आम्ही सत्तेत आणि राज ठाकरे विरोधीपक्षात असल्यास आनंदच : सुनिल तटकरे

| Updated on: Oct 11, 2019 | 9:00 AM

राज ठाकरे जमिनीवर आहेत. आपले किती उमेदवार निवडून येऊ शकतात, हे गणित त्यांनी पूर्णपणे केलेलं आहे, असं सुनिल तटकरे म्हणाले.

आम्ही सत्तेत आणि राज ठाकरे विरोधीपक्षात असल्यास आनंदच : सुनिल तटकरे
Follow us on

रायगड : राज्यात आता आघाडीचं सरकार येणार आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि मित्रपक्षांची सत्ता येणार आहे. अशावेळेस जर
राज ठाकरे विरोधीपक्षात राहणार असतील, तर आम्हाला आनंद आहे, अशा शब्दात राष्ट्रवादीचे खासदार सुनिल तटकरे यांनी
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भूमिकेचं स्वागत (NCP Reaction on Raj Thackeray) केलं.

‘लोकसभा निवडणुकीच्या वेळेला राज ठाकरे यांची भूमिका भिन्न होती. 2014 च्या वेळेलाही त्यांनी पूर्णपणे उमेदवार उभे न
करता भाजपला पाठिंबा दिला होता. मला असं वाटतं ते जमिनीवर आहेत. आपले उमेदवार किती उभे राहू शकतात, आपले
उमेदवार किती निवडून येऊ शकतात, हे गणित त्यांनी पूर्णपणे केलेलं आहे.’ असं सुनिल तटकरे म्हणाले.

2009 ते 2019, राज ठाकरेंनी मांडलेल्या भूमिका

‘मला आश्चर्य वाटतं, 124 जागा लढवून शिवसेनेचा मुख्यमंत्री स्वबळावर करणार, हे गणित मला समजू शकलेलं नाही.
मुख्यमंत्री स्वबळावर करायचा असेल, तर 145 जागा लागतात. मग 124 जागा लढवून स्वतःचा मुख्यमंत्री करण्याची स्वप्न
कसं बघतात, हे समजत नाही.’ अशा शब्दात सुनिल तटकरे यांनी शिवसेनेला टोला लगावला.

राज ठाकरेंची भूमिका वस्तुस्थितीवर आधारित आहे. त्यांची स्वच्छपणाची भूमिका दिसते. राज ठाकरेंना राज्यात स्वतःचा
आवाका लक्षात घेता सक्षम विरोधीपक्ष नेता द्यायचा आहे. महाराष्ट्रात गेल्या महिनाभरापासून जे काही घडत आहे, विशेषत:
शरद पवारांबद्दल जे घडलं, त्यामुळे आता चित्र बदलेल, असा विश्वासही तटकरेंनी (NCP Reaction on Raj Thackeray) व्यक्त केला.

मला माझा आवाका माहिताय, उंटाचा मुका घेणार नाही, सत्ता नको, विरोधी पक्षाची संधी द्या : राज ठाकरे

आजच्या घडीला सर्व राजकीय स्थिती पाहता, मला माझा आवाका माहित आहे. विनाकारण जाऊन उंटाचा मुका कोण घेत बसणार. आपल्या गोष्टी आपल्याला कळल्या पाहिजेत, सत्ता नको, प्रबळ विरोधीपक्ष म्हणून संधी द्या, असं आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलं. मुंबईतील खारमध्ये आयोजित पहिल्या सभेतून राज ठाकरेंनी विधानसभा निवडणुकांच्या प्रचाराचं रणशिंग फुकलं.

सत्तेतला आमदार सरकारला प्रश्न विचारु शकत नाही पण विरोधी पक्षातला आमदार सरकारला नामोहरम करु शकतो, मी आज प्रबळ विरोधी पक्ष म्हणून समोर येतोय. आज सरकारला प्रश्न विचारणाऱ्यांची गरज आहे आणि जर विधानसभेत प्रबळ विरोधक नसेल तर सरकार तुमच्यावर बुलडोझर फिरवेल आणि म्हणून मी सत्तेसाठी नाही तर विरोधी पक्ष प्रबळ करावा हे मागणं घेऊन आलोय, असं राज ठाकरे म्हणाले.