भाजपचा क्लीन बोल्ड झालाय हे स्वीकारा, नवाब मलिकांचा गडकरींना टोला

| Updated on: Nov 16, 2019 | 10:33 AM

सत्तास्थापनेवरुन राजकीय पक्षांमध्ये सुरु असलेला कलगीतुरा (Nawab Malik on Nitin Gadkari) रंगला आहे.

भाजपचा क्लीन बोल्ड झालाय हे स्वीकारा, नवाब मलिकांचा गडकरींना टोला
Follow us on

मुंबई: सत्तास्थापनेवरुन राजकीय पक्षांमध्ये सुरु असलेला कलगीतुरा (Nawab Malik on Nitin Gadkari) रंगला आहे. भाजपचे नेते नितीन गडकरी यांनी राजकारण हे क्रिकेटप्रमाणे असून यात कधीही काहीही होऊ शकतं असं विधान केलं. त्यावर राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी (Nawab Malik on Nitin Gadkari) भाजप क्लीन बोल्ड झालाय हे स्वीकारा म्हणत गडकरींना टोला लगावला आहे.

नवाब मलिक म्हणाले, “गडकरी क्रिकेट आणि राजकारणात काहीही होऊ शकते हे सांगत आहे. या शक्यतेला आम्हीही नाकारत नाही. मात्र, क्रिकेटमध्ये जसा एखादा खेळाडू क्लीन बोल्ड होतो, तसंच भाजपला जनतेने क्लीन बोल्ड केलं आहे. हे त्या लोकांनी स्वीकारलं पाहिजे.”

मलिक यांनी यावेळी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकार भाजपचंच येणार या दाव्याचाही समाचार घेतला. ते म्हणाले, “फडणवीस त्यांच्याकडं 105 आमदार असल्याचं आणि 119 आमदारांचा पाठिंबा असल्याचं सांगत आहेत. मग राज्यपालांकडे त्यांनी सरकार बनवू शकत नाही हे का सांगितलं? सरकार बनवण्यासाठी 145 आमदार लागतात. 145 आमदारांशिवाय कोणतंही सरकार स्थापन होणार नाही.”

भाजपकडं बहुमतासाठी आवश्यक आमदारांची संख्या नाही. त्यांनी सत्तेसाठी लोकांना पळवून एकत्र केलं होतं. आता हे लोक सोडून जावू नये म्हणून त्यांना आपलं सरकार येणार असं सांगावं लागत आहे. हळूहळू त्यांनाही आपलं सरकार येणार नाही हे कळेल, असंही मलिक यांनी नमूद केलं.

‘राष्ट्रपती राजवटीनंतर प्रशासन ठप्प’

राष्ट्रपती राजवट लागू झाल्यापासून प्रशासन ठप्प आहे. 10 हजार कोटींचं पॅकेज जाहीर करुनही पंचनामे झालेले नाही. विमा कंपन्या मनमानी कारभार करत आहेत. शेतकरी अडचणीत आहे. त्यांना मदत देणं गरजेचं असताना कोणतीही कारवाई होताना दिसत नाही. मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून रुग्णांना मदत मिळणे बंद झाले आहे. त्यामुळे आम्ही राज्यपालांना भेटून प्रशासनाला गतिमान करण्याची मागणी करणार आहे.