Presidential Election 2022 : आप, टीआरएसची दांडी, एमआयएमला आवतनच नाही; ममता बॅनर्जी यांच्या प्रयत्नांना पहिला झटका

| Updated on: Jun 15, 2022 | 5:18 PM

Presidential Election 2022 : ममता बॅनर्जी यांनी या बैठकीला काँग्रेसला बोलावल्याने टीआरएस नाराज आहे. काँग्रेस आणि भाजपपासून समान अंतर राखण्याचं आम्ही ठरवलं आहे. त्यामुळे आम्ही या बैठकीला येऊ शकत नसल्याचं टीआरएसने म्हटलं आहे.

Presidential Election 2022 : आप, टीआरएसची दांडी, एमआयएमला आवतनच नाही; ममता बॅनर्जी यांच्या प्रयत्नांना पहिला झटका
आप, टीआरएसची दांडी, एमआयएमला आवतनच नाही; ममता बॅनर्जी यांच्या प्रयत्नांना पहिला झटका
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

नवी दिल्ली: भाजपच्यासमोर राष्ट्रपतीपदाचा (Presidential Election) एकच आणि मजबूत उमेदवार देण्यासाठी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली. ममता बॅनर्जी यांनी भाजपविरोधातील सर्वच राजकीय पक्षांच्या प्रमुखांना या बैठकीला पाचारण केलं. सध्या ही बैठक दिल्लीतील कॉन्स्टिट्यूशनल हॉलमध्ये होत आहे. या बैठकीला अनेक महत्त्वाचे नेते आले आहेत. मात्र, आम आदमी पार्टी (AAP), टीआरएस (TRS) आणि एमआयएमने दांडी मारली आहे. त्यामुळे भाजपविरोधी नेत्यांची एकजूट करून राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत एकच उमेदवार देण्याच्या ममता बॅनर्जी यांच्या प्रयत्नांना पहिला झटका बसला आहे. तर हे तिन्ही पक्ष राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत तटस्थ राहणार की भाजपकडे जाणार यावर तर्कवितर्क लढवले जात आहेत. आजच्या बैठकीला काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधीही अनुपस्थित आहेत. त्याऐवजी काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे उपस्थित आहेत.

टीआरएस नाराज का?

ममता बॅनर्जी यांनी या बैठकीला काँग्रेसला बोलावल्याने टीआरएस नाराज आहे. काँग्रेस आणि भाजपपासून समान अंतर राखण्याचं आम्ही ठरवलं आहे. त्यामुळे आम्ही या बैठकीला येऊ शकत नसल्याचं टीआरएसने म्हटलं आहे. ज्या ठिकाणी काँग्रेस उपस्थित आहे, अशा कोणत्याही कार्यक्रमात आम्ही भाग घेऊ शकत नाही, असं टीआरएसने म्हटलं आहे. राज्यात काँग्रेस आमचा प्रतिस्पर्धी पक्ष आहे. त्यामुळे आम्ही त्यांच्यासोबत एकाच मंचावर एकत्रित येऊ शकत नाही. काँग्रेस नेते राहुल गांधी गेल्या महिन्यात तेलंगणात आले होते. यावेळी त्यांनी भाजपविरोधात एक शब्दही काढला नव्हता. उलट टीआरएसवर चुकीचे आरोप केले होते, असा आरोप टीआरएसने केला आहे.

हे सुद्धा वाचा

काँग्रेसवर विश्वास नाही

काँग्रेसवर विश्वास ठेवता येणार नाही. काँग्रेसने 2019मध्ये लोकसभा निवडणुकीसह गेल्या वर्षी झालेल्या हुजुराबाद विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपशी हातमिळवणी केली. काँग्रेसला संधी असतानाही त्यांनी भाजपला विजयी केलं, असा आरोपही टीआरएसने केला आहे.

तरीही गेलो नसतो

ममता बॅनर्जी यांनी आजच्या बैठकीला एमआयएमला आमंत्रण दिलं नाही. एमआयएमचे दोन खासदार आहेत. महाराष्ट्र आणि तेलंगणात मिळून 14 आमदार आहेत. तेलंगणात सात, बिहारमध्ये पाच आणि महाराष्ट्रात दोन आमदार आहेत. तरीही एमआयएमला या बैठकीला बोलावण्यात न आल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. दरम्यान, आम्हाला आमंत्रित केलं असतं तरी आम्ही त्या बैठकीला गेलो नसतो. कारण त्या बैठकीला काँग्रेसला बोलावण्यात आलं आहे, असं एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवैसी यांनी म्हटलं आहे.

आपचं वेट अँड वॉच

आम आदमी पार्टीही या बैठकीला गैरहजर आहे. राष्ट्रपती पदाचा उमेदवार जाहीर झाल्यानंतर आम आदमी पार्टी आपली राजकीय भूमिका स्पष्ट करणार आहे. त्यामुळे विरोधकांमध्ये तरी सध्या फूट पडलेली पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता विरोधक राष्ट्रपतीपदासाठी कुणाच्या नावावर शिक्कामोर्तब करतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.