“आता गुजराती भाषिकांचा मेळावा, भविष्यात मुस्लिमांचाही मेळावा घेतील, बिचाऱ्या शिवसेनेवर संगतीचा परिणाम”, दानवेंचा टोमणा

| Updated on: Jan 05, 2021 | 3:37 PM

"शिवसेना भविष्यात मुस्लिम समाजाचादेखील मेळावा घेऊ शकतात. कारण त्यांची बिचाऱ्यांची भूमिका बदलली. हा संगतीचा परिणाम आहे", असा चिमटा रावसाहेब दानवे यांनी काढला (Raosaheb Danve slams Shiv Sena).

आता गुजराती भाषिकांचा मेळावा, भविष्यात मुस्लिमांचाही मेळावा घेतील, बिचाऱ्या शिवसेनेवर संगतीचा परिणाम, दानवेंचा टोमणा
Follow us on

मुंबई : “शिवसेनेची भूमिका परप्रांतीयांच्याबाबत अनेकवेळा समोर आलेली आहे. आता सत्तेत आल्यावर त्यांची भूमिका आपण पाहत आहोत. भविष्यात ते मुस्लिम समाजाचादेखील मेळावा घेऊ शकतात. कारण त्यांची बिचाऱ्यांची भूमिका बदलली. हा संगतीचा परिणाम आहे. कदाचित अन्य पक्षाच्या सोबत राहिल्यावर त्यांची भूमिका बदलली असेल”, असा चिमटा भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी ‘टीव्ही 9 मराठी’सोबत बोलताना लगावला (Raosaheb Danve slams Shiv Sena).

आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने मोर्चेबांधनीला सुरुवात केली आहे. मुंबई महानगरपालिका हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. त्यामुळे यावेळी शिवसेनेने मुंबई राखण्यासाठी गुजराती मतदारांना जागृत करण्यासाठी मोहीम हाती घेतली आहे. गुजराती मतदारांना आकर्षित करण्यासाठी शिवसेनेने गुजराती बांधवाचा मेळावा आयोजित केला आहे. या मेळाव्यासाठी ‘मुंबई मा जलेबी ना फाफडा, उद्धव ठाकरे आपडा’ अशी टॅगलाईन वापरली जात आहे. मात्र, या मेळाव्यावरुन रावसाहेब दानवे यांनी शिवसेनेवर टीका केली आहे (Raosaheb Danve slams Shiv Sena).

औरंगाबाद शहराच्या नामांतरावरुन चांगलीय राजकीय वातावरण तापलं आहे. या मुद्द्यावरुनदेखील रावसाहेब दानवे यांनी शिवसेनेला घेरण्याचा प्रयत्न केला. “1995 साली भाजप आणि शिवसेनेच्या युतीचं सरकार असताना विधीमंडळात औरंगाबाद शहराचं नाव संभीजीनगर होईल, असा ठराव झाला होता. औरंगाबाद शहराचं नाव संभाजीनगर व्हावं, अशी भाजपसोबत शिवसेनेची देखील तेव्हा स्पष्ट भूमिका होती. शिवसेनेने त्या भूमिकेपासून दूर जाऊ नये. संभाजीनगर नावाला आमचं समर्थन आहे. संभाजी महाराजांच्या नावाला काँग्रेस विरोध करत असेल तर आता शिवसेनेने आपली भूमिका स्पष्ट करावी”, असं आवाहन त्यांनी केलं.

“महाविकास आघाडी सरकारमधील घटक दलांनी एकत्र बसलं पाहिजे. तिन्ही पक्षांनी एकत्रितरित्या आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे. काँग्रेसने जशी भूमिका स्पष्ट केली तशी शिवसेना आणि राष्ट्रवादीने देखील भूमिका स्पष्ट करावी. भाजप काँग्रेसच्या भूमिकेविरोधात आहे. औरंगाबाद शहराचं नामकरण संभाजीनगर म्हणून झालं पाहिजे, अशी आमची भूमिका आहे”, असं दानवे म्हणाले.

“पाच वर्षात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी काय केलं? असं म्हणण्यापेक्षा पाच वर्ष तुम्हीदेखील आमच्यासोबत सत्तेत होता ना? पाच वर्षात तुम्ही तरी नामांतराचा विषय काढला का? आता ते सर्व विसरले आहेत”, असा घणाघात त्यांनी केला.

“निवडणुका हा नामांतराचा प्रश्न होऊ शकत नाही. पण ते जर निवडणुका डोळ्यासमोर घेऊन याबाबत भूमिका मांडत असतील तर ते चुकीचे आहे. विकास आणि नामांतर या दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत. कोलकाता आणि बंगळुरुचं नाव बदललं. मद्रासचं नाव चेन्नई केलं. नाव बदललं म्हणून तिथला विकास थांबला नाही. विकासाची गाडी रुळावर राहू द्या. विकासाला आड आणू नका. नाव हा आमच्या आत्मसन्मानाचा भाग आहे. त्यामुळे ते बदललं पाहिजे”, अशी भूमिका रावसाहेब दानवे यांनी स्पष्ट केली.

हेही वाचा : गणेश नाईकांना हादरा, आधी तीन भाजप नगरसेवक सेनेत, आता दोघांच्या हाती ‘घड्याळ’