान ठेवून वक्तव्य केली तर असे प्रसंगच आले नसते, अशी टीकाही अजित पवार यांनी केलीय.  (Criticism of Ajit Pawar from the Ministry of Union Minister Narayan Rane)

राज्यात सुरु असलेल्या आरोप प्रत्यारोपांपेक्षा राणेंनी त्यांच्या खात्याकडून राज्यासाठी निधी आणला तर योग्य राहिल, तुम्ही काय सांगाल? असा प्रश्न एका पत्रकाराने अजित पवार यांना विचारला त्यावर ‘सुक्ष्म आणि लहानमध्ये काय निधी मिळणार आहे? निधी द्यायचा झाला तर गडकरी साहेबांचा विभाग देऊ शकतं. गडकरींनी यापूर्वीही दिला आहे. कामंही चाललेली आहेत. सध्या कोरोनाचं संकट असल्यामुळे सुक्ष्म आणि लघू असे उद्योग खूप अडचणीत आले आहेत. देशपातळीवर याबाबत मोठा निर्णय घेता येत असावा. तुम्हाला आठवत असेल की कोरोनाच्या पहिल्या लाटेत अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी 25 लाख कोटीचं पॅकेज दिलं होतं. त्यात किती फायदा झाला, झाला की नाही? हा संशोधनाचा भाग आहे’, असं खोचक उत्तर अजित पवार यांनी दिलं.

‘प्रत्येकाने भान ठेवून वक्तव्य केली पाहिजेत’

तसंच ‘प्रत्येकाला आपला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. या चौघांना मंत्रीपत्र मिळालं. त्यानंतर वरुन आदेश मिळाले की जावा फिरा. आता वरुन आदेश मिळालेत म्हणल्यावर फिरणं भागच आहे वरिष्ठांनी सांगितल्यानंतर. वास्तविक सोशल मीडियावर लोक काय प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत ते पाहा. कारण, नसताना वेगळं, प्रत्येकाने भान ठेवून वक्तव्य केली तर असे प्रसंगच आले नसते ना. इतरांनीही मागे काही वक्तव्य केली पण तेव्हा त्यांनी शपथ घेतली नव्हती. मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर एक जबाबदार व्यक्ती म्हणून बोललं पाहिजे. परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन पावलं उचलावी लागतात. निर्णय घ्यावे लागतात. लोकांना, सगळ्यांना न्याय द्यावा लागतो’, असा टोलाही अजित पवार यांनी राणेंना लगावला आहे.

राणेंच्या जन-आशीर्वाद यात्रेत शेलारांचा इशारा

दुसरीकडे भाजप नेत्यांकडूनही शिवसेना आणि महाविकास आघाडीला इशारा देण्यात आलाय. भाजप आमदार आशिष शेलार यांनी जनआशीर्वाद यात्रेच्या व्यासपीठावरुनच हा इशारा दिला आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाबाबत मुख्यमंत्र्यांचे अज्ञान उघड केले म्हणून एवढा मोठा थयथयाट केलात का? असा सवाल करीत भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी केलाय. तसंच ‘हम किसी को छेडेंगे नहीं, कोई हमको छेड़ेगा तो उसको छोड़ेंगे नहीं’, असा इशाराही शेलार यांनी शिवसेनेला दिलाय. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जन-आशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने आज लांजा येथे संवाद सभा झाली यावेळी बोलताना आमदार आशिष शेलार यांनी ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली. मंत्री नारायण राणे यांना झालेली अटक आणि शिवसेनेने केलेला तमाशा याचे खरे कारण काय होते? मुख्यमंत्र्यांचे अज्ञान राणें यांनी उघड केले म्हणून एवढा राग आला का? अशी प्रश्नांची सरबत्तीच शेलार यांनी यावेळी केलीय.

संबंधित बातम्या :

दिशा सालियानची बलात्कारानंतर हत्या, सगळं बोललो तर परवडणार नाही : नारायण राणे

‘वैयक्तिक टीका कराल तर उत्तर मिळणारच’, नारायण राणेंना शिवसेना नेत्यांचा इशारा

Criticism of Ajit Pawar from the Ministry of Union Minister Narayan Rane