महाविकासआघाडी की युतीसोबत? राजू शेट्टी यांनी स्पष्टपणे सांगितलं…

| Updated on: Oct 31, 2022 | 2:55 PM

स्वाभिमानी शेतकरी संघटनेते नेते राजू शेट्टी यांनी आपली पुढची राजकीय भूमिका स्पष्ट केलीय...

महाविकासआघाडी की युतीसोबत? राजू शेट्टी यांनी स्पष्टपणे सांगितलं...
Follow us on

सोलापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेते नेते राजू शेट्टी (Raju Shetti) हे मागच्या काही दिवसांपासून जास्त सक्रीय नाहीयेत. त्यामुळे त्यांची राजकीय भूमिका काय अशी चर्चा होतेय. राजू शेट्टी नक्की महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) की युतीचा (Yuti) भाग असणार याची चर्चा होतेय. त्यावर राजू शेट्टी यांनी आपली भूमिका स्पष्ट केलीय. ‘एकला चलो रे’ची भूमिका त्यांनी घेतली आहे.

महाविकास आघाडीत जाण्याबाबात त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केलीय. महाविकास आघाडीत जाणं म्हणजे असंगाशी संग करणं होय, असं राजू शेट्टी म्हणालेत.

निवडणुका लढवणं किंवा राजकारण करणं हा आमचा धंदा नाही. शेतकरी चळवळ मजबूत करण्यासाठी, वेगवेगळ्या सभागृहात प्रतिनिधी पाठवण्यासाठी आम्ही असंगाशी संग करण्याचा आम्ही प्रयत्न केला. मात्र त्यात आम्हाला चांगले अनुभव आलेले नाहीत. त्यामुळे यापुढे आम्ही महाविकास आघाडी किंवा भाजप यांच्यापासून लांब राहण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही स्वतंत्रपणे दोन्ही आघड्यापासून दूर राहत कार्य करणार, असं राजू शेट्टी यांनी सांगितलं आहे.

रवी राणा आणि बच्चू कडू यांच्यातील वादावरही राजू शेट्टी यांनी आपलं मत मांडलंय. खोक्यांच्या प्रभावाने राज्याचा मुख्यमंत्री बदलत असेल तर रवी राणांनी दिलगिरी व्यक्त करणं किरकोळ बाब आहे, असं शेट्टी म्हणालेत.

ओल्या दुष्काळावर काय म्हणाले?

सध्याची परिस्थिती ओल्या दुष्काळाच्या निकषात बसत नसेल तर निकष बदला. पाऊस तरी निकषात कुठे बसतो?वैश्विक तापमान वाढीमुळे सगळे ऋतू बदललेले आहेत. त्यामुळे बदलत्या काळाप्रमाणे तुम्ही तुमची धोरण बदलली नाहीत तर उपयोग काय? मात्र हे सर्व निकष, धोरण हे मदत देण्यासाठी आहे की टाळण्यासाठी हे सरकारने सांगावं, असं राजू शेट्टी म्हणालेत.

कोणत्याही सरकारचे 100 दिवसात परीक्षण करता येत नाही. या सरकारने आपण लोकोपयोगी सरकार आहोत, अशी चुणूक शंभर दिवसात दाखवलेली नाही. सरकार दहीहंडीत गोविंदा, गणपतीमध्ये डॉल्बी बाबत जी तत्परता दाखवली ती शेतकऱ्यांबाबत का दाखवत नाही. महाराष्ट्रात ऊस वगळता एकही पीक अतिवृष्टीमुळे शिल्लक राहिले नाही. मात्र कृषी मंत्री शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखं बोलतात, असं शेट्टी म्हणालेत.