‘महाराष्ट्रात केंद्र आणि राज्य सरकारमध्ये टोळीयुद्ध सुरु, महाविकास आघाडी भलत्याच कामात व्यस्त’, राजू शेट्टींचा टोला

| Updated on: Nov 07, 2021 | 8:09 PM

सोलापुरात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली थकीत ऊस बिलासंदर्भात काँग्रेस भवनसमोर 12 दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. आंदोलकांची भेट घेण्यासाठी राजू शेट्टी आले होते. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना शेट्टी यांनी महाविकास आघाडी सरकार आणि केंद्रातील भाजप सरकारवर निशाणा साधला.

महाराष्ट्रात केंद्र आणि राज्य सरकारमध्ये टोळीयुद्ध सुरु, महाविकास आघाडी भलत्याच कामात व्यस्त, राजू शेट्टींचा टोला
राजू शेट्टी, स्वाभिमानी शेतकरी संघटना
Follow us on

सोलापूर : महाराष्ट्रात केंद्र आणि राज्य सरकारमध्ये गुंडांप्रमाणे टोळी युद्ध सुरु आहे. जनतेच्या मुलभूत प्रश्नांकडे दोन्ही सरकारचं दुर्लक्ष होत असल्याची टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी केलीय. दिवसेंदिवस पेट्रोल-डिझेलच्या किमती वाढत आहेत. यावर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी बोलणे गरजेचं आहे. असं असताना ते भलत्याच कामात व्यस्त असल्याचा टोलाही त्यांनी लगावलाय. सोलापुरात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली थकीत ऊस बिलासंदर्भात काँग्रेस भवनसमोर 12 दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. आंदोलकांची भेट घेण्यासाठी राजू शेट्टी आले होते. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना शेट्टी यांनी महाविकास आघाडी सरकार आणि केंद्रातील भाजप सरकारवर निशाणा साधला. (Raju Shetty’s criticism of the Mahavikas Aghadi government and the central government)

बिघडलेल्या अभिनेत्यांची बिघडलेली पोरं गांजा ओढतात. यावर सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. पण इथे महापुरात बुडालेला शेतकरी, अतिवृष्टीमुळे उध्वस्त झालेला शेतकरी, ऊस बिल न मिळाल्याने आंदोलन करणारा शेतकऱ्यांकडे लक्ष द्यायला सरकारकडे वेळ नाही हे दुर्दैवी आहे. इथे केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यामध्ये राजकीय टोळीयुद्ध सुरू आहे. गुंडांच्या टोळ्यांप्रमाणे एकमेकांना बघून घेण्याची भाषा केली जाते, असा घणाघात शेट्टी यांनी केलाय.

‘शेतकऱ्यांच्या हिताचं रक्षण करण्यात सरकार कमी पडतंय’

ऐन दिवाळीच्या काळात रस्त्यावर उतरत शेतकरी बेवारशासारखा आंदोलन करत आहेत आणि पोलीस त्यांच्यावर कारवाई करतात, ही शरमेची बाब आहे. वास्तविक 14 दिवसात ऊस बिले अदा करणं बंधनकारक आहे. अन्यथा कारखानदारांवर कारवाई करणं गरजेचं आहे. सरकार शेतकऱ्यांच्या हिताचं रक्षण करायला कमी कमी पडत असल्याचा आरोपही शेट्टी यांनी यावेळी केलाय.

सिद्धराम म्हेत्रेंचा शेट्टींकडून समाचार

दरम्यान, ऊस बिल मागण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यांवर माजी मंत्री सिद्धराम म्हेत्रे भडकले होते. रागाच्या भरात त्यांनी एका शेतकऱ्याला शिवी देखील हासडली होती. त्याचा एक व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होतोय. त्यावरुन शेट्टी यांनी म्हेत्रे यांचा चांगलाच समाचार घेतला. ‘आपल्या घामाचा मोबदला मागायला गेलेल्या शेतकऱ्यांना शिव्या दिल्या जातात. शिव्या घ्यायच्या झाल्या तर त्यांच्यापेक्षा जास्त घाण शिव्या आम्हाला येतात. मात्र ती आमची संस्कृती नाही. यावरून अक्कलकोटची संस्कृती कुठल्या थराला गेली आहे याचा अंदाज येईल’, अशी घणाघाती टीका शेट्टी यांनी केलीय.

इतर बातम्या :

‘नगर जिल्ह्यात लग्न झाल्यावर पाण्यावर भाषणं व्हायची!’ शरद पवारांनी सांगितला किस्सा, बदलत्या परिस्थितीचंही कौतुक

पूर्वी परातीत चहा यायचा नंतर कप आले, त्याचा कान तुटलेला, ती परिस्थिती सहकार क्षेत्रानं बदलली: शरद पवार

Raju Shetty’s criticism of the Mahavikas Aghadi government and the central government