‘सत्ता टिकवण्यासाठी तुम्ही सर्वच गुंडाळलं?’, राधाकृष्ण विखे पाटलांचा शिवसेनेवर निशाणा

| Updated on: Oct 29, 2020 | 9:00 PM

राधाकृष्ण विखे पाटील यांनी 'टीव्ही 9 मराठी'ला प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी शिवेसेनेवर सडकून टीका केली (Radhakrishna Vikhe Patil on Shiv Sena).

सत्ता टिकवण्यासाठी तुम्ही सर्वच गुंडाळलं?, राधाकृष्ण विखे पाटलांचा शिवसेनेवर निशाणा
Follow us on

अहमदनगर : “तुमचा मुद्दा मंदिरापुरता किंवा हिंदुत्वापूरता मर्यादित नव्हता मग कशापुरता आहे?”, असा खोचक सवाल भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी शिवसेनेला विचारला आहे. “सत्ता टिकवण्यासाठी तुम्ही सर्वच गुंडाळलं? महाराष्ट्राची जनता उघड्या डोळ्यांनी पाहत आहे. राज्यातील जनता याचा जाब तुम्हाला नक्की विचारणार”, असा घणाघात विखे पाटलांनी केला (Radhakrishna Vikhe Patil on Shiv Sena).

राधाकृष्ण विखे पाटील यांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी शिवेसेनेवर सडकून टीका केली. विखे पाटलांनी शिवसेनेच्या हिंदुत्वावर प्रश्न उपस्थित केले (Radhakrishna Vikhe Patil on Shiv Sena).

“शिवसेनेचा जर विचार केला तर त्यांच्याकडे कोणता मुद्दा आहे, हे महत्त्वाचं आहे. सत्ता टिकवण्यासाठी त्यांनी सर्व मुद्दे सोडून दिले आहेत. त्यांनी तर हिंदुत्वदेखील सोडलं आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी बाबरी मस्जिद माझ्या शिवसैनिकांनी पाडली, एवढं समर्थन केलं होतं. मात्र, आज त्यांच्याच शिवसेनेने सर्वच भूमिकांमध्ये बदल केला आहे”, अशी टीका विखे पाटलांनी केली.

उद्धव ठाकरे यांचं हिंदुत्वाच्या मुद्द्यावर दसरा मेळाव्यात उत्तर

दरम्यान, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन भाजपकडून होणाऱ्या टीकेवर प्रत्युत्तर दिलं होतं. “आम्हाला कुणीही हिंदुत्व शिकवू नये. आमचं हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व आहे. तुमच्यासारखं सोयीचं हिंदुत्व आम्ही मिरवत नाही”, असा टोला त्यांनी लागवला होता.

“बाबरी मशीद पडली तेव्हा महाराष्ट्रात आगडोंब उसळल्यावर फक्त शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना पुढे आली. त्यामुळे हा महाराष्ट्र वाचला. त्यावेळी आज हिंदुत्वाची शिकवण देणारे कुठे होते? कोणत्या बिळात हे लोक शेपूट घालून बसले होते?”, असे सवाल त्यांनी केले होते.

“मला हिंदुत्वाबद्दल प्रश्न विचारले जात आहे. मंदिर उघडत नाही म्हणून मला हे प्रश्न विचारले जात आहेत. याद राखा, वाघाला डिवचण्याचा प्रयत्न केला तर फटका मारणारच. तुम्हाला जर फटका मारून घ्यायचाच असेल तर जरूर या”, असं उद्धव ठाकरे म्हणाले होते.

“बाबरी पडली तेव्हा कुठल्या बिळात शेपट्या घालून पडले होते? ज्यांचं नाव कुणालाही माहीत नव्हतं ते लोक मला हिंदुत्वाबाबत विचारत आहे, असं सांगतानाच कोरोना आला की घंटा बडवा, थाळ्या वाजवा हेच तुमचं हिंदुत्व. इकडे गाय म्हणते माता आणि पलिकडे जाऊन खाता हेच का तुमचं हिंदुत्व?”, असे टोलेही त्यांनी लगावले होते.

संबंधित बातमी :

इकडे गाय म्हणजे माता, पलिकडे जाऊन खाता; हे तुमचं हिंदुत्व?: उद्धव ठाकरे