पंतप्रधानांच्या उपस्थितीत भाजपप्रवेश करुन ‘छत्रपती’ उपाधीचा तरी मान ठेवायचा : रोहित पवार

| Updated on: Sep 15, 2019 | 11:31 AM

एका नेत्याच्या घरामागील लॉनमध्ये साताऱ्याचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांचा पक्षप्रवेश करत 'छत्रपती' या उपाधीचा अवमान केल्याची टीका रोहित पवार यांनी सोशल मीडियावरुन केली आहे.

पंतप्रधानांच्या उपस्थितीत भाजपप्रवेश करुन छत्रपती उपाधीचा तरी मान ठेवायचा : रोहित पवार
Follow us on

मुंबई : राष्ट्रवादीचे साताऱ्यातील खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या भाजपप्रवेशावर शरद पवार यांचे नातू रोहित पवार (Rohit Pawar on Udayanraje Bhosle) यांनी तोंड उघडलं आहे. एका नेत्याच्या घरामागील लॉनमध्ये उदयनराजेंचा पक्षप्रवेश करत ‘छत्रपती’ या उपाधीचा अवमान केल्याची टीका रोहित पवार (Rohit Pawar on Udayanraje Bhosle) यांनी केली आहे.

‘छत्रपती या उपाधीवर संपूर्ण महाराष्ट्र मनापासून प्रेम करतो. त्या उपाधीमागे असणारी व्यक्ती नाही, तर ती उपाधी मला महत्त्वाची वाटते.’ अशा भावना रोहित पवार यांनी फेसबुक-ट्विटरवर पोस्ट करुन व्यक्त केल्या आहेत.

‘पक्षप्रवेशाचा कार्यक्रम मोदी साहेबांच्या उपस्थितीत होणार असल्याचं सांगण्यात येतं, पण तो कार्यक्रम एका नेत्याच्या घराच्या पाठीमागे असणाऱ्या लॉनमध्ये आयोजित केला जातो. भारतीय जनता पक्षाला मला एकच सांगायचं आहे, महाराष्ट्राचे नागरिक म्हणून व्यक्तीहून अधिक त्या उपाधीचा आम्ही मान ठेवला आहे.’ असं रोहित पवार यांनी लिहिलं आहे.

‘कोणतंही राजकारण न करता मी मनापासून अपेक्षा व्यक्त करतो की, जसा महाराष्ट्राचा प्रत्येक नागरिक तो मान ठेवतो तसाच आपणही तो मान ठेवावा.’ अशी अपेक्षा रोहित पवारांनी (Rohit Pawar on Udayanraje Bhosle) व्यक्त केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत आपण भाजपप्रवेश करणार असल्याचा दावा उदयनराजे यांनी ट्विटरवरुन केला होता. परंतु प्रत्यक्षात भाजपाध्यक्ष अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत खासदार उदयनराजे भोसले यांनी भाजपचा झेंडा हाती धरला. उदयनराजेंनी खासदारकीचा राजीनामा दिल्यानंतर साताऱ्यातील पोटनिवडणुकीसाठी तयारी सुरु झाली आहे.


भाजप प्रवेशानंतर उदयनराजेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांचं कौतुक केलं होतं. काश्मीरमधील कलम 370 (Article 370) हटवण्याचं धाडस मोदींनी दाखवलं. माझ्या लहानपणापासून काश्मीरप्रश्नाबद्दल ऐकत होतो, पण कोणीही त्यावर उत्तर शोधत नव्हतं. पण मोदींनी ते धाडस दाखवलं, असं उदयनराजे म्हणाले होते.

यापूर्वी, राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही उदयनराजेंच्या पक्षांतरावर आगपाखड केली होती. उदयनराजेंच्या आचरट बालिश चाळ्यांना पाठीशी घालून जवळच्या माणसांना दुखावलं, काय मिळालं? असा उद्विग्न सवाल जितेंद्र आव्हाड यांनी पक्षाध्यक्ष शरद पवार यांना विचारला होता.

संबंधित बातम्या :

मोदी-शाह शिवरायांच्या विचाराने कार्यरत : उदयनराजे

उदयनराजेंविरुद्ध आघाडीचा एक्का बाहेर, पोटनिवडणुकीत पृथ्वीराज चव्हाणांना उमेदवारी?

साहेब, उदयनराजेंच्या आचरट बालिश चाळयांना पाठिशी घातलंत, काय मिळालं? : जितेंद्र आव्हाड

भाजप प्रवेशाआधी रात्री सव्वा वाजता उदयनराजेंचा राजीनामा