महाराष्ट्रात कोरोना का वाढला?; राज ठाकरे यांनी सांगितली दोन कारणं!

| Updated on: Apr 06, 2021 | 12:06 PM

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्रात कोरोना का वाढला याची दोन कारणं आज सांगितली. (raj thackeray addressing media on lockdown)

महाराष्ट्रात कोरोना का वाढला?; राज ठाकरे यांनी सांगितली दोन कारणं!
raj thackeray
Follow us on

मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्रात कोरोना का वाढला याची दोन कारणं आज सांगितली. राज यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे ही कारणं मांडली असून त्यावर उपाय करण्याच्या सूचनाही केल्या आहेत. (raj thackeray addressing media on lockdown)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात लागू केलेला विकेंड लॉकडाऊन आणि राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांनी दिलेला राजीनामा या पार्श्वभूमीवर राज ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. काल मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना फोन केला होता. लॉकडाऊनबाबत बोलण्यासाठी त्यांच्याकडे भेटीची वेळ मागितली होती. परंतु त्यांच्या आजूबाजूला कोविडचे रुग्ण असल्याने ते क्वॉरंटाईन आहेत. त्यामुळे त्यांची भेट होऊ शकली नाही. म्हणून झूम अॅपवरून आमचं बोलणं झालं. त्यात कोविड आणि लॉकडाऊनबाबत चर्चा झाली, असं राज ठाकरे म्हणाले.

या कारणाने कोरोना वाढला

बाहेरच्या राज्यातून येणारी माणसं आणि त्यांची न झालेली चाचणी यामुळे कोरोना वाढला. तसेच इतर राज्यात कोरोना रुग्णांची चाचणीच केली जात नाहीत. त्यामुळे त्या राज्यात किती रुग्ण आहेत याचे आकडेच येत नाहीत. महाराष्ट्रात कोरोनाची टेस्टिंग केली जात आहे. त्यामुळे कोरोनाचे आकडे बाहेर येतात, असं राज म्हणाले. राज्यात परत येणाऱ्या बाहेरच्या लोकांची मोजणी करावी आणि त्यांची चाचणी करावी अशी सूचना मी केली होती. परंतु, त्याकडे लक्ष दिलं नाही. कुणाचीही मोजणी आणि चाचणी केली नाही. त्यामुळे ही संख्या वाढली आहे. कोण येतंय कोण जातंय हे कुणालाच माहीत नव्हतं. आज कोरोना आहे, उद्या आणखी काही असेल. हे दुष्टचक्र न थांबणारं आहे, असंही ते म्हणाले.

महाराष्ट्रातील कोरोनाची लाट मोठी

राज्यात पेशंटची संख्या वाढत आहे. आधी पेक्षा ही लाट सर्वाधिक मोठी आहे. महाराष्ट्रातच कोरोनाची सर्वात मोठी लाट का आहे? असं मुख्यमंत्र्यांना मी विचारलं. परंतु याबाबतच्या खऱ्या गोष्टी लोकांसमोर मांडणं गरजेचं आहे. महाराष्ट्र हे औद्योगिक राज्य आहे. त्यामुळे बाहेरचे लोक येत असतात. पश्चिम बंगालमध्ये निवडणुका होतात, शेतकऱ्यांचे मोर्चेही सुरू आहे. तिथे कोरोनाची लाटबिट नाही. फक्त महाराष्ट्रातच आहे, असं राज म्हणाले.

राज यांच्या सूचना

मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या झूमच्या मिटींगवर राज यांनी काही सूचनाही मांडल्या. जे छोटे उद्योग आहेत, त्यांना उत्पादन करायला सांगितलंय पण विक्रीला बंदी आहे, असं असेल तर उत्पादन करुन ठेवायचं कुठे, विकायचं नाही तर उत्पादन का करायचं? त्यामुळे दोन-तीन दिवस विक्रीसाठी उद्योग सुरु ठेवण्याची परवानगी द्या, छोट्या व्यापाऱ्यांना आठवड्यातून 2-3 दिवस दुकानं सुरु करण्यास परवानगी द्यावी, अशी विनंती मुख्यमंत्र्यांना केली. अनेकांनी छोटी मोठी कर्ज घेतली आहेत. बँकांकडे पैसा गेला पाहिजे मान्य, पण लोकांकडे पैसा असेल तर बँकात जाईल. सक्तीने वसूल केलं जात आहे. 30 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन आहे, मग लोकांनी हप्ते कसे भरावे?, त्यात ग्राहकांना सवलत द्यावी, तसेच लॉकडाऊन काळात सरसकट वीजबिल माफ करावं, जीएसटीबाबत व्यापाऱ्यांना  सूट द्या, राज्याने केंद्राशी बोलावं, लॉकडाऊनमध्ये सरकारी कंत्राटी कामगारांना घेतलं होतं, पण नंतर काढून टाकलं. मी सूचना केली, त्यांना घ्या. पालिकेत कायमस्वरुपी सामावून घ्या. तहान लागली की विहीर खोदणं योग्य नाही, जीम, सलून यांनाही दोन-तीन दिवस सुरु ठेवण्याची परवानगी द्यावी, स्वीमिंग पूल बंद ठिक आहे. पण खेळाडूंना सवलत हवी. स्वीमिंग पूल असो वा अन्य खेळ, बॉडी बिल्डरना सराव करण्यासाठी जीम सुरु ठेवावी, शेतकऱ्यांना हमीभाव द्यावा. शेतकरी जर कोसळला तर पुन्हा अजून मोठं संकट येईल, शाळा बंद आहेत, पण शाळांच्या फी तशाच आहेत. या शाळांना फी घेऊ नका, अर्धी घ्या, दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना प्रमोट करा, परीक्षा न घेता पास करा.. ते कोणत्या मानसिकतेत माहिती नाहीत.. ही पोरं तर लहान, कुठून अभ्यास करणार , कशा परीक्षा देणार, माहिती नाहीत आदी सूचना मुख्यमंत्र्यांना केल्या असून त्यांनीही या सूचना योग्य असून मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्यावर चर्चा करू असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याचं ते म्हणाले. (raj thackeray addressing media on lockdown)

 

संबंधित बातम्या:

Raj Thackeray PC LIVE : दहावी-बारावी विद्यार्थ्यांना प्रमोट करा, राज ठाकरे यांची पत्रकार परिषद

दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना प्रमोट करा, राज ठाकरेंची मुख्यमंत्र्यांकडे महत्त्वाची मागणी

‘किंबहुना’ वापरलं तर चालेल ना; राज ठाकरेंची मुख्यमंत्र्यांच्या भाषणाच्या शैलीवर मिश्किल टिप्पणी

(raj thackeray addressing media on lockdown)