स्पेशल रिपोर्ट : जेव्हा भाजप मुख्यमंत्रिपदावर अडले होते, तेव्हा ‘शिवसैनिक’ राणे नडले होते

| Updated on: Nov 14, 2019 | 12:27 PM

2002 मध्ये आघाडी सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव आणला गेला. राणेंनी अपक्षांबरोबरच राष्ट्रवादीचे अनेक आमदार गळाला लावले. जोगेश्वरीच्या मातोश्री क्लबमध्ये सत्ताधाऱ्यांचे आमदार जमवण्यात राणेंना यशही आलं.

स्पेशल रिपोर्ट : जेव्हा भाजप मुख्यमंत्रिपदावर अडले होते, तेव्हा शिवसैनिक राणे नडले होते
Follow us on

मुंबई : सत्तानाट्याच्या विसाव्या दिवशी नारायण राणेंची (Narayan Rane entry in Maharashtra Political crisis) एन्ट्री झाली आणि सगळ्यांच्या भुवया पुन्हा एकदा उंचावल्या. भाजपसाठी 145 आमदार जमवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं राणे (Narayan Rane entry in Maharashtra Political crisis) म्हणाले आहेत. अर्थात भाजपनं ही राणेंची वैयक्तिक भूमिका असल्याचं सांगत स्वतःला या विधानापासून दूर ठेवलं. मात्र राणेंनी असा प्रयोग एकदा याआधीही करुन पाहिला आहे.

3 दिवसांपूर्वी भाजपनं सत्तास्थापनेस नकार देत शिवसेनेला शुभेच्छा दिल्या. त्यानंतर दुसऱ्याच क्षणी शिवसेना आणि आघाडीच्या गोटात हालचालींना वेग आला. दिल्ली आणि मुंबईत बैठकांचं सत्र सुरु झालं. बैठकांच्या या दोन दिवसात भाजपच्या नेत्यांनी ”वेट अँड वॉच; या दोन शब्दांपलीकडे एकही प्रतिक्रिया दिली नाही.  मात्र काल जेव्हा पहिल्यांदा शिवसेना-काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आघाडीची शक्यता दिसली, तेव्हा 20 दिवसांपासून रंगलेल्या या सत्तानाट्यात नारायण राणेंची एन्ट्री झाली.

उपयुक्तता आणि उपद्रवमूल्य या दोन्ही गोष्टी राणेंच्या जमेच्या बाजू आहेत. त्यामुळेच या सत्तानाट्यात राणेंची एन्ट्री ज्यावेळेला झाली, ती वेळही महत्वाची आहे. नारायण राणेंनी याआधीही मॅजिक फिगरसाठी इतर पक्षात सुरुंग लावण्याचा प्रयत्न केला होता. मात्र तो प्रयत्न अयशस्वी ठरला. साल होतं 2002. तेव्हा नारायण राणे शिवसेनेत होते. 1999 साली स्वतंत्र लढून नंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं आघाडी केली. विलासराव देशमुख मुख्यमंत्री झाले. तेव्हाही जनतेचा कौल युतीच्या बाजूनं होता. मात्र भाजप मुख्यमंत्रीपदावर अडून बसली  आणि अपक्षांच्या साथीनं आघाडीनं डाव जिंकला.

पुढे 2002 मध्ये आघाडी सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव आणला गेला. राणेंनी अपक्षांबरोबरच राष्ट्रवादीचे अनेक आमदार गळाला लावले. जोगेश्वरीच्या मातोश्री क्लबमध्ये सत्ताधाऱ्यांचे आमदार जमवण्यात राणेंना यशही आलं. आघाडी सरकारचा दबाव वाढू लागला, पण राणे त्याला बदले नाहीत. मात्र, जमवलेल्या आमदारांमधून शहाद्याचे पद्माकर वळवी निसटले आणि राणेंनी जमवलेला सगळा डाव एकाच क्षणात बिघडला.

असं असलं तरी भविष्यात जर घोडेबाजाराला वेग आलाच, तर त्याचं खापर आपल्यावर फुटू नये म्हणून राणेंच्या या भूमिकेपासून भाजपनं स्वतःला दूर ठेवलंय हे विशेष.  मात्र तेव्हाचे नारायण राणे आणि आत्ताचे नारायण राणे, तेव्हाची परिस्थिती आणि आत्ताची परिस्थिती यातही बराच फरक आहे. तरीही राणे या खेपेला काय करतात हे पाहणं महत्वाचं आहे.

VIDEO :