शेतकरी आंदोलनाबाबत रावसाहेब दानवेंनी केलेलं वक्तव्य चुकीचं, त्यांनी पोलिसांना पुरावे द्यावे : सतेज पाटील

| Updated on: Dec 09, 2020 | 11:13 PM

दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनात चीन आणि पाकिस्तानचा हात असल्याचा अजब दावा भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी केला होता.

शेतकरी आंदोलनाबाबत रावसाहेब दानवेंनी केलेलं वक्तव्य चुकीचं, त्यांनी पोलिसांना पुरावे द्यावे : सतेज पाटील
Follow us on

कोल्हापूर : दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनात चीन आणि पाकिस्तानचा हात असल्याचा अजब दावा भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी केला होता. यावर आता राजकीय प्रतिक्रिया येत आहेत. शेतकरी आंदोलनाबाबत रावसाहेब दानवेंनी केलेलं वक्तव्य चुकीचं असून त्यांच्याकडे याबाबबतचे पुरावे असतील तर ते त्यांनी पोलिसांना द्यावेत आणि आपल्या वक्तव्यावर ठाम राहावे, असा खोचक सल्ला गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी दिला आहे. (Raosaheb Danve’s statement about farmers protest is wrong, he should give evidence to police : Satej Patil)

सतेज पाटील म्हणाले की, “रावसाहेब दानवे हे एक ज्येष्ठ राजकीय नेते आहेत, त्यांनी अशा पद्धतीचे वक्तव्य करणं चुकीचे आहे. शेतकऱ्यांबद्दल सर्व देशभरात सहानुभूतीचे वातावरण आहे, असे असताना दानवे यांनी अशा प्रकारचे वक्तव्य कोणत्या पुराव्याच्या आधारे केलं हे त्यांनी स्पष्ट करावं. जर त्यांच्याकडे असे काही पुरावे असतील तर त्यांनी ते पोलिसांना द्यावेत आणि स्वतःच्या वक्तव्यावर ठाम राहावं”

दानवे काय म्हणाले होते?

राजधानी दिल्लीत गेल्या 13 दिवसांपासून पंजाब, हरयाणातील शेतकरी ठाण मांडून बसले आहेत. देशातील इतर राजकीय पक्ष व शेतकरी संघटनांनी शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. एकीकडे हे आंदोलन तीव्र होत असतानाच दुसरीकडे भाजपचे नेते या आंदोलनावर टीका करताना दिसत आहे. रावसाहेब दानवे यांनी तर या आंदोलनाचा संबंध थेट चीन व पाकिस्तानशी जोडून नवा वाद ओढवून घेतला आहे.

‘हे शेतकऱ्यांचं आंदोलन नसून या पाठीमागे चीन आणि पाकिस्तानचा हात आहे. पहिल्यांदाच देशातील मुस्लिम समाजाला भरकटवलं आणि सीएए आणि एनसीआरमुळं मुस्लिमांना देशाबाहेर जावं लागेल, असं सांगितलं. पण एखादा तरी मुसलमान बाहेर गेला का?’ असा सवाल दानवेंनी यावेळा केला.

मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकार गंभीर : सतेज पाटील

दरम्यान मराठा आरक्षणप्रश्नी बोलताना सतेज पाटील म्हणाले की, “मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकार प्रयत्नशील आहे, राज्य सरकारने कायदेशीर सल्लागारदेखील चांगलेच नेमलेले आहेत. मराठा आरक्षणाबाबत कोणतीही कमतरता राज्य सरकारच्या वतीने राहू दिली जाणार नाही. तसेच आरक्षणाबाबत चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या वक्तव्याला आम्ही गांभीर्याने घेत नाही, महाविकास आघाडी सरकार मराठा आरक्षणाबाबत गंभीरच आहे”.

इतर बातम्या 

दानवेंचा डीएनए हिंदुस्थानचा की पाकिस्तानचा, चेक करावा लागेल; बच्चू कडू यांची घणाघाती टीका

सुपारीबाज आंदोलकांना मोदी भीक घालणार नाहीत; तुमची दमबाजी मोडूनच काढायला हवी : अतुल भातखळकर

“मतदारांनी भाजपला जागा दाखवली, कुठलीही पालिका निवडणूक लढवा, पराभव निश्चित”

(Raosaheb Danve’s statement about farmers protest is wrong, he should give evidence to police : Satej Patil)