उत्तर दिल्ली महानगरपालिका दिवाळखोरीत, आयुक्तांनाही 3 महिन्यांपासून पगार नाही

नवी दिल्ली : उत्तर दिल्ली महानगरपालिका दिवाळखोरीत निघाली आहे. त्यामुळे नगरपालिका क्षेत्रातील विकास कामे तर ठप्प आहेतच, सोबत कर्मचाऱ्यांचे वेतन द्यायलाही तिजोरीत पैसे नाही. पालिका कर्मचाऱ्यांचे 3 महिन्यांपासून पगारच झालेले नाहीत. महापालिका आयुक्तांनाही काही महिन्यांपासून पगार मिळालेला नाही. दिल्लीतील सर्व महानगरपालिकांवर भाजपची सत्ता आहे, तर राज्यात आपचे सरकार आहे. मागील मोठ्या काळापासून भाजप आणि आपमध्ये […]

उत्तर दिल्ली महानगरपालिका दिवाळखोरीत, आयुक्तांनाही 3 महिन्यांपासून पगार नाही
प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Updated on: Jul 05, 2019 | 3:36 PM

नवी दिल्ली : उत्तर दिल्ली महानगरपालिका दिवाळखोरीत निघाली आहे. त्यामुळे नगरपालिका क्षेत्रातील विकास कामे तर ठप्प आहेतच, सोबत कर्मचाऱ्यांचे वेतन द्यायलाही तिजोरीत पैसे नाही. पालिका कर्मचाऱ्यांचे 3 महिन्यांपासून पगारच झालेले नाहीत. महापालिका आयुक्तांनाही काही महिन्यांपासून पगार मिळालेला नाही. दिल्लीतील सर्व महानगरपालिकांवर भाजपची सत्ता आहे, तर राज्यात आपचे सरकार आहे. मागील मोठ्या काळापासून भाजप आणि आपमध्ये राजकीय संघर्ष सुरु आहे. त्यात कर्मचारी आणि नागरिकांचे मात्र, हाल होत आहेत.

उत्तर दिल्ली महानगरपालिकेच्या क्षेत्रात येणारे सर्वात मोठे रुग्णालय हिंदू रावमध्ये वैद्यकीय सेवाही संकटात आल्या आहेत. रुग्णालयात काम करणाऱ्या जवळपास 600 डॉक्टरांचे आणि 400  नर्सेसचे मागील 3 महिन्यांपासून पगारच झालेले नाही. दुसरीकडे रुग्णालयात असेही काही कर्मचारी आहेत ज्यांचे मागील 6 महिन्यांपासून पगार झालेले नाहीत.

इशारा देऊनही पगार न झाल्याने अखेर संबंधित डॉक्टरांनी उपोषणाचा मार्ग स्वीकारला. या अंतर्गत डॉक्टर आणि नर्स रोज 3 तास उपोषण करत आहेत. सोमवारपासून उपोषण दिवसभरासाठी केले जाईल. निवासी डॉक्टर्स असोसिएशनचे महासचिव डॉ. संजीव म्हणाले, “उपोषणाचे पाऊल नाईलाजाने उचण्यात आले आहे. पगार न झाल्याने आता घर चालवणे देखील कठीण झाले आहे. अनेक डॉक्टर्सला आपल्या मुलांची शाळेची फी भरणेही शक्य होत नाही.”

आयुक्तांनीही हात झटकले

या प्रश्नावर उत्तर दिल्ली महानगरपालिकेच्या आयुक्त वर्षा जोशी यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली नसली, तरी त्यांनी ट्विट करत हात झटकले आहे. वर्षा जोशींनी ट्विट केले, “मला या प्रश्नाची माहिती आहे. मात्र, दिल्ली सरकार जोपर्यंत निधी देत नाही, तोपर्यंत परिस्थितीत सुधारणा होणार नाही.” जोशींनी आपल्या ट्विटमध्ये त्यांनाही काही महिन्यांपासून पगार मिळालेला नसल्याचे नमूद केले आहे.

माझ्याकडे काही जादुची कांडी नाही : महापौर

महानगरपालिकेचे महापौर सरदार अवतार सिंह म्हणाले, “मला या पदावर येऊन 1 महिनाही झालेला नाही. माझ्याकडे काही जादुची कांडी नाही की सर्व जुने प्रश्न तात्काळ सुटतील. मी या विषयावर चर्चा करत आहे आणि लवकरच या प्रश्नावर कायमस्वरुपीसाठी उपाय निघेल अशी मला आशा आहे.” अवतार सिंह यांनी या विषयावर चर्चा करण्यासाठी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याकडेही वेळ मागितला आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us