PM Narendra Modi : संसद आमच्यासाठी तीर्थक्षेत्र ! विरोधकांनी चर्चा करावी, संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या प्रारंभी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आवाहन

| Updated on: Jul 18, 2022 | 10:35 AM

संसदेच्या अधिवेशनाचे महत्त्व सांगताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, ' हा स्वातंत्र्याचा अमृतमोहत्सव आहे. देशाचा प्रवास कसा राहिल. किती गतीमान होईल, याचा संकल्प करण्याचा काळ आहे.

PM Narendra Modi : संसद आमच्यासाठी तीर्थक्षेत्र ! विरोधकांनी चर्चा करावी, संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या प्रारंभी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आवाहन
Image Credit source: tv9
Follow us on

नवी दिल्लीः भारतीय संसद (Indian Parliament) ही आमच्यासाठी तीर्थक्षेत्र आहे. येथे खुल्या मनाने संवाद होईल. गरज असेल तर वाद-विवाद व्हावी, टीका व्हावी, पण या सदनाचा सकारात्मकतेसाठी उपयोग व्हावा, अशी अपेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी व्यक्त केली. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला (Monsoon Session) आजपासून सुरुवात होत आहे. 18 जुलै ते 12 ऑगस्ट या कालावधीत पावसाळी अधिवेशन चालणार आहे. आज सकाळीच 9 वाजेच्या सुमारास पंतप्रधान नरेंद्र मोदी संसद भवनाच्या जुन्या इमारतीत पोहोचले. अधिवेशन सुरु होण्यापूर्वी त्यांनी माध्यमांसमोर प्रतिक्रिया दिली. तसेच सर्व खासदारांना संसदेच्या अधिवेशनात उत्साहाने सहभागी होत चर्चेसाठी आमंत्रित केलं. विशेष म्हणजे आजच्या संसदेच्या अधिवेशनाचा पहिला दिवस खूप महत्त्वपूर्ण आहे. देशाच्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी आज मतदान घेतलं जात आहे. 21 ऑगस्ट रोजी या निवडणुकीचा निकाल जाहीर होईल.

पंतप्रधान मोदी काय म्हणाले?

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या सुरुवातीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व खासदारांना संबोधित करत प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, ‘ संसदेचं अधिवेशन हे संवादाचं एक सक्षम माध्यम आहे. मी याला तीर्थक्षेत्र मानतो. खुल्या मनाने संवाद होईल, गरज असेल तर वाद-विवाद होतील. टीका होईल. त्यामुळे सर्व खासदारांना विनंती करतो, येथे गहन चिंतन, चर्चा, उत्तम संवाद करुयात. सदनाला जेवढं उत्पादक बनवू, सार्थक बनवता येईल, तेवढं बनवू. सर्वाच्या प्रयत्नांतून संसद चालते. सदनाची गरीमा वाढवण्यासाठी आपण कर्तव्य बजावत या सत्राचा राष्ट्रहितासाठी सर्वाधिक उपयोग करू. स्वातंत्र्यासाठी ज्यांनी आपलं जीवन समर्पित केलं, लोक शहीद झाले. त्यांचे स्वप्न लक्षात घेत सदनाचा सर्वाधिक सकारात्मक उपयोग व्हावा, अशी अपेक्षा करतो…

देशाच्या प्रवासाची गती ठरवण्याचा संकल्प काळ

संसदेच्या अधिवेशनाचे महत्त्व सांगताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, ‘ हा स्वातंत्र्याचा अमृतमोहत्सव आहे. देशाचा प्रवास कसा राहिल. किती गतीमान होईल, याचा संकल्प करण्याचा काळ आहे. देशाला दिशा देण्याचा हा काळ आहे. सदनातील सर्व सदस्य नवी ऊर्जा भरतील. त्या दृष्टीने हे अधिवेशन अत्यंत महत्वाचे आहे. राष्ट्रपती पद आणि उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकाही होत आहेत. त्यासाठी सर्वांच्या सहकार्याची गरज आहे. सर्वांच्या प्रयत्नांनीच चांगले निर्णय होतात. सर्वांनी आपल्या कर्तव्याचं पालन करत या अधिवेशनाचा चांगला उपयोग करून घ्यावा.

आजपासून अधिवेशन, कोणते मुद्दे गाजणार?

संसदेत आजपासून पावसाळी अधिवेशन सुरु होत आहे. केंद्र सरकारने नुकतीच असंसदीय शब्दांची यादी जाहीर केली आहे. त्यामुळे विरोधी पक्ष संतप्त आहेत. केंद्र सरकारकडून ईड्या माध्यमातून विविध राज्यांतील विरोधी नेत्यांविरोधात सुरु असलेली कारवा, केंद्राची अग्निपथ योजना, महागाई, भारताच्या सार्वभौमत्त्वावर हल्ला, चीनची भारतीय सीमांतर्गत घुसखोरी यासह महाराष्ट्रातील सरकारची उलथापालथ आदी विषय विरोधकांकडून सरकारला धारेवर धरलं जाऊ शकतं. 18 जुलै 12 ऑगस्टपर्यंत चालणाऱ्या या अधिवेशनात 32 प्रस्ताव आणि बिले सभागृहात चर्चेसाठी येणार आहे.