PM Narendra Modi : पंतप्रधान मोदी खवळले, ‘मी रागात आहे, आज माझ्या लोकांच्या कातडीच्या रंगाचा अपमान झालाय’

PM Narendra Modi : इंडियन ओवरसीज काँग्रेसचे अध्यक्ष सॅम पित्रोदा यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी एका निवडणूक प्रचारसभेला संबोधित करत होते. 'मोदी तर हे सहन करणारच नाही' हे त्यांनी स्पष्ट केलं.

PM Narendra Modi : पंतप्रधान मोदी खवळले, मी रागात आहे, आज माझ्या लोकांच्या कातडीच्या रंगाचा अपमान झालाय
PM Modi-sam pitroda
| Updated on: May 08, 2024 | 2:19 PM

इंडियन ओवरसीज काँग्रेसचे अध्यक्ष सॅम पित्रोदा यांच्या वक्तव्यावरुन मोठा वाद निर्माण झाालय. एका मुलाखतीत पित्रोदा यांनी भारताच्या वेगवेगळ्या भागातले लोक कसे दिसतात? याची परदेशी लोकांबरोबर तुलना केलीय. , “भारत विविधतेने भरलेला देश आहे, जिथे पूर्वेकडचे लोक चिनी लोकांसारखे वाटतात. पश्चिमेकडचे लोक अरबी वाटतात. उत्तरेकडचे लोक थोडे युरोपियन्ससारखे वाटतात. दक्षिणेकडचे लोक आफ्रिकीसारखे दिसतात” असं सॅम पित्रोदा म्हणाले. त्यांच्या या वक्तव्याचा आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खरपूस समाचार घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी तेलंगणच्या वारंगल येथे एका निवडणूक प्रचारसभेला संबोधित करत होते. “आज मी भरपूर रागात आहे. मला शिवी दिली, मी सहन केलं. पण शहजादे म्हणजे राहुल गांधीच्या सल्लागाराने जे म्हटलं, त्याने मला राग आलाय. हा माझ्या देशातील लोकांच्या कातडीच्या रंगाचा अपमान आहे” अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पित्रोदाच्या विधानाचा समाचार घेतला.

शहजादे म्हणजे राहुल गांधीचे गाइड अंकल म्हणाले की, “ज्यांचा चेहरा काळा आहे, ते आफ्रिकेचे आहेत. वर्णाच्या आधारावर इतकी मोठी शिवी दिलीय” “कातडीच्या रंगावरुन ठरवलं की, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आफ्रिकी आहेत. यांचे विचार आज समजलेत. अरे कातडीचा रंग काहीही असो, आम्ही श्रीकृष्णाची पूजा करणारे लोक आहोत” असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

‘मोदी तर हे सहन करणारच नाही’

“शहजादे म्हणजे राहुल गांधींना उत्तर द्यावं लागेल. चामडीच्या रंगावरुन देशाचा आणि नागरिकांचा अपमान देशवासिय सहन करणार नाहीत. मोदी तर हे सहन करणारच नाही, तुम्हाला उत्तर द्याव लागेल” असं पंतप्रधान मोदी म्हणाले.


‘सात समुद्रापार राहून पित्रोदा राम मंदिराला बदनाम करतायत’

‘सॅम पित्रोदा यांनी भारताच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण केलय’ असं भाजपा प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी म्हणाले. “हा फक्त राजकारणाचा विषय नाहीय. “पीएम राम मंदिरात गेल्याने भारताच्या अस्तित्वावर प्रश्न निर्माण होतो, असं पित्रोदा यांचं म्हणणं आहे. लोकशाही कमजोर होतेय. तुमच्या डोक्यात विदेशी गोष्टी असतील, तर त्या हटवा. सात समुद्रापार राहून पित्रोदा राम मंदिराला बदनाम करतायत” असं सुधाशू त्रिवेदी म्हणाले.