
नवी दिल्ली | 10 ऑगस्ट 2023 : राहुल गांधी यांनी काल मणिपूरच्या मुद्द्यावरून सरकारवर टीका केली. सरकार असंवेदनशील असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. शिवाय मणिपूरमध्ये भारतमातेची हत्या करण्यात आली आहे. माझी एक आई इथं बसली आहे तर दुसरी आई मणिपूरमध्ये आहे. केंद्र सरकार मारेकरी आहे. तुम्ही देशप्रेमी नाही तर देशद्रोही आहात, असं म्हणत राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर हल्ला चढवला. राहुल गांधी यांच्या भाषणाची देशभर जोरदार चर्चा झाली. पण या भाषणावेळीच्या कृतीवर भाजपने आक्षेप घेतला. राहुल गांधी यांनी संसदेत फ्लाईंग किस दिल्याचा आरोप मंत्री स्मृती इराणी यांनी केला. त्यावर काँग्रेसच्या खासदार रजनी पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मी स्वतः प्रेक्षक गॅलरीत बसून होते, मी ते सगळं पाहिलं… त्यांनी प्रेमाची झप्पी म्हणून तो किस दिला त्याचा चुकीचा अर्थ काढला जातोय. राहुल गांधी यांचे कागद खाली पडले होते. ते उचलत असताना भाजपचे खासदार हसत होते… तेव्हा त्यांनी उत्तर न देता फक्त हसत फ्लाईंग किस दिला. आता त्यावरून भाजप टीका करत आहे, असं रजनी पाटील म्हणाल्या.
राहुल गांधी यांनी फ्लाईंग किस दिल्याचा आरोप करत भाजप ठिकठिकाणी आंदोलनं केली जात आहेत. चुकीचे आरोप करत आंदोलन करणं हे चुकीचं आहे. स्मृती इराणी यांना प्रश्न आहे की मणिपूर जळत असताना त्यावर बोलत नाही. राहुल गांधी यावर बोलायला मुद्दा नाही म्हणून असं करता का तुम्ही?, असं रजनी पाटील म्हणाल्या.
मुळात अमित शाह यांनी कलावती यांचा चुकीचा उल्लेख केला. त्या बुंदेलखंड नाही तर विदर्भातील आहेत. खोट बोला पण रेटून बोला ही भाजपची नीती आहे. त्या कलावती ताई यांना घराची चावी दिली. तेव्हा मी स्वतः तिथं उपस्थित होते, असंही त्यांनी सांगितलं. आम्ही जे करतो त्याचा गाजावाजा करत नाही… राहुल गांधी यांनी निर्भयाच्या भावाला पायलट केलं. पण त्यावर मात्र कधी जाहिर भाष्य केलं नाही, असं रजनी पाटील म्हणाल्या.