Modi Cabinet Expansion : राणेंना मंत्रिपद म्हणजे शिवसेनेच्या जखमेवर मीठ? सेना-भाजप एकत्र येण्यात कायमचा अडथळा? वाचा सविस्तर

| Updated on: Jun 14, 2021 | 11:09 PM

नारायण राणे यांना केंद्रात मंत्री केलं जाण्याची जोरदार चर्चा आहे. त्यासाठी राणे दिल्लीतही गेल्याचं समजतं. पण खरंच राणेंना मंत्री केलं तर त्याचा सगळ्यात मोठा इफेक्ट राज्याच्या राजकारणात होऊ शकतो आणि तोही शिवसेनेसोबत.

Modi Cabinet Expansion : राणेंना मंत्रिपद म्हणजे शिवसेनेच्या जखमेवर मीठ? सेना-भाजप एकत्र येण्यात कायमचा अडथळा? वाचा सविस्तर
narayan rane uddhav thackeray
Follow us on

मुंबई : मोदी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराची जोरदार चर्चा आहे. गेल्या आठवड्याभरापासून दिल्लीत भाजपच्या जोरबैठका सुरु आहेत. त्यातच नारायण राणे यांना केंद्रात मंत्री केलं जाण्याची जोरदार चर्चा आहे. त्यासाठी राणे दिल्लीतही गेल्याचं समजतं. पण खरंच राणेंना मंत्री केलं तर त्याचा सगळ्यात मोठा इफेक्ट राज्याच्या राजकारणात होऊ शकतो आणि तोही शिवसेनेसोबत. (Narayan Rane likely to get central ministerial post is BJP trying to tease Shivsena)

राणे म्हणजे शिवसेनेची जखम

शिवसेनेनं नारायण राणेंना मुख्यमंत्री केलं. बाळासाहेबांनी तो विश्वास दाखवला. पण बाळासाहेबांच्या हयातीतच राणेंनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केला आणि बाहेर पडले. उद्धव ठाकरेंची शिवसेनेत चलती सुरु झालेली होती. त्याचाच परिणाम म्हणून राणे बाहेर पडले. ते फक्त बाहेरच पडले असते तर शिवसेना नेतृत्वाला फार वाईट वाटलं नसतं. पक्ष म्हटल्यानंतर लोक येत जात राहणार. पण राणे बाहेर पडले आणि त्यांनी कधी शिवसेनेवर तर कधी ठाकरे कुटुंबावर थेट हल्ला चढवला. बाळासाहेबांचा त्यांनी आदर राखला पण उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरेंवर मात्र एकेरी भाषेत हल्ले चढवले. आजही राणेंचा, त्यांच्या मुलाचा उद्धव ठाकरे किंवा आदित्य ठाकरे यांच्यावर टिका केल्याशिवाय दिवस जात नाही. विशेष म्हणजे टिका करताना भाषेची कुठलीच मान-मर्यादा पाळलेली नसते. राणे म्हणजे शिवसेनेची भळभळती जखम आहे.

शिवसेनेच्या जखमेवर मीठ

राणेंना मंत्री केलं तर ते शिवसेनेच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखं आहे. सेना-भाजपची युती होती त्यावेळेसही राणेंना भाजपात कुठलंच स्थान मिळणार नाही याचे सर्व प्रयत्न शिवसेनेनं केल्याची चर्चा होती. काही काळ ती चर्चा चालू होती. नंतर सेना-भाजपच वेगळे झाले. राणे भाजपचे आधी सहयोगी नेते झाले आणि नंतर ते भाजपच्याच कोट्यातून थेट राज्यसभेवर गेले. भाजपात गेल्यावर राणेंनी शिवसेना आणि त्यांच्या नेत्यांवरचे एकेरी भाषेतले हल्ले आणखी तीव्र केले. अशा नेत्याला केंद्रात मंत्री केलं तर हे शिवसेनेच्या जखमेवर मीठ चोळल्यासारखं होईल अशी चर्चा आताच सोशल मीडियावर झडू लागली आहे.

भाजप-सेना युती खडतर होणार?

अलिकडेच उद्धव ठाकरे हे दिल्लीत नरेंद्र मोदींना एकांतात अर्धा तास भेटले. त्या भेटीनंतर राज्यात शिवसेनेचा सुरच बदलून गेला आहे. राऊतांनी मोदींची स्तुती केली आहे. एवढच नाही तर पंतप्रधानपदासाठी इतर कुठला चेहरा नसल्यामुळे आगामी निवडणुकीतही मोदीच पंतप्रधान होतील असही राऊत म्हणाले. एका भेटीनं बरंच काही बदललेलं दिसतं आहे. त्यामुळेच भाजप-सेना पुन्हा एकत्र येऊ शकतात अशीही जोरदार चर्चा सुरु झाली आहे. पण राणेंना अचानक केंद्रात मंत्री केलं तर ही युती होणार कशी? कारण शिवसेनेसाठी राणे हा इगोचा इश्शू आहे. सेनेच्या टिकाकारलाच जर मंत्री केलं तर शिवसेना-भाजप आणखी दुरावतील की एकत्र येतील? ह्या प्रश्नाचं उत्तर सोपं आहे. त्यामुळे राणेंना मंत्री करणं म्हणजे भाजप-सेनेची युतीचा मार्ग आणखी खडतर करण्यासारखं आहे हे निश्चित.

इतर बातम्या :

Modi Cabinet Expansion : नारायण राणेंना केंद्रात मंत्री बनवण्यामागे भाजपाची कोणती खेळी असू शकते? हे 5 कारणे लक्षात ठेवा!

Modi cabinet expansion 2021 : नारायण राणे, प्रीतम मुंडेंना केंद्रात स्थान मिळण्याची शक्यता किती?

Modi cabinet expansion 2021 : प्रीतम मुंडे यांना केंद्रात मंत्रिपद मिळण्याची शक्यता, मोदी कॅबिनेट विस्ताराच्या हालचाली

(Narayan Rane likely to get central ministerial post is BJP trying to tease Shivsena)