भावना गवळी यांचा पत्ता कट, यवतमाळ-वाशिममधून राजश्री पाटील यांना उमेदवारी?
सलग पाच वेळा खासदार राहिलेल्या भावना गवळी यांना मोठा धक्का बसणार आहे. कारण त्यांच्या उमेदवारीवर टांगती तलवार आहे. त्यांच्या ऐवजी शिवसेना शिंदे गटाकडून राजश्री पाटील यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे.

हेमंत पाटील यांच्या पत्नी राजश्री पाटील यांना यवतमाळ-वाशिममधून लोकसभा निवडणुकीचं तिकीट मिळणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे भावना गवळी यांचे तिकीट कापलं जाणार आहे. भावना गवळी यांच्या जागी राजश्री पाटील यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता असली तरी भावना गवळी यांनी आपला दावा कायम ठेवला आहे. भावना गवळी या पाच वेळा खासदार आहेत. त्यामुळे त्याचा दावा कायम आहे. भावना गवळी यांच्या उमेदवारीवर टांगती तलवार आहे. त्यामुळे त्या मुंबईमध्ये तळ ठोकून आहेत. याआधी त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. पण त्यांच्या सर्व्हेमध्ये भावना गवळी यांच्या विरोधात वातावरण असल्याने त्यांचं तिकीट कापलं जाणार अशी शक्यता आहे.
वाशिम-यवतमाळ लोकसभेचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी फक्त १ दिवस शिल्लक आहेत. मात्र अजून शिवसेना शिंदे गटाकडून उमेदवारी जाहीर झालेली नाही. त्यांनी मुंबईत वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. याआधी या जागेसाठी संजय राठोड यांच्याही नावाची चर्चा होती. पण ते निवडणूक लढवण्यासाठी इच्छूक नसल्याने आता राजश्री पाटील यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
ठाकरे गटाकडून संजय देशमुखांना उमेदवारी
शिवसेना शिंदे गटाकडून अजून उमेदवार जाहीर झाला नसला तरी महाविकास आघाडीकडून ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार संजय देशमुख यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय. यावेळी आदित्य ठाकरे आणि रोहित पवार हे देखील यवतमाळमध्ये आले होते. त्यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज भरला. रोहित पवार यांनी भावना गवळी यांना लक्ष्य केलं.
भावना गवळी यांनी सलग पाचवेळा या मतदारसंघातून विजय मिळवला आहे. पण भावना गवळी यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप झाल्याने त्यांच्या विरोधात वातावरण असल्याचं सर्व्हेमध्ये दिसून आलं आहे. त्यामुळे आता कोणाला संधी मिळते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.