7 भटक्या कुत्र्यांनी चिमुरडीचे 46 सेकंद लचके तोडले, शरीरावर असंख्य जखमा, 90 टाके; पिंपरीतील थरकाप उडवणारी घटना
Pimpri Chinchwad Dog Attack : पुण्याच्या पिंपरी चिंचवडमधून थरकाप उडवणारी बातमी समोर आली आहे. पिंपरी चिंचवड शहरातील भटक्या कुत्र्यांनी एका 5 वर्षीय चिमुकलीवर हल्ला करत अक्षरश तिचे लचके तोडले.

राज्यात सध्या भटक्या कुत्र्यांची संख्या वाढल्याचे समोर आले आहे. याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. अशातच आता पुण्याच्या पिंपरी चिंचवडमधून थरकाप उडवणारी बातमी समोर आली आहे. पिंपरी चिंचवड शहरातील भटक्या कुत्र्यांनी एका 5 वर्षीय चिमुकलीवर हल्ला करत अक्षरश तिचे लचके तोडले. ज्यामुळे या चिमुकलीच्या शरीरावर असंख्य जखमा झाल्या असून त्या जखमावर तब्बल 85 ते 90 टाके घालवे लागले आहेत. सुदैवाने या घटनेत जखमी झालेली अशिंका मिश्रा ही चिमुकली बचावली आहे मात्र या घटनेनं पिंपरी चिंचवड महापालिका प्रशासनाने तब्बल 7 कोटी खर्च करून खरच शहरातील भटक्या कुत्र्यांची नसबंदी करण्यात आली होती का? असा प्रश्न विचारला जात आहे.
चिमुकलीवर 46 सेकंद हल्ला
समोर आलेल्या माहितीनुसार, पिंपरी चिंचवडच्या म्हेत्रे वस्ती भागात भटक्या कुत्र्यांनी चिमुरडीवर हल्ला केला. 7 भटक्या कुत्र्यांनी चिमुरडीला सर्व बाजूंनी घेरलं. या हल्ल्यामुळे 5 अंशिका जमिनीवर कोसळली. यानंतर कुत्र्यांनी अंशिकाच्या शरीराचे 46 सेकंद लचके तोडले. यानंतर आसपासचे लोक धावून आले. तोपर्यंत अंशिकाच्या शरीरावर असंख्य जखमा झाल्या होत्या. स्थानिकांनी तातडीने अंशिकाला रुग्णालयात दाखल केले. या हल्ल्यामुळे अंशिकाच्या शरीरावर तब्बल 90 टाके पडले आहेत.
शरीरावर 90 टाके
या घटनेवर बोलताना अंशिकाचे वडील गिरीधर मिश्रा यांनी सांगितले की, सुरुवातीला एक कुत्रा आला आणि त्याने हल्ला केला. त्यानंतर इतरही कुत्री आली आणि त्यांनीही हल्ला केला. यात अंशिकाच्या डोक्याला, पायाला गंभीर जखमा झाल्या आहेत. डोक्याला, हाताला आणि पायाला 90 टाके पडले आहेत. या भागात नेहमीच भटकी कुत्री असतात, यामुळे नागरिकांनाही त्रासाचा सामना करावा लागत आहे.
कल्याणमध्येही कुत्र्यांची दहशत
कल्याणमध्ये पिसाळलेल्या कुत्र्याची दहशत पहायला मिळत आहे. काल दिवसभरात शंभर पेक्षा अधिक जणांना कुत्रे चावल्याची माहिती समोर आली आहे. तर आज सकाळपासून 50 ते 60 नागरिकांना कुत्र्यांनी चावा घेतला आहे. यामुळे उपचारासाठी रुग्णालयात लांबच लांब रांग लागली आहे. केस पेपर काढण्यासाठी केवळ एकच खिडकी सुरू असल्याने नागरिकांना दोन ते तीन तास प्रतीक्षा करावा लागत आहे. रक्तस्राव झालेले रुग्ण, वयोवृद्ध, महिला आणि लहान मुले यांना रांगेत उभे राहून त्रासाचा सामना करावा लागत आहे. काही रुग्णांना प्रतीक्षा करताना चक्कर येत असल्याचेही समोर आले आहे.
