2022 वर्ष कसं होतं? धोका अन् खोक्यांचं उदाहरण देत संजय राऊतांनी सांगितलं…

| Updated on: Dec 31, 2022 | 7:52 AM

2022 हे वर्ष कसं होतं? यावर सामनातून भाष्य करण्यात आलं आहे. तसंच धोका अन् खोक्यांचं उदाहरण देण्यात आलं आहे....

2022 वर्ष कसं होतं? धोका अन् खोक्यांचं उदाहरण देत संजय राऊतांनी सांगितलं...
शिंदे गटाच्या मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराच्या फायली भाजपच देतंय, संजय राऊत यांनी बॉम्ब टाकला; राजकीय वर्तुळात खळबळ
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई : आज 31 डिसेंबर. 2022 वर्षातील शेवटचा दिवस. हे वर्ष कसं होतं? यावर सामनातून भाष्य करण्यात आलं आहे. सरकारी यंत्रणांचा आजवर कधीही झाला नाही, असा गैरवापर करून देशात दहशत आणि भयाचे वातावरण सरत्या वर्षात निर्माण केले गेले. एका अर्थाने धोक्याचे आणि खोक्यांचे वर्ष म्हणूनच 2022 ची (2022 Year) नोंद इतिहासात होईल, असं सामनात (Saamana Editorial) म्हणण्यात आलं आहे.

दबावतंत्राचा वापर करून महाराष्ट्रात घडवले गेलेले बेकायदेशीर व घटनाबाह्य सत्तांतर हे त्याचे धडधडीत उदाहरण. मावळत्या वर्षातील सरकारी दहशतवादाचा हा उच्छाद लोकशाहीचे तमाम स्तंभ उघडय़ा डोळय़ांनी पाहात राहिले. नव्या वर्षात तरी आंधळेपणाचा बुरखा पांघरलेली ही पट्टी सुटेल काय?, असा सवाल सामनातून विचारण्यात आला आहे.

हिंदुस्थानपुरता विचार करायचा तर मावळते वर्ष देशातील लोकशाहीच्या हत्याकांडाचे वर्ष ठरले. पाशवी बहुमताच्या जोरावर हुकूमशाही पद्धतीने वागणाऱ्या राज्यकर्त्यांनी जनतेला, सरकारविरुद्ध बोलणाऱ्यांना भयभीत करण्याचे सत्रच गेले वर्षभर चालवले. लोकशाहीचा चौथा स्तंभ असणारा मीडिया एकतर सरकारने बगलबच्च्यांकरवी खरेदी केला किंवा धाकदपटशा दाखवून मुख्य प्रवाहातील साऱ्याच प्रसारमाध्यमांची तोंडे बंद केली, असं म्हणत सामनातून सरकारवर टीका करण्यात आली आहे.

मावळत्या वर्षाचा आज अखेरचा दिवस. 31 डिसेंबरची मध्यरात्र उलटली की, सालाबादप्रमाणे भिंतीवर टांगलेले जुने कॅलेंडर खाली उतरतील आणि नवीन कॅलेंडर त्यांची जागा घेईल. दिनदर्शिकेची केवळ पाने बदलतील, पण त्याने काय होणार? हा प्रश्न म्हणून ठीक असला तरी बदलत्या काळासोबत धावावे तर लागतेच!

मावळत्या वर्षाला निरोप देऊन आता नव्या वर्षाचे जल्लोषात स्वागत होईल. आसमंत उजळवून टाकणारी आतषबाजी व नयनरम्य रोषणाईने जगभरातच नवीन वर्षाचे दिमाखदार आगमन होईल. ‘हॅपी न्यू इयर’चे चित्कार करीत थर्टी फर्स्टच्या पाटर्य़ांमध्ये संगीताच्या तालावर तरुणाई थिरकू लागेल. केक कापले जातील, मेजवान्या झडतील.

नवीन वर्षाच्या स्वागताचा हा हर्षोल्हास, आनंद व सगळाच माहोल मोठा प्रेक्षणीय असतो. मावळत्या वर्षातील दुःखे वा कटू आठवणींना कवटाळून बसण्यापेक्षा काल काय झाले ते विसरून उद्या काय करायचे वा घडवायचे आहे, ते संकल्प निश्चित करून नव्या वर्षाचे स्वागत तर केलेच पाहिजे, अशा शब्दात सरत्या वर्षाला कसा निरोप दिला जातो? याचं वर्णन सामनात करण्यात आलं आहे.