भाजप-मनसे एकत्र आल्यास भाजपचं नुकसान : रामदास आठवले

| Updated on: Jan 10, 2020 | 8:18 PM

भाजप आणि मनसे एकत्र आले तर भाजपचं नुकसानच होईल, असं मत आयपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी व्यक्त केले.

भाजप-मनसे एकत्र आल्यास भाजपचं नुकसान : रामदास आठवले
Follow us on

मुंबई : भाजप आणि मनसे एकत्र आले तर भाजपचं नुकसानच होईल, असं मत आयपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी व्यक्त केले. केंद्र सरकारने पारित केलेल्या नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या (CAA) समर्थनार्थ रामदास आठवले यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता. यावेळी रामदास आठवले यांनी भाजप-मनसे युतीवर भाष्य केलं (Ramdas Athwale Statement on BJP-MNS Alliance).

“राज ठाकरे भाजपसोबत येणं हे भाजपसाठी फायद्याचं ठरणार नाही आणि जर राज ठाकरेंनी त्यांच्या भूमिकेत बदल केला तर त्यात त्यांचं (मनसे) नुकसान आहे. त्यामुळे भाजप-मनसे युती होऊ शकत नाही. शिवसेनेने जरी आज भाजपसोबत नसेल, तरी आरपीआय मात्र भाजप, नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीससोबत ताकदिने उभी आहे. दलितांची मतं मिळवण्यासाठी आरपीआयचं भाजपला समर्थन आहे. त्यामुळे राज ठाकरेची काही गरज नाही”, अशी भूमिका रामदास आठवले यांनी मंडली.

भाजप नेते देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची गुप्त भेट झाल्यानंतर भाजप-मनसे युतीच्या चर्चांना उधाण आलं आहे. यावर भाजप आणि मनसे नेते या युतीच्या समर्थनार्थ वक्तक्य करत आहेत. एकीकडे ‘महाराष्ट्राच्या राजकारणात बेरीज महत्त्वाची, हे आपलं वैयक्तिक राजकीय निरीक्षण’ असल्याचं ट्वीट मनसेच्या संदीप देशपांडे यांनी केलं. तर भाजप नेते रावसाहेब दोनवे यांनीही भापज-मनसे युतीचे संकेत दिले. “भाजप आणि मनसेची विचारसरणी वेगळी आहे. जर मनसेने त्यांच्या भूमिकेत काही बदल केला तर भविष्यात काही होऊ शकतं”, असं रावसाहेब दानवे म्हणाले होते.

फडणवीस काय म्हणाले होते?

मनसे आणि भाजप एकत्र येणार का असा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आला, त्याबाबत फडणवीस म्हणाले, “मनसे आणि भाजप एकत्र येण्याची आज तरी कोणतीही चिन्हं नाहीत. मनसे आणि भाजपच्या विचारात अंतर आहे. आम्ही राष्ट्रीय पक्ष असल्याने व्यापक विचार करतो. पण मनसेचे विचार वेगळे आहेत. मनसेने विचार आणि कार्यपद्धती बदलली तर भविष्यात विचार करु, पण सध्यातरी ही शक्यता वाटत नाही.”

फडणवीस-राज ठाकरे भेट

देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांची मंगळवारी 7 जानेवारीला गुप्त भेट झाली होती. प्रभादेवी येथील हॉटेल इंडिया बुल्स स्कायमध्ये जवळपास दीड तास दोघांमध्ये चर्चा झाली होती. महत्त्वाचं म्हणजे या भेटीनंतर देवेंद्र फडणवीस हे पुढील दाराने, तर राज ठाकरे मागील दाराने बाहेर पडले. ‘टीव्ही 9 मराठी’च्या कॅमेऱ्यात ही दृश्यं कैद झाली होती.

या बैठकीसाठी अत्यंत गोपनीयता बाळगण्यात आली होती. राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांचे मित्र गुरुप्रसाद रेगे हे या बैठकीला उपस्थित होते. महत्त्वाचं म्हणजे राज ठाकरे या बैठकीसाठी कोणत्याही सुरक्षा रक्षकाशिवाय आले होते. तर देवेंद्र फडणवीस यांनीही या बैठकीबाबत मोठी गोपनीयता बाळगली होती. या भेटीनंतर गुरुप्रसाद रेगे देवेंद्र फडणवीस यांना गाडीपर्यंत सोडण्यासाठी खाली आले होते.

Ramdas Athwale Statement on BJP-MNS Alliance