रश्मी ठाकरेंच्या पहिल्याच ‘सामना’ अग्रलेखात भाजपवर हल्लाबोल

| Updated on: Mar 02, 2020 | 8:11 AM

भाजपचे दादामियां 'इतिहास पुरुष' कधीपासून झाले? असा टोला रश्मी ठाकरे यांनी 'सामना'च्या अग्रलेखातून चंद्रकांत पाटील यांना लगावला आहे

रश्मी ठाकरेंच्या पहिल्याच सामना अग्रलेखात भाजपवर हल्लाबोल
Follow us on

मुंबई : मिसेस मुख्यमंत्री अर्थात रश्मी ठाकरे यांनी ‘सामना’च्या संपादकपदाची सूत्र हाती घेतल्यानंतर पहिल्याच अग्रलेखात भाजपवर हल्लाबोल चढवला आहे. भाजपाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा ‘भाजपचे दादामियां’ असा उल्लेख करत दादामियां ‘इतिहास पुरुष’ कधीपासून झाले? असा सवाल ‘सामना’तून विचारला आहे. (Rashmi Thackeray First Saamana Editorial)

भाजपचे दादामियां ‘इतिहास पुरुष’ कधीपासून झाले? त्यांना इतिहासाचे उत्खनन करण्याची इतकीच आवड असेल, तर पंचवीस वर्षांपूर्वी हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी औरंगाबादचे नामांतर ‘संभाजीनगर’ केल्याचे त्यांच्या लक्षात यायला हवे होते, अशा कानपिचक्या अग्रलेखातून लगावण्यात आल्या आहेत.

‘दादामियांसारख्या लोकांनी औरंग्याची पिशाचे कितीही उकरुन काढली, तरी महाराष्ट्राची शांतता भंग पावणार नाही, हे दादामियांनी पक्के लक्षात ठेवावे. असे अनेक दादामियां गोधड्या भिजवत होते, तेव्हा शिवसेना हिंदुत्व आणि राष्ट्रकार्यासाठी छातीचा कोट करुन लढत होती. दादामियां हे ध्यानात ठेवा!’ असा थेट इशारा ‘सामना’तून देण्यात आला आहे.

देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील ही मंडळी जे बोलतात आणि करतात त्यातून त्यांचे वैफल्य दिसून येते. दादांची पावलं फडणवीसांच्या पावलावर पडत आहेत. जिथे नको तिथे जीभ टाळ्याला लावत आहेत, अशी बोचरी टीकाही भाजप नेत्यांवर करण्यात आली आहे.

आम्ही छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांचे वंशज आहोत, औरंग्याचे नाहीत. त्यामुळे औरंगाबादचे नामांतर झालेच पाहिजे. आपण नक्की कोणाचे वंशज आहोत, हे त्यांनी सांगायलाच पाहिजे. मुंबईत छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाची विटही रचली नाही, ना सावरकरांना भारतरत्न दिला. अयोध्येत रामाचं मंदिर सर्वोच्च न्यायालयाच्या कृपेने उभे राहत आहे. आम्हाला महाराष्ट्रात शांतता हवी आहे, असंही अग्रलेखात म्हटलं आहे.

शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या ‘दैनिक सामना’च्या संपादकपदी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांची निवड करण्यात आली. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्यापूर्वी ‘सामना’ दैनिकाचं संपादकपद सोडलं होतं. रश्मी ठाकरे यांच्या निवडीनंतर हे पद ठाकरे कुटुंबाकडेच राहिलं आहे.

 

Rashmi Thackeray First Saamana Editorial