भास्कर जाधवांनी विधानसभाध्यक्ष व्हावे, पण निष्पक्ष काम करावे! देवेंद्र फडणवीसांनी लगावला टोला

| Updated on: Jul 10, 2021 | 6:59 PM

महाविकास आघाडीच्या तीन पक्षांमध्ये अध्यक्ष पदाबद्दल एकमत राहिले असते तर आतापर्यंत विधानसभा अध्यक्ष पदाची निवडणूक झाली असती. एकमत नाही म्हणून आतापर्यंत तारीख जाहीर केली नाही, अशी टीका फडणवीस यांनी केली. (opposition leader devendra fadanvis target mahavikas aghadi on various issue)

भास्कर जाधवांनी विधानसभाध्यक्ष व्हावे, पण निष्पक्ष काम करावे! देवेंद्र फडणवीसांनी लगावला टोला
देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते
Follow us on

नागपूर : भास्कर जाधव यांना विधानसभा अध्यक्ष पदासाठी शुभेच्छा आहे, मात्र पदावर गेल्यावर त्यांनी किमान निष्पक्षपणे काम करावे अशी अपेक्षा आहे, असा टोला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी लगावला. याशिवाय इतरही विषयांवर फडणवीस यांनी यावेळी भाष्य केले. देवेंद्र फडणवीस आज नागपूरमध्ये दाखल झाल्यानंतर माध्यमांनी त्यांची प्रतिक्रिया घेतली. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी विधानसभा अध्यक्ष पदाबाबत त्यांनी महविकास आघाडीवर टीकास्र सोडले. महाविकास आघाडीच्या तीन पक्षांमध्ये अध्यक्ष पदाबद्दल एकमत राहिले असते तर आतापर्यंत विधानसभा अध्यक्ष पदाची निवडणूक झाली असती. एकमत नाही म्हणून आतापर्यंत तारीख जाहीर केली नाही, अशी टीका फडणवीस यांनी केली.

काँग्रेसच्या आंदोलनावर टीका

केंद्रीय मंत्री मंडळात खा. प्रीतम मुंडे यांना सामावून घेतलं नसल्याने नाराज मुंडे समर्थकांकडून भाजपमधील पदाचा राजीनामा सत्र सुरू केले आहे. याबाबत फडणवीस यांना विचारले असता, ‘याबाबत काल पंकजा ताईंनी स्पष्टीकरण दिले, मी दिले, मला वाटते त्यानंतर काही बोलायची गरज नाही’, त्यांनी स्पष्ट केले. तसेच मुंबईत सुरु असलेल्या काँग्रेसच्या आंदोलनावरही फडणवीस यांनी शरसंधान साधले आहे. या आंदोलनामध्ये सरकारचा निषेध करण्यासाठी आणलेली बैलगाडी अचानकपणे तुटल्याचा धक्कादायक प्रकार घडला. या घटनेमध्ये मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप (Bhai jagtap) बैलगाडीवरुन जमिनीवर कोसळले. या घटनेनंतर ‘राहुल गांधी यांना राष्ट्रीय नेते म्हणल्याचे कदाचित बैलांना ही आवडलेले नाही. त्यामुळे मुंबईत काँग्रेस आंदोलनात बैल पळून गेले’, अशी खोचक टीका फडणवीस यांनी काँग्रेस आंदोलनावर केली आहे.

नागपूर महापालिका निवडणुकीची तयारी सुरु

ज्यांनी सहकार चळवळीमध्ये चुकीचे काम केलेत, सहकार बुडवला त्यांनाच या नव्या खात्यासंदर्भात भीती आहे. ज्यांनी सहकार क्षेत्रामध्ये चांगलं काम केलं आहे, त्यांनी नव्या सहकार खात्याचा स्वागतच केला आहे. अमित शहा खूप आधीपासून सहकार चळवळीत असून त्यांच्या राजकारणाची सुरुवातच सहकारातून झाली आहे, असे फडणवीस यांनी नमूद केले. आम्ही नागपूर महानगरपालिका निवडणुकीच्या कामाला लागलो आहोत, आमच्या नगरसेवकांनी कोविड काळामध्ये चांगले काम केले असे सांगत पीक कर्जाबाबतही त्यांनी पुढे भाष्य केले. पीक कर्जाचा आढावा घेतल्यावर लक्षात येते की, फक्त 18 टक्के पीक कर्ज वाटप झाले आहे. मुख्यमंत्र्यांनी बैठक घेऊन बँकांना कर्ज वाटपबद्दल निर्देश द्यावे. विदर्भ आणि मराठवाड्यातील बँकांना मदत करण्याचा निर्णय घ्यावा, अशी मागणीही त्यांनी केली.

मध्यावधी निवडणुका झाल्यास सरकार धाराशाही होईल

पूर्व विदर्भात ज्या तांदूळ घोटाळ्याचे आरोप होत आहे. त्याचे धागेदोरे खूप लांबपर्यंत गेले आहे. मध्यावधी निवडणूका होईल की नाही याचा निर्णय सरकारला करायचा आहे. मात्र ते तशी हिम्मत करणार नाही कारण त्यांना माहित आहे निवडणूक झाली तर ते धाराशाही होतील कारण या सरकार विरोधात लोकांमध्ये खूप नाराजी आहे, असे फडणवीस यांनी पुढे नमूद केले.

ओबीसी आरक्षणाबाबत अकॅडमिक मुद्द्यावर चर्चेसाठी तयार

दारुबंदी उठविणाऱ्या पालकमंत्री वडेट्टीवार यांची पूजा, बार मालकाने फोटो लावून केलेल्या आरतीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. याबाबत फडणवीस यांना विचारले असता, ‘या मंत्रांच्या बाबतीत असेच होणे अपेक्षित आहे. उद्या जर सट्टेबाजांनी मंत्र्यांची पूजा केली तर काही नवल वाटायला नको’, अशी प्रतिक्रिया त्यांनी केली. ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर आपण हरी नरके यांच्याशी काय चर्चा करू, त्यांचे बॉस छगन भुजबळ यांच्यासोबत या विषयावर अकॅडमिक मुद्द्यांवर चर्चा करायला मी तयार असल्याचेही देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी स्पष्ट केले.

इतर बातम्या

‘गाढवांचा’ भार उचलायला, ‘बैलांचा नकार’!, प्रसाद लाड यांचा भाई जगतापांना खोचक टोला

कृषी मंत्र्यांची समयसूचकता, मास्क नसलेल्या शेतकऱ्याला स्वत:जवळचा रुमाल दिला, मास्क म्हणून वापरण्याचा सल्ला