
Shashikant Shinde : शशिकांत शिंदे यांची राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) प्रदेशाध्यक्ष म्हणून अधिकृतपणे निवड करण्यात आली आहे. खासदार शरद पवार यांनीच शिंदे यांच्या नावाची घोषणा केली आहे. विशेष म्हणजे प्रदेशाध्यक्षपदासाठी शरद पवार यांच्या पक्षातून हे एकच नाव समोर आले होते. त्यामुळे शिंदे यांच्यावर एकमताने प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. दरम्यान, आता प्रदेशाध्यक्षपदी विराजमान झाल्यानंतर शशिकांत शिंदे यांनी प्रथमच प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी मी सामान्य जनतेचे प्रश्न सरकारपुढे मांडण्यासाठी लढणार आहे. तसेच पक्षाला सत्तेत बसवण्यासाठी रात्रंदिवस मी काम करणार आहे, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
राष्ट्रवादी (शरद पवार गट) पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर शशिकांत शिंदे यांनी पत्रकार परिषद आयोजित केली. यावेळी त्यांनी पत्रकारांच्या वेगवेगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली. आज शरद पवार आणि पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी, सर्व पदाधिकाऱ्यांनी महाराष्ट्र प्रदेश शरद पवार गटाचा अध्यक्ष केल्याबद्दल मी सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो, अशा भावना यावेळी शशिकांत शिंदे यांनी व्यक्त केल्या.
तसेच आपल्या सर्वांच्या वतीने मी महाराष्ट्राच्या जनतेला ग्वाही देतो की, ज्या नेत्याने महाराष्ट्राच्या गोरगरीब जनतेसाठी अहोरात्र कष्ट केले त्या नेत्याचा एक कार्यकर्ता म्हणून मी महाराष्ट्रातील अनेक प्रश्नांना, अन्यायाला वाचा फोडण्याचा प्रयत्न मी करेन. या काळात पक्षसंघटना वाढवण्यासाठी प्रयत्न करेन. पक्षाला सत्तेत आणण्यासाठी मी दिवसरात्र कष्ट करेन, अशी ग्वाहीही त्यांनी जनतेला दिली.
पक्षात या पदासाठी अनेक दिग्गज नेते पात्र आहेत. तरीदेखील मला ही संधी देण्यात आली. या संधीचं सोनं करण्याचा मी प्रयत्न करेन. सामान्य घरातील मुलगा नेता कसा होतो हे आर आर पाटील यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. त्याच पद्धतीने मी काम करणार आहे, असंही ते म्हणाले. तसेच मी सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी शासनाच्या आणि सरकारच्या चुकीच्या धोरणाविरोधात मी आवाज उठवणार आहे. वेळ आलीच तर मी रस्त्यावर उतरून सरकारला जागं करण्याचा प्रयत्न करेन, असं आश्वासन त्यांनी जनतेला तसेच पक्षाला दिले.
आता लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होणार आहेत. त्यामुळे आगामी काळ शशिंकात शिंदे यांच्यासाठी आव्हानात्मक असणार आहे. यावरही त्यांनी भाष्य केलंय. अगोदरचे राजकारण वेगळे होते. आताच्या राजकारणाची पद्धत वेगळी आहे. अगोदर राजकीय नेते जनतेचे प्रश्न उपस्थित करायचे आणि सत्ताबदल व्हायचा आता मात्र सत्ताबदल अधिकाराच्या मदतीने, यंत्रणेच्या मदतीने, आमिष दाखवून केला जातो. त्यामुळे माझ्यापुढे हे पहिले आव्हान असेल, असे मत शिंदे यांनी व्यक्त केले. तसेच या बदललेल्या राजकारणाबाबत लोकांत जागृती करण्याचा मी प्रयत्न करेन. राज्यभर दौरा करत असताना मी पक्षसंघटना मजबूत करण्याचा प्रयत्न करेन, असेही यावेळी शशिकांत शिंदे यांनी सांगितले. दरम्यान मी पक्षाला सत्तेत आणण्यासाठी दिवसरात्र कष्ट करणार आहे, अशी ग्वाहीही शिंदे यांनी दिली आहे. त्यामुळे आता शरद पवारांनी भाकरी फिरवल्यामुळे भविष्यात पक्ष सत्तेत येऊन नवा इतिहास घडणार का? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.