शरद पवार कायमच दैवत राहतील, राष्ट्रवादीचे आमदार राणा जगजीत सिंह भाजपमध्ये
उस्मानाबादमध्ये कार्यकर्त्यांचा मेळावा घेत राष्ट्रवादीचे आमदार राणा जगजीत सिंह पाटील आणि डॉ. पद्मसिंह पाटील या पितापुत्रांनी भाजपप्रवेशाची घोषणा केली.
उस्मानाबाद : माजी मंत्री डॉ. पद्मसिंह पाटील (Padmasinh Patil) आणि राष्ट्रवादीचे आमदार राणा जगजीतसिंह पाटील यांनी अखेर भाजपमध्ये प्रवेश करत असल्याचं जाहीर केलं. राष्ट्रवादी सोडण्यापूर्वी उस्मानाबादमध्ये कार्यकर्त्यांचा मेळावा घेत पाटील पितापुत्रांनी ही घोषणा केली, मात्र या मेळाव्यात मनसेचं गाणं ऐकू आल्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात होतं.
‘दादा… नवी दिशा, नवी आशा… मला तुमच्याशी काही बोलायचंय!! परिवार संवाद, आवर्जून उपस्थित राहा’ अशी भावनिक साद घालत राणा जगजीतसिंह यांनी कार्यकर्त्यांना उपस्थित राहण्यास सांगितलं होतं. या मेळाव्याकडे राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी पाठ फिरवली, तर दोन-अडीच हजार कार्यकर्ते उपस्थित राहिल्याचं बोललं जातं. मात्र यापेक्षा चर्चा होती मेळाव्यात वाजणाऱ्या गाण्याची.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मेळाव्यात वाजणारं ‘तुमच्या राजाला साथ द्या’ हे गाणं यावेळी लावण्यात आलं होतं. त्यामुळे राणा जगजीतसिंह नेमके भाजपच्या वाटेवर आहेत, की मनसेमध्ये, याची गमतीदार चर्चा रंगली होती. मात्र अखेर पाटील यांनी भाजपप्रवेशावर शिक्कामोर्तब केलं आणि कार्यकर्त्यांचा जीव भांड्यात पडला.
पाहा व्हिडीओ
आमदार राष्ट्रवादीचा, चर्चा भाजप प्रवेशाची आणि बॅकग्राऊंडला गाण मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच ???@SandeepDadarMNS @mnsadhikrut @MNSAmeyaKhopkar @TV9Marathi pic.twitter.com/dz2wMw3qXv
— Rahul Zori. (@rahul_zori) August 31, 2019
सत्ता भिरकावून देऊ, माझी अवस्था अर्जुनासारखी झाली आहे, पण तुम्ही आता कृष्ण होऊन मला दिशा द्यायचं काम करा, निर्णय काय घेऊ हे सांगा, अशी भावनिक साद राणा जगजीतसिंह यांनी आधी कार्यकर्त्यांना घातली होती. समर्थकांसमोर साष्टांग लोटांगण घालू वाटत असल्याच्या भावनाही त्यांनी बोलून दाखवल्या होत्या.
राज्यमंत्री झाल्यावर 15 वर्ष संघर्ष करत प्रामाणिक काम केलं. सकारात्मक आणि विकासात्मक राजकारण करत कुणावर टीका करायची नाही. आजचा दिवस भावनिक असून शरद पवार हे आदरणीय दैवत आहेत, त्यात कमी होणार नाही, असंही राणा जगजीतसिंह म्हणाले.
राष्ट्रवादीसोबत काम केलं आहे. 2009 चा पराभव आठवतोय. सगळ्यांनी मेहनत घेतली. ताकद वाढवत गेलो, पण लोकसभेपूर्वीची परिस्थिती आणि आताची परिस्थिती वेगळी आहे. देशाने, राज्याने काय कौल दिला, हे आपण बघितलं आहे. मंत्र्यांना अडणारा जिल्हा हा उस्मानाबादच ठरला आहे, असंही राणा जगजीतसिंह म्हणाले.
20 वर्ष संघर्ष करुन उजनीवरुन पाणी आणलं. पण आता ते पाणी आणि उद्योग आपल्या हातात आले पाहिजे. मोठे उद्योग, रोजगार आणायचे असतील तर ताकद वाढवावी लागेल. सगळं काही करुनही निकाल आपल्या विरोधात जात असतील, तर काय करायचं ते तुम्हीच सांगा. खरंच आपण काम केलं असेल तर मग आपण कमी कुठे पडतोय हे बघितलं पाहिजे, असा प्रश्न राणा जगजीतसिंह यांनी कार्यकर्त्यांना विचारला.
सर्व जण मिळून भाजपात जाणार आहोत. पाणी, रोजगार आणि विकासासाठी भाजपमध्ये जाणार असल्याचं राणा जगजीतसिंह यांनी जाहीर केलं. मतदारसंघ कोणता हे आताच सांगणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. पवनराजे हत्याकांड केसला घाबरुन निर्णय घेत नसल्याचंही राणा जगजीतसिंह म्हणाले.