
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील सर्वात मोठं न्यूज नेटवर्क TV9 ला एक्सक्लूझिव्ह मुलाखत दिलीय. ‘टीव्ही 9 मराठी’चे व्यवस्थापकीय संपादक उमेश कुमावत यांच्यासह TV9 ग्रुपच्या पाच व्यवस्थापकीय संपादकांनी ही मुलाखत घेतली आहे. या मुलाखतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 2014 ची लोकसभा निवडणूक, 2019 ची आणि 2024 ची लोकसभा निवडणूक या तीन निवडणुकांमध्ये नेमका फरक काय वाटतो? असा प्रश्न विचारण्यात आला. यावर मोदींनी सविस्तर प्रतिक्रिया दिली. “पहिली गोष्ट म्हणजे निवडणूक माझ्यासाठी नवीन नाही. मी अनेक वर्षापासून संघटनेत राहून निवडणूक लढवण्याचं काम केलं. त्यानंतर माझ्यावर आयुष्यात पहिल्यांदा गुजरातमधून निवडणूक लढवण्याची वेळ आली. आता मी आणखी एका वेगळ्या भूमिकेत आहे. देश आणि दुनियाच्या नजरेत एका विशेष जबाबदारीसह मी या निवडणुकीच्या मैदानात आहे”, अशी प्रतिक्रिया नरेंद्र मोदी यांनी दिली.
“२०१४च्या निवडणुकीत जेव्हा आम्ही मैदानात होतो, त्यावेळी लोकांच्या मनात अनेक प्रश्न होते. मोदी नवे आहेत. कोण आहेत? गुजराती बोलतात. पण लोकांच्या मनात आशा होती. २०१४मध्ये आशा होती. काही तरी करेल. जेव्हा २०१९च्या निवडणुकीत गेलो तेव्हा जी आशा होती, त्याचं विश्वासात रुपांतर झालं होतं आणि ते परिश्रम, परफॉर्मन्स, कन्सिस्टन्सी, क्लिअॅरिटी हे सर्व लोकांनी पाहिलं आणि विश्वास वाढला. २०१४ जे आशेने सुरू झालं होतं. विश्वासाच्या काळापर्यंत आलं होतं आता गॅरंटी झाली आहे”, असा दावा नरेंद्र मोदी यांनी केला.
“२०२४ची निवडणूक.. देशाला मी सांगतोय येस… हे होऊ शकतं. कारण माझा दहा वर्षाचा अनुभव आहे. काय होऊ शकतं आणि काय होऊ शकत नाही. मला माहीत आहे. २०१४मध्ये मला सेवा करण्याची मोठी संधी होती. मी सेवाभावासाठी समर्पित केलं होतं. २०१९ला मी जेव्हा लोकांकडे गेलो. तेव्हा रिपोर्टकार्ड घेऊन गेलो. तेव्हा म्हटलं मी एवढं काम केलंय. तेव्हा, लोकांना वाटलं दिशा तर योग्य आहे. एवढ्या काळात एवढं करून दाखवलं म्हणजे अजून करेल. २०२४मध्ये आम्ही जात होतो. जी सामान्य माणसाची आवश्यकता आहे ती मी अड्रेस केली. आता त्यांच्या अपेक्षांना अड्रेस करायचं आहे. त्यांच्या एस्परेशन्सला अड्रेस करायचं आहे. आता मला एका नव्या उंचीवर घेऊन जायचं आहे”, असं नरेंद्र मोदींनी सांगितलं.
“२०१४च्या निवडणुकीत आमच्यासमोर जी आघाडी होती. ते सरकारमध्ये होते. त्यांच्याकडे सर्व सरकारी साधनं होती. सत्ता वाचवण्यासाठी ते प्रयत्नही करत होते. मी मुख्यमंत्री होतो, तर त्यांनी मला टार्गेटही करून ठेवलं होतं. अनेक संकटाच्या काळातून आम्ही निघून जनतेच्या आशीर्वादाने पुढे आलो. अजून पुढे जाऊ असं मला वाटतं”, अशी प्रतिक्रिया नरेंद्र मोदींनी दिली.