बार्शी : आर्यन शुगर या साखर कारखान्याने (Aryan Sugar) शेतकऱ्यांचे थकवलेले बील देण्याबाबत आमदार राजेंद्र राऊत (Rajendra Raut) यांनी माजी मंत्री दिलीप सोपल (Dilip Sopal) यांना इशारा दिला आहे. लोकांचे पैसे बुडवून आमचा काही संबंध नाही असं म्हणणाऱ्या दिलीप सोपलांवर ईडीची चौकशी लावणार आहे असं मोठं वक्तव्य त्यांनी केलं आहे. शेतकऱ्यांचे पैसे खायचे आणि माझा काही संबंध नाही म्हणायचं ही मग्रूरीची भाषा चालणार नाही आता ई़डी, इन्कम टॅक्स आहे, माझा काय संबंध असे म्हणून चालणार नाही. यापूर्वीच आम्ही सोलापूर शहर पोलीस आणि पांगरी पोलीस स्टेशनला कारखान्याच्या संचालकांविरुद्ध तक्रार केलेली आहे. बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत आणि माजी मंत्री दिलीप सोपल यांच्यात शाब्दिक युद्ध रंगलेले आहे. बार्शीतील आर्यन शुगर प्रकरणी माजी आमदार दिलीप सोपल यांनी कारखान्याला ऊस घातलेल्या शेतकऱ्यांच्या बीला संदर्भात आमचा काही संबंध नाही असे वक्तव्य केले होते. त्यावर आमदार राजेंद्र राऊत आक्रमक झाले आहेत. यापूर्वी मी वयाचा मान राखून गप्प बसलो होतो. मात्र आता ईडीची चौकशी लावल्याशिवाय राहणार नाही असा इशारा दिलीप सोपल यांना दिला आहे.
मागच्या काही दिवसांपासून शेतकऱ्यांचे थकवलेले बील तात्काळ मिळावे यासाठी आमदार राजेंद्र राऊत प्रयत्न करीत आहेत. परंतु ते शेतकऱ्यांच्या खात्यावर अद्याप जमा झालेले नाहीत. त्यामुळे राजेंद्र राऊत यांनी दिलीप सोपल यांना ईडी लावण्याचा इशारा दिला आहे. तसेच त्याबाबत पोलिस स्टेशनमध्ये तक्रार देखील दाखल केली आहे. दिलीप सोपल यांनी माझा शेतकऱ्यांच्या बिला संदर्भात कसलाही संबंध नसल्याचं सांगितलं आहे. त्यामुळे राजेंद्र राऊत सध्या एकदम आक्रमक झाले आहेत.
महाविकास आघाडी सरकार राज्यात असताना अनेक मंत्र्यांच्यावरती ईडीची कारवाई झाली आहे. तसेच अनेक मंत्र्यांवरती ईडीची कारवाई होणार असल्याचे भाजपचे नेते जाहीरपणे सांगत होते. मागच्या दोन दिवसांपूर्वी मोहित कंबोज यांनी राष्ट्रवादीच्या मोठ्या नेत्याला अटक होणार असल्याचं सोशल मीडियावर जाहीर केलं होतं. त्यामुळे राज्यात पुन्हा राजकीय घडामोडींना वेग आला आहे.