‘ओबीसी आरक्षणाचं रक्षण या बंधनात सरकारनं अडकावं’, राखीपौर्णिमेला पंकजा मुंडेंचं शिंदे-फडणवीसांकडे मागणं

सर्वोच्च न्यायालयात जे ओबीसी आरक्षण गेलं आहे त्यासाठी जोरदार प्रयत्न करुन ते मिळवावं. नाहीतर आम्ही एवढी वर्षे केलेल्या लढ्याला काही अर्थ राहणार नाही. त्यामुळे ओबीसी आरक्षणाची रक्षा या बंधनात सरकारनं अडकावं अशी विनंती मी आणि आमचे बंधू महादेव जानकर करतो आहोत, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.

ओबीसी आरक्षणाचं रक्षण या बंधनात सरकारनं अडकावं, राखीपौर्णिमेला पंकजा मुंडेंचं शिंदे-फडणवीसांकडे मागणं
पंकजा मुंडे, राष्ट्रीय सचिव, भाजप
Image Credit source: TV9
| Edited By: | Updated on: Aug 11, 2022 | 5:54 PM

मुंबई : भाजपच्या राष्ट्रीय सचिव आणि राज्यातील बड्या नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी माजी मंत्री महादेव जानकर यांना राखी बांधत राखीपौर्णिमा साजरी केली. त्यावेळी पंकजा मुंडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे महत्वाची मागणी केलीय. आज मी आणि जानकर साहेब योगायोगाने एकत्र आहोत. ओबीसी आरक्षणाचा (OBC Reservation) विषय हा पुन्हा दुर्लक्षित झाला आहे दुर्दैवाने, या सरकारकडून हे अपेक्षित नाही. त्यांनी सर्वोच्च न्यायालयात जे ओबीसी आरक्षण गेलं आहे त्यासाठी जोरदार प्रयत्न करुन ते मिळवावं. नाहीतर आम्ही एवढी वर्षे केलेल्या लढ्याला काही अर्थ राहणार नाही. त्यामुळे ओबीसी आरक्षणाची रक्षा या बंधनात सरकारनं अडकावं अशी विनंती मी आणि आमचे बंधू महादेव जानकर करतो आहोत, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.

‘त्यांना वाटलं असेल की माझी पात्रता नाही’

मंत्रिमंडळ विस्तारात स्थान मिळालं नसल्याबाबत विचारलं असता पंकजा मुंडे म्हणाल्या की, या चर्चा माध्यमांमधून, माझ्या कार्यकर्त्यांमधून होत असतात. पण त्यांना वाटलं असेल की यांची पात्रता नाही, म्हणून दिलं नसेल. पण जेव्हा त्यांना वाटेल की पंकजा मुंडेंची पात्रता आहे तेव्हा ते देतील. पण आज मी शांत आहे, माझे कार्यकर्ते शांत आहेत. या सगळ्यात माझा काही रोल असणार नाही. मी जे काम करते ते स्वाभिमानाने आणि इज्जतीने राजकारण करते, असं पंकजा मुंडे यांनी आवर्जुन सांगितलं. तसंच ज्या संख्येचं मंत्रिमंडळ विस्तार करायचं असतं त्यामुळे सर्वांचं समाधान करता येत नसतं. जे मंत्री झालेत त्यांनी तरी लोकांना समाधानी करावं, अशा शुभेच्छा मी सर्व मंत्र्यांना दिल्याचंही पंकजा मुंडे म्हणाल्या.

‘महिलेला महिला व बालविकास नव्हे, तर मोठं खातं द्या’

पुढच्या मंत्रिमंडळ विस्तारात महिलांना संधी नक्कीच दिली पाहिजे. महिला मंत्र्यांला महिला व बालविकास, मुस्लिम बांधव असेल तर त्याला अल्पसंख्याक विकास, आदिवासी बांधव असेल तर त्याला आदिवासी विकास विभाग दिला जातो. मागच्या सरकारच्या काळात मी महिला असून मला ग्रामविकास सारखं खातं दिलं होतं. त्यामुळे मंत्रिमंडळात महिलेला तर स्थान दिलंच पाहिजे, पण केवळ महिला व बालविकास नाही तर मोठ्या खात्याची जबाबदारी त्यांच्याकडे दिली जावी, अशी अपेक्षाही पंकजा मुंडे यांनी यावेळी व्यक्त केलीय.