साताऱ्यात निवडून यायला पृथ्वीराज चव्हाणांना शरद पवारांची मदत घ्यावी लागते : सामना

| Updated on: Aug 27, 2020 | 8:04 AM

पक्षात वादळ निर्माण करण्याची क्षमता कॉंग्रेस पक्षातील एखाद्या नेत्यात तरी उरली आहे का? ज्यांनी पत्र लिहिले त्यांनी वयाची सत्तरी ओलांडली आहे, अशी टीकाही 'सामना'च्या अग्रलेखात केली आहे.

साताऱ्यात निवडून यायला पृथ्वीराज चव्हाणांना शरद पवारांची मदत घ्यावी लागते : सामना
Follow us on

मुंबई : ‘सामना’च्या अग्रलेखातून कॉंग्रेस अध्यक्षपदाच्या निवडीवर भाष्य करण्यात आले आहे. राहुल गांधी यांना विरोध करणाऱ्या काँग्रेस नेत्यांचा ‘सामना’तून समाचार घेण्यात आला आहे. साताऱ्यात निवडून यायला पृथ्वीराज चव्हाणांना शरद पवारांची मदत घ्यावी लागते, असा बोचरा वारही ‘सामना’तून करण्यात आला आहे. (Saamana Editorial on Prithviraj Chavan and Congress Leaders who wrote letter to Sonia Gandhi)

“राज्याराज्यांचे कॉंग्रेसचे वतनदार स्वत:पुरते पाहतात. पक्ष त्यांच्या खिजगणतीतही नाही. पक्षात जमले नाही की भाजपात पळायचे हीच सध्या सक्रियता झाली आहे. हा नवा राजकीय कोरोना व्हायरस म्हणावा लागेल. सोनिया गांधी, राहुल गांधी यावर काय करणार? म्हणूनच पत्र पुढाऱ्यांनी घेतलेल्या भूमिकेस व्यापक पाठिंबा मिळू शकला नाही” असा टोला लगावण्यात आला आहे.

“देश संकटाच्या खाईत गटांगळ्या खात असताना काही लोकांना राजकारण सुचते कसे हा प्रश्नच आहे. कॉंग्रेसच्या 23 प्रमुख नेत्यांच्या पत्राने निर्माण केलेले वादळ तूर्त थंडावले आहे असे दिसते. मुळात पक्षात वादळ निर्माण करण्याची क्षमता कॉंग्रेस पक्षातील एखाद्या नेत्यात तरी उरली आहे का? ज्यांनी पत्र लिहिले त्यांनी वयाची सत्तरी ओलांडली आहे. त्यातील एकही नेता देश पातळीवर, राज्य पातळीवर सोडाच, पण जिल्हा पातळीवरील देखील लोकांचा नेता नाही. पी चिदंबरम हे निष्णात वकील आहेत, पण ते नेते कधी झाले? गुलाम नबी आझाद, कपिल सिब्बल, आनंद शर्मा हे जुने जाणते आहेत. सिब्बल यांनी अनेक वर्ष पक्षाची कायदेशीर बाजू सांभाळली, पण या घडीला राजकारणातील त्यांची सद्दी संपली आहे. अहमद पटेल हे उत्तम मॅनेजर किंवा सल्लागार आहेत, पण लोकनेते नाहीत.” असेही ‘सामना’च्या अग्रलेखात म्हटले आहे.

“पृथ्वीराज चव्हाण, मिलींद देवरा यांच्याविषयी आम्ही जास्त काय बोलावे? साताऱ्यात निवडून यायला पृथ्वीराज चव्हाणांना शरद पवारांची मदत घ्यावी लागते. या सर्व मंडळींनी काँग्रेसला कायमस्वरुपी सक्रीय अध्यक्ष हवा, अशी मागणी सोनिया गांधींकडे करावी, याची गंमत वाटते.” असा टोलाही ‘सामना’च्या अग्रलेखात लगावला आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना 23 नेत्यांनी पक्षाच्या पुनर्रचनेबाबत पत्र पाठवले आहे. यात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, मुकुल वासनिक आणि मिलिंद देवरा यांचा समावेश असल्याचे बोललं जात आहे.

हेही वाचा : पृथ्वीराज चव्हाण, मिलिंद देवरांनी प्रश्न उपस्थित करणे लज्जास्पद, सुनील केदार यांचा हल्लाबोल

“राहुल गांधी हे सक्रीय होतेच आणि त्यांनी एकाकीपणे मोदी-शाहांना अंगावर घेतले. विधानसभा निवडणुकीत राहुल गांधींनी देश पालथा घातला. भाजपकडून त्यांच्यावर कमरेखालचे हल्ले होत होते तेव्हा ते पत्रपुढारी कुठे होते? राहुल गांधींचे खच्चीकरण जेवढे मोदी-शाहांच्या भाजपने केले नसेल तेवढे पक्षांतर्गत जुन्या कोंडाळ्यांनी केले आहे. (Saamana Editorial on Prithviraj Chavan and Congress Leaders who wrote letter to Sonia Gandhi) राहुल यांचे नेतृत्व मारायचे आणि कुजवायचे या राष्ट्रीय षडयंत्रात घरभेदी सामील होतात तेव्हा पक्षाचे पानिपत नक्कीच होत असते. राहुल आणि प्रियांका यांनी अत्यंत खुलेपणाने सांगितले की आता हा पक्ष तुम्हीच चालवा, वाटल्यास गांधी परिवाराबाहेरचा अध्यक्ष नेमा. मग या आव्हानाचा सामना का केला नाही? सगळे जुने नेते स्वत:चे स्थान जपण्यासाठी सक्रियता दाखवतात, प्रसंगी भाजपशी हातमिळवणी करतात, पण पक्ष म्हणून मोठी झेप घ्यावी असे त्यांना वाटत नाही” अशी टीकाही ‘सामना’च्या अग्रलेखात केली आहे.

“कॉंग्रेस वर्किंग कमिटीतील वादळ व आधीच पत्रप्रयोग म्हणजे आडगावच्या चार हौशा-गवशांनी बसवलेला ‘एकच प्याला’ या नाटकाचा रेंगाळलेला प्रयोग होता. नाटक नीट बसले नाही व पात्रांच्या मुर्खपणामुळे प्रेक्षकांनी नाटक जागेवरच बंद पाडले, पण नवा प्रयोग नव्या संचात राहुल गांधींनी लवकरच राजकीय मंचावर आणला नाही, तर लोक नाटकाचे पडदे आणि प्रॉपर्टी चोरुन नेतील” असे अग्रलेखात म्हटले आहे.