‘या’ मतदारसंघातून उमेदवारी द्या, रोहित पवारांची पक्षाकडे अर्जाद्वारे मागणी

| Updated on: Jul 02, 2019 | 7:40 PM

सध्या जिल्हा परिषद सदस्य असलेल्या रोहित पवार यांनी अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत-जामखेड मतदारसंघातून उमेदवारी मागितली आहे. विधानसभा लढवण्यास मी इच्छुक असल्याचं रोहित पवार यांनी यापूर्वीच सांगितलं होतं.

या मतदारसंघातून उमेदवारी द्या, रोहित पवारांची पक्षाकडे अर्जाद्वारे मागणी
Follow us on

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा दुसरा नातू आता निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. पक्षाचे नेते अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांच्यानंतर आता रोहित पवार यांनी विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी मागण्यासाठी अर्ज केलाय. सध्या जिल्हा परिषद सदस्य असलेल्या रोहित पवार यांनी अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत-जामखेड मतदारसंघातून उमेदवारी मागितली आहे. विधानसभा लढवण्यास मी इच्छुक असल्याचं रोहित पवार यांनी यापूर्वीच सांगितलं होतं. मात्र माझा मतदारसंघ ठरला नसून वरिष्ठ ठरवतील, तिथून उभं राहणार असल्याचं रोहित पवार यांनी म्हटलं होतं.

रोहित पवार हे कर्जत जामखेड मतदारसंघात चाचपणी करत होते. उन्हाळ्यात त्यांनी या भागातील लोकांसाठी टँकर सुरु करुन जनसंपर्क वाढवण्याचाही प्रयत्न केला  होता. लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने त्यांनी मतदारसंघ पिंजून काढला होता. नगर जिल्ह्याचे पालकमंत्री राम शिंदे यांचा हा मतदारसंघ आहे. एकीकडे खासदार सुजय विखे पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला जिल्ह्यातून हद्दपार करण्याचा विडा उचललाय, तर विद्यमान मंत्र्यांच्या मतदारसंघाची निवड रोहित पवार यांनी केली आहे.

उमेदवारी मागण्याचा आज शेवटचा दिवस होता. या दिवशी रोहित पवार यांनी राष्ट्रवादीच्या अहमदनगर जिल्हाध्यक्षाकडे अर्ज भरुन दिला. विशेष म्हणजे याच मतदारसंघासाठी अनेक जण उत्सुक आहेत आणि त्यांनीही अर्ज भरुन दिलीय. रोहित पवार यांच्याबरोबरच जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा मंजुषा गुंड याही इच्छुक आहेत, जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके हे दावेदार असतानाही त्यांनी मात्र  उमेदवारी मागितली नाही.

लोकसभा निवडणुकीत अहमदनगर जिल्ह्यात भाजप आणि राष्ट्रवादी यांच्यातच खरी लढत झाली होती. राष्ट्रवादीकडून संग्राम जगताप, तर भाजपकडून सुजय विखे मैदानात होते. राष्ट्रवादीने जागा सोडण्यास नकार दिल्याने सुजय विखेंना भाजपात यावं लागलं होतं, तर सुजय विखे यांचे वडील राधाकृष्ण विखे यांनीही नंतर भाजपात प्रवेश केला. त्यामुळे इथे राष्ट्रवादी आणि भाजप यांच्यात टोकाची लढत तर आहेच, शिवाय विधानसभा निवडणुकीच्या वेळी सुजय विखे महत्त्वाची भूमिका निभावू शकतात. कारण, त्यांनी आत्तापासूनच स्थानिक राजकारणावर लक्ष केंद्रीत केलंय.