जिभेची तलवारबाजी लोक फार काळ सहन करणार नाही, शिवसेनेचा इशारा

| Updated on: Oct 12, 2020 | 7:38 AM

जिभेची तलवारबाजी लोकं फार काळ सहन करतील अशी स्थिती नाही, असा इशारा केंद्र सरकारला दिला आहे. (Saamana Editorial Criticism Central Government on Unemployment)

जिभेची तलवारबाजी लोक फार काळ सहन करणार नाही, शिवसेनेचा इशारा
Follow us on

मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची जीभ घसरली, ‘एक राजे बिनडोक आहेत, तर दुसऱ्या राजांचे आरक्षण सोडून वेगळेच काही चालले आहे, असे ते म्हणाले.’ कोल्हापूर व सातारचे ‘राजे’ मराठा आरक्षणात उतरले आहेत. त्यावर आंबेडकर यांनी हे विधान केले. प्रश्न कोणी बिनडोक असण्याचा किंवा तलवारी चालविण्याचा नाही. जिभेची तलवारबाजी लोकं फार काळ सहन करतील अशी स्थिती नाही, असा इशारा शिवसेनेनं केंद्र  सरकारला दिला आहे. (Saamana Editorial Criticism Central Government on Unemployment)

मुंबई-पुण्यासारख्या शहरांत रोजगार देणारा प्रत्येक व्यवसाय पुढचे सहा महिने चालू राहील, याची काळजी घेतलीच पाहिजे. कायद्याचे पालन कोण किती करतो, यावर बोलायचे म्हटले तर अनेकांचे वस्त्रहरण होईल. जगा आणि जगू द्या या मंत्रानेच सगळ्यांना जगविता येईल. तलवारी चालवून लोकांना रोजगार, उद्योग मिळणार असेल तर तसे सांगावे. पांढरपेशे लोक पोटापाण्यासाठी गुन्हेगारीकडे वळत आहेत, ही धोक्याची घंटा सरकारच्या कानावर गेली तरी पुरे! असेही शिवसेनेनं सामनाच्या अग्रलेखात म्हटलं आहे.

“जातीय आरक्षणांसाठी महाराष्ट्रात तलवारी उपसण्याची भाषा सुरू आहे. अशी भाषा करणारे राज्यातील तालेवार लोक आहेत. आता दसराही येत आहे. त्यामुळे शमीच्या झाडावर ठेवलेली शस्त्र नेमकी कोण काढतंय, शस्त्र कोणावर चालवली जातील, ते पाहावेच लागेल. राज्याचे प्रश्न वेगळे आहेत. त्यावर कोणी गांभीर्याने बोलायला तयार नाही. राज्यातील दोन घटनांकडे आम्ही गांभीर्याने पाहत आहोत.

पहिली घटना पिंपरी शहरातली आहे. पगारात भागत नसल्याने दोन उच्चशिक्षितांनी एटीएम मशीन फोडली व मोठी रक्कम लुटण्यात आली. दुसरी घटना नाशिकची आहे. सव्वादोनशे रुपये पगार झाल्याने एसटी कर्मचाऱ्याने आत्महत्या केली. या दोन्ही घटना राज्यातील सध्याच्या स्थितीचे प्रातिनिधिक स्वरूप आहे. कोरोना आणि लॉकडाऊनचे हे ‘साइड इफेक्ट’ आहेत. लोकांचा रोजगार पूर्णपणे गेला आहे. त्यामुळे घर, संसार चालविण्यासाठी, पोराबाळांचे पोट भरण्यासाठी समाजातील पांढरपेशा वर्ग गुन्हेगारीचा मार्ग स्वीकारू लागला आहे,” असेही शिवसेनेनं म्हटलं आहे.

“जबाबदारी फक्त राज्यांची नाही तर केंद्राचीसुद्धा”

“आता अनलॉक काळात राज्यातील काही हजार उद्योग उघडल्याचे सांगितले जाते, पण त्याचा लाभ किती लोकांना झाला? जर पन्नास टक्के लोकांच्या क्षमतेने उद्योग सुरू झाले असतील तर उरलेल्या पन्नास टक्के लोकांच्या उपाशी पोटाची, त्यांच्या पोराबाळांची काय व्यवस्था सरकार करणार आहे? या गरीब लोकांच्या घरात जे किडूकमिडूक होते ते आता संपले. त्यामुळे एकतर आत्महत्या करणे नाहीतर गुन्हेगारीचा मार्ग पत्करून जिवंत राहणे, हाच मार्ग त्यांच्यासमोर आहे. सरकार यापैकी कोणत्या मार्गास मान्यता देणार आहे? ही जबाबदारी फक्त राज्यांची नाही तर केंद्राचीसुद्धा आहे हे आधी मान्य केले पाहिजे,” अशी टीका सामनातून करण्यात आली आहे.

“लोकांना रोजगार हवा आहे. लोकांना जगायचे आहे. पोराबाळांना कसेही करून जगवायचे आहे. त्यासाठी तुमचा तो कायदा, नियम वगैरेही मोडायला लोक तयार झाले आहेत. ही वेळ त्यांच्यावर कोणी आणली? मुंबई-महाराष्ट्रातील वाद्यवृंद, नाटय़ व्यवसाय, हॉटेलमध्ये गाणारे ‘ऑर्केस्ट्रा’ बंद पडले आहेत. देवळांचेही एक अर्थकारण आहेच. दानपेटय़ांची उलाढाल राहू द्या बाजूला, पण हार, नारळ, फुले, पेढे विकणारे, पुजारी, कीर्तनकार यांचे कसे चालायचे?’ असा प्रश्नही शिवसेनेनं उपस्थित केला आहे.

“आता ‘रेस्टॉरंट’ सुरू करताच पोलिसांनी हॉटेलवर धाडी टाकायला सुरुवात केली. गोरेगावच्या एका बारमध्ये 11 बारबाला नृत्य करतात. अशातच हा बार उशिरापर्यंत सुरू होता, असे पोलिसांचे म्हणणे आहे. ते खरे आहे, पण हा जो मोठा वर्ग याच व्यवसायावर जगत होता, तो सात-आठ महिन्यांपासून कसाबसा अर्धपोटी अवस्थेत जिवंत राहिला आहे. आता त्यांच्या रोजगार व पोटापाण्याची व्यवस्था सरकार किंवा प्रशासन करू शकेल काय? कायद्याचे पालन कोण किती करतो यावर बोलायचे म्हटले तर अनेकांचे वस्त्रहरण होईल. जगा आणि जगू द्या या मंत्रानेच सगळ्यांना जगविता येईल,” असा सल्लाही शिवसेनेनं केंद्राला दिला आहे. (Saamana Editorial Criticism Central Government on Unemployment)

संबंधित बातम्या : 

हिंमत असेल तर स्वबळावर लढून दाखवा; चंद्रकांत पाटलांचे राष्ट्रवादीला आव्हान

सत्तेची स्वप्न पाहू नका, आम्हीही तुमचे बाप आहोत; अजितदादांवर टीका करताना चंद्रकांतदादांची जीभ घसरली