“एकीकडे महागाईचा भडका, तर सरकारची नुसती कागदोपत्री फुंकर!”, सामनातून महागाईवर भाष्य

| Updated on: Nov 16, 2022 | 7:58 AM

आजच्या सामनाच्या अग्रलेखातून वाढत्या महागाईवर भाष्य करण्यात आलं आहे.

एकीकडे महागाईचा भडका, तर सरकारची नुसती कागदोपत्री फुंकर!,  सामनातून महागाईवर भाष्य
Follow us on

मुंबई : आजच्या सामनाच्या अग्रलेखातून वाढत्या महागाईवर (Inflation) भाष्य करण्यात आलं आहे. महागाईवरून केंद्र सरकारवर निशाणा साधण्यात आला आहे. “देशात ज्वारी, बाजरी, गहू, महाग. कडधान्ये आणि डाळीही कडाडल्या आहेत . खाद्यतेलही महागले आहे . रोजचा भाजीपालाही स्वस्त होईना . तरीही केंद्र सरकार (Central Government) म्हणत आहे की , ‘ देशातील महागाई कमी झाली हो !!’ एकीकडे महागाईचा भडका उडाला आहे. सर्वसामान्यांची त्यात होरपळ होत आहे आणि दुसरीकडे सरकार त्यावर ‘ कागदोपत्री ‘ फुंकर घालून जनतेची दिशाभूल करीत आहे . अर्थात जनता अशा भुलथापांना यावेळी भुलणार नाही हे सरकारने लक्षात घ्यावे “, असं सामनात (Saamana Editorial) म्हणण्यात आलं आहे.

ग्रामीण जनतेचे अन्न असणारी ज्वारीदेखील 40 टक्क्यांनी महागली आहे. ज्वारीची भाकरी, चटणी, ठेचा आणि कांदा हे आपल्या देशातील गरीब माणसाचे अन्न. मात्र ज्वारीची भाकर तर त्याच्यासाठी ‘महाग’ झाली आहेच, मात्र पशुखाद्यासाठी वापरली जाणारी ज्वारी खाण्याची वेळ त्याच्यावर आली आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे फळ हेच म्हणायचे का?, असं म्हणत सामनातून केंद्र सरकारवर टीका करण्यात आली आहे.

केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाने सोमवारी जी माहिती प्रसिद्ध केली त्यानुसार घाऊक आणि किरकोळ महागाई दरात घट झाली आहे. घाऊक महागाईचा दर तर तब्बल 18 महिन्यांनी एक अंकी आकडय़ात आला आहे. सरकारची ही आकडेमोड आणि आकडय़ांची जुळवाजुळव त्यांच्या नेहमीच्या कार्यपद्धतीचा भाग आहे. सरकारला स्वतःची पाठ स्वतःच थोपटून घेता येते, असं सामनात म्हणण्यात आलं आहे.

देशात ज्वारी, बाजरी, गहू, महाग. कडधान्ये आणि डाळीही कडाडल्या आहेत. खाद्यतेलही महागले आहे. रोजचा भाजीपालाही स्वस्त होईना. तरीही केंद्र सरकार म्हणत आहे की, ‘देशातील महागाई कमी झाली हो! हे म्हणजे जनतेच्या मनात धूळ फेकण्यासारखं आहे, असं म्हणत सानमातून महागाईवर भाष्य करण्यातं आलं आहे.