“सरकारची नवीन फरार व्हा योजना”, जितेंद्र आव्हाडांनी पुन्हा डिवचले, म्हणाले “तुम्ही बलात्कार, दंगली…”
गेल्या महिन्याभरापासून महाराष्ट्रात ठिकठिकाणी विविध घटना घडत आहेत. त्यामुळे विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना चांगलंच फैलावर घेतले आहे. आता याबद्दल राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्याने ट्वीट करत महायुती सरकावर टीका केली आहे.

Jitendra awhad twitter : राज्यात विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे. त्यातच गेल्या महिन्याभरापासून महाराष्ट्रात ठिकठिकाणी विविध घटना घडत आहेत. त्यामुळे विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना चांगलंच फैलावर घेतले आहे. काही दिवसांपूर्वी सिंधुदुर्गातील राजकोट किल्ल्यावर उभारलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आठ महिन्यात कोसळला. तर दुसरीकडे दोन आठवड्यांपूर्वी बदलापुरात दोन चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना समोर आली. याप्रकरणी संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. आता याबद्दल राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्याने ट्वीट करत महायुती सरकावर टीका केली आहे.
राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी नुकतंच त्यांच्या अधिकृत ट्विटरवर एक ट्विट केले. या ट्वीटने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. यावेळी या ट्वीटमध्ये जितेंद्र आव्हाडांनी महायुती सरकारवर जोरदार टीका केली. जर आमची माणसे असाल तर बिनधास्त रहा; तुम्हाला फरार करून टाकू, असा टोला जितेंद्र आव्हाडांनी लगावला आहे.
जितेंद्र आव्हाडांचे ट्वीट
गजापूर, विशाळगडमध्ये एवढे मोठे प्रकरण घडले… आरोपी फरार !
बदलापूरच्या शाळेत चिमुरड्यांचे लैंगिक शोषण झाले… आरोपी संस्थाचालक फरार !
छत्रपती शिवाजी महाराजांचा निकृष्ट पुतळा बनवला… आरोपी शिल्पकार फरार !
तुम्ही बलात्कार करा; तुम्ही दंगली घडवा. पण, तुम्ही जर आमची माणसे असाल तर बिनधास्त रहा; तुम्हाला फरार करून टाकू!!
सरकारची नवीन “फरार व्हा योजना” !, असे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे.
गजापूर, विशाळगडमध्ये एवढे मोठे प्रकरण घडले… आरोपी फरार !
बदलापूरच्या शाळेत चिमुरड्यांचे लैंगिक शोषण झाले… आरोपी संस्थाचालक फरार !
छत्रपती शिवाजी महाराजांचा निकृष्ट पुतळा बनवला… आरोपी शिल्पकार फरार !तुम्ही बलात्कार करा; तुम्ही दंगली घडवा. पण, तुम्ही जर आमची माणसे असाल…
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) August 31, 2024
विरोधक चांगलेच आक्रमक
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने लाडकी बहीण योजना आणली आहे. या योजनेवरुन सरकारवर टीका केली जात आहे. आता यावरुन जितेंद्र आव्हाडांनीही टोला लगावाला आहे. सरकारची नवीन “फरार व्हा योजना” असे जितेंद्र आव्हाडांनी म्हटले. त्यासोबतच त्यांनी गेल्या महिन्याभरात झालेल्या घटनांचा उल्लेखही ट्वीटमध्ये केला आहे. या घटनांवरुन सध्या विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत. विरोधक सरकारवर जोरदार टीका करताना दिसत आहेत.