‘शिवसेना शरद पवारांच्या चरणी लीन झाली’, प्रवीण दरेकरांचा शिवसेनेला चिमटा

| Updated on: Dec 08, 2020 | 3:03 PM

भारत बंदमध्ये सहभागी झालेल्या राजकीय पक्षांना शेतकऱ्यांचा पुळका नाही. फक्त स्वार्थासाठी हे सर्व सुरु असल्याचा आरोप दरेकर यांनी केला आहे.

शिवसेना शरद पवारांच्या चरणी लीन झाली, प्रवीण दरेकरांचा शिवसेनेला चिमटा
विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
Follow us on

मुंबई: विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी शिवसेनेवर जोरदार निशाणा साधला आहे. शिवसेना ही राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या चरणी लीन झाली आहे, असा टोला दरेकरांनी लगावला आहे. हिंदुत्वाचा विचार सोडून शिवसेना महाविकास आघाडीमध्ये गेली तेव्हाच त्यांचे आचार आणि विचार कळाले, अशा शब्दात दरेकरांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. (Praveen Darekar criticize shivsena and NCP)

केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी केलेला कृषी कायदा हा शेतकऱ्यांचा आत्मा आहे. आजच्या भारत बंदमध्ये सहभागी झालेल्या राजकीय पक्षांना शेतकऱ्यांचा पुळका नाही. फक्त स्वार्थासाठी हे सर्व सुरु असल्याचा आरोप दरेकर यांनी केला आहे. असाच कायदा करावा म्हणून याच पक्षांनी पत्र काढली होती, कायद्याला समर्थन दिलं होतं आणि आज विरोध करत असल्याची टीका दरेकर यांनी केली आहे. या नेत्यांच्या कथनी आणि करणीतील फरक शेतकऱ्यांना निश्चित कळतो, असंही दरेकर म्हणाले.

शिवसेना इतिहास विसरत चालली आहे. बाळासाहेबांनी काय केलं हे देखील ते विसरले आहेत. देवेंद्र फडणवीस हे शेतकऱ्यांच्या बाजूने आहेत, हे कुणालाही दाखवण्याची गरज नाही. विरोधकांचा आजचा बंद हा शेतकऱ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून राजकीय स्वार्थ साधण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप दरेकर यांनी केला आहे.

‘शरद पवारांची भूमिका काळानुरुप बदलते’

प्रवीण दरेकर यांनी शरद पवार यांच्यावरही जोरदार टीका केलीय. ‘शरद पवार यांच्या भूमिका या काळानुरुप बदलत चालल्या आहेत. पवार साहेबांचे बदललेले स्वरुप देशासमोर आले आहे. स्वत: केंद्रीय कृषीमंत्री असताना त्यांनी सर्व राज्यातील मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून हा कायदा किती महत्वाचा आहे हे पटवून देण्याचा प्रयत्न केला. आता मात्र पंतप्रधान मोदींनी कायदा केला तर त्याला विरोध का?’ असा सवालही दरेकर यांनी विचारला आहे.

निलेश राणेंचाही शिवसेनेवर प्रहार

शेती हा काही शिवसेनेचा विषय नाही. सेनेला तेवढी अक्कलही नाही. केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विरोध करण्यासाठीच शिवसेनेने या विषयाची काही जाण नसूनही शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिला, असे वक्तव्य माजी खासदार निलेश राणे यांनी केले.

संबंधित बातम्या:

‘शिवसेनेला शेतीतलं काय कळतं; फक्त मोदींच्या विरोधासाठी शेतकरी आंदोलनाला पाठिंबा’

महायुतीतून आणखी एक पक्षाबाहेर पडणार?, जानकरांनी घेतली पवारांची भेट

आघाडी कृषी कायद्यांना विरोध करते, मग महाराष्ट्रात त्याविरोधात विधेयक मंजूर का करत नाही? : सुधीर मुनगंटीवार

Praveen Darekar criticize shivsena and NCP