‘मोदी हटाव देश बचाव’, कराडमधील सायकल रॅलीतून पृथ्वीराज चव्हाणांचा नारा

| Updated on: Jul 17, 2021 | 4:05 PM

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वात सायकल रॅली काढण्यात आली. कराडमध्ये काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात या सायकल रॅलीमध्ये सहभागी झाले होते.

मोदी हटाव देश बचाव, कराडमधील सायकल रॅलीतून पृथ्वीराज चव्हाणांचा नारा
पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वात कराडमध्ये सायकल रॅली
Follow us on

कराड : इंधन दरवाढीविरोधात महाराष्ट्र काँग्रेसनं आक्रमक पवित्रा घेतला आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकामंत्री अशोक चव्हाण यांच्यानंतर आता माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वात सायकल रॅली काढण्यात आली. कराडमध्ये काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात या सायकल रॅलीमध्ये सहभागी झाले होते. त्याचबरोबर पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात स्वाक्षरी मोहीमही राबवण्यात आली. (Cycle rally in Karad led by Congress leader Prithviraj Chavan)

पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वात पार कराडमध्ये इंधन दरवाढीविरोधात पार पडलेल्या सायकल रॅलीत अॅड. उदयसिंह पाटील, शिवराज मोरे, यांच्यासह शेकडो काँग्रेसचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. केंद्र सरकारने सरकारी कंपन्या, सरकारी मालमत्ता विकून कारभार हाकण्याचं काम सुरु ठेवलं आहे. देशाची अर्थव्यवस्था कमकुवत झालेली आहे. देश चालवण्यात मोदी सरकारची अक्षम्य चूक झाली आहे. त्यामुळे आता सामान्य माणसावर पेट्रोल डिझेल आणि गॅस दरवाढीचा बोजा टाकला जात आहे. त्यामुळे सर्वसामान्य माणसाचे कंबरडं मोडलं असल्याची घणाघाती टीका चव्हाण यांनी केलीय.

‘मोदी हटाव देश बचाव’

23 कोटी लोक दारिद्र्य रेषेखाली गेले आहेत. त्यामुळे नागरिकांना दारिद्र्याच्या खाईत लोटणाऱ्या केंद्र सरकारविरोधात ‘मोदी हटाव देश बचाव’ असा नारा आम्ही सायकल रॅलीच्या माध्यमातून देत आहोत. मनमोहनसिंग यांचे सरकार असताना 124 डॉलर प्रति बॅरलप्रमाणे कच्च्या तेलाचे दर होते. सध्या कच्च्या तेलाचे दर 60 ते 65 डॉलर प्रती बॅरल असे दर असतानाही पेट्रोल डिझेलच्या किमतीत सातत्याने वाढ होत आहे. केंद्र सरकार सामान्य लोकांवर कर लादून स्वतःच्या झोळ्या भरण्याचं काम करत असल्याचा आरोप चव्हाण यांनी मोदी सरकारवर केलाय.

अशोक चव्हाणांचा नांदेडमध्ये मोर्चा

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारनं झोपेचे सोंग घेतलं आहे. त्यामुळे सामान्य जनता त्रस्त झालीय. या सरकारला जागं करण्यासाठी काँग्रेस पक्ष राज्यात सत्तेत असला तरी केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचं काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी म्हटलंय. युपीए सरकारच्या कार्यकाळात 1-2 रुपयांची जरी पेट्रोल-डिझेल दरवाढ झाली तर विरोधी पक्ष म्हणून भाजप मोठ्या प्रमाणात टीका करत होते. त्यांनी त्यासाठी लोकसभा आणि राज्यसभेतही मोठा गोंधळ घातला होता. आता मात्र, पेट्रोलचे दर 100 रुपयांच्या वर गेले आहेत. तर डिझेलचे दरही वाढले आहेत. असं असूनही केंद्र सरकार झोपेचं सोंग घेत असल्याचा आरोप चव्हाण यांनी केलाय.

संबंधित बातम्या :

सायकलवरून राजभवनात पोहोचले काँग्रेस नेते, मराठा-ओबीसी आरक्षण मुद्द्यावर राज्यपालांना निवेदन

महागाईविरोधात सरकारला जाब विचारणाऱ्या तत्कालीन आंदोलकांची आता दातखीळ बसली काय?, राऊतांचा घणाघात

Cycle rally in Karad led by Congress leader Prithviraj Chavan